१ मे, या जागतिक कामगार दिनानिमित्त हा विशेष लेख. लेखक हे गेली ४० वर्षे कामगार चळवळीत सक्रिय आहेत. सर्व कामगार बंधू भगिनींना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
१ मे हा दिवस जागतिक कामगारदिन म्हणून साजरा केला जातो. शिकागोतील कामगारांनी ११८ वर्षापूर्वी कामाचे तास कमी करण्यासाठी केलेल्या आंदोलनात काही कामगार हुतात्मा झाले. त्यांचे स्मरण म्हणून जगातील कामगारांनी १ मे १८९० पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगारदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत उद्योगधंद्याची भरभराट होत होती. नवनवीन कारखाने उभे राहत होते. तुटपूजा पगारात कामगारांना १२ ते १६ तास काम करावे लागत होते. कामाची स्थिती चांगली नव्हती. वैयक्तिक जीवन जगण्यासाठी कामगारांना वेळ मिळत नव्हता. कामाचे तास कमी करावे, या मागणीसाठी कामगार थोड्या प्रमाणात संघटित होण्याचा प्रयत्न करीत होते. १८६६ च्या दरम्यान जिनिव्हा येथे भरलेल्या फर्स्ट इंटरनॅशनल वर्किंग असोसिएशनचे आठ तासांच्या कामाचा प्रस्ताव मांडलेला होता. तसंच ऑगस्ट १८६६ मध्ये नॅशनल लेबर युनियनने आठ तासांच्या कामाची मागणी केलेली होती. अमेरिकन सरकारने १८६८ मध्ये जरी आठ तासांचा कायदा केलेला होता, तरी मालक त्याची दखल घेत नव्हते, १८८० च्या मध्या मध्यास शिकागो न्यूयॉर्क बाल्टीपोर वगैरे औद्योगिक क्षेत्रात कामगारांनी आठ तासांच्या कामाच्या मागणीचा जोर लावून धरला होता.
१८८६ मध्ये अमेरिकेत आठ तासांच्या मागणीसाठी निदर्शने, मोर्चे, संप यांची लाट उसळली होती. १ मे ते ३ मे या दिवसात शिकागोतील “हे मार्केट” भागात हजारो कामगारांनी संप आणि निदर्शनांचा सपाटा लावला होता. आठ तास काम, आठ तास आराम आणि आठ तास कला, विज्ञान ही कामगारांची प्रमुख घोषणा होती. अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर या संस्थेने १८८६ च्या १ मे पासून आठ तासांच्या दिवसासाठी लढा देण्याचा आपला निर्धार जाहीर केला. या निर्णयाचे अमेरिकन कामगारांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. १ मे १८८६ या दिवशी संपूर्ण अमेरिकेतील कारखाने बंद होते. ५ लाख अमेरिकन कामगार संपात सहभागी झाले होते. कारखान्यांनी गजबजलेले शिकागो हे शहर संपाचे प्रमुख केंद्र होत. चाळीस हजार कामगारांनी रस्त्यावर येऊन निदर्शने केली. पोलिसांनी निदर्शकावर गोळीबार केला. यात सहा कामगार ठार झाले. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी एका चौकात ४ मे रोजी कामगारांनी एक शांततापूर्ण निदर्शने केली. त्यावर बॉम्ब फेकण्यात आला आणि दंगल होऊन सात पोलीस व कामगार ठार झाले. या संधीचा फायदा घेऊन पोलिसांनी निदर्शकावर क्रूर हल्ला केला. कामगार संघटनांची कार्यालये उध्वस्त केली. पुरोगामी कामगार नेते अल्बर्ट आर, पार्ससन्स, अगस्ट स्पाईज, सॅम्युएल जे, फिल्डने, युजिंग श्वाब, एडॉल्ड फिशर, जॉर्ज एंगेल, लुई बाग तसेच ऑस्कर निबे आदी कामगार नेत्यांना अटक करून त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. त्यांच्यावर खुनाचे आरोप ठेवण्यात आले. मात्र एक फिल्डन वगळता इतर नेते बॉम्ब फेकण्यात येण्यापूर्वीच चौकातून निघून गेले होते. न्यायालयाने सात नेत्यांना फाशीची सजा सुनावली आणि आठवे नेते ऑस्कर निबे यांना १५ वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावली.
या नेत्यांना फासावर चढविले जाण्याचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला, तसतसे या नेत्यांना वाचविण्याच्या आंदोलनाचे लोन अमेरिकेच्या बाहेर पसरू लागले होते आणि जगभरातून फाशीची सजा रद्द करण्यात यावी यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढू लागला होता. या विरोधी मोहिमेमुळे इलिनवासच्या गव्हर्नरला फील्डन आणि शॉब यांच्या फाशीच्या सजेचे रूपांतर जन्मठेपेत करावे लागले. फाशीच्या एक दिवस अगोदर वयाने सर्वात लहान असणाऱ्या लुई लीग यांनी आत्महत्या केली. अर्थात ही हत्या होती की आत्महत्या हे कोणालाही समजू शकलेले नाही. ११ नोव्हेंबर १८८७ ला अल्बर्ट पारसन्स, अगस्त स्पायजे, जॉर्ज एंगेल आणि एडॉल्फ फिशर आदी नेत्यांना फासावर लटकविण्यात आले. त्याने धाडसाने मृत्यूला कवटाळले. या घटनेची आणि या हुतात्म्यांच्या स्मृती प्रित्यर्थ १ मे हा दिवस जगभरात सर्वत्र कामगार वर्गाचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून मानला जाऊ लागला.

जगातील सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या, सर्व राष्ट्रांच्या आणि सर्व वर्णाच्या कामगारांच्या एकजुटीचा दिवस म्हणजे १ मे हा दिन कामगारदिन. या दिवशी जगाच्या कानाकोपऱ्यातले कामगार, सर्व शहरातले कामगार लहान मोठ्या कारखान्यातले कामगार हा दिवस सुट्टीचा, सणाचा आणि लढाऊ एकजुटीचा दिवस म्हणून पाळतात. जेवढे श्रमजीवी तेवढे एकही भावना रस्त्यावर प्रचंड मिरवणुका काढून व्यक्त करतात.
आज मॉस्को, लंडन, बर्लिन, पॅरिस. न्यूयॉर्क, मुंबई, कलकत्ता, रिओ द जानोरी, टोकियो, हनोई, हवाना, पेकिंग आदी जगातील सर्व शहरात कामगार रस्त्यावर येऊन आपल्या एकजुटीचे निदर्शक झेंडे, आपापल्या युनियनचे झेंडे घेऊन मिरवणुका काढतील आणि जगातील उरल्या सुरल्या भांडवलदारांना, सर्व शोषकांना, सर्व फूटपाड्यांना बजावून सांगतील की, आता तुमचे दिवस संपले, आम्ही ते संपविणार आणि साऱ्या दुनियेवर आमच्या गुलामगिरीचा अंत करणार, खऱ्याखुऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार. साऱ्या मानव जातीला स्वतंत्र करणार. बॉम्ब स्फोटाशी काही संबंध नसताना शिकागो मधील पाच कामगार नेत्यांना फाशी देण्यात आलं होतं.
दरम्यान शेजारच्या राष्ट्रांमध्ये कामाच्या तासासंबंधी चळवळ पसरत होती. १४ जुलै १८८९ ला भरलेल्या सेकंड इंटरनॅशनलने १ मे १८९० हा दिवस शिकागोतील कामगारांचे स्मरण म्हणून जागतिक कामगार दिन मानला जावा असा प्रस्ताव मंजूर केला. तेव्हापासून हा दिवस कामगारदिन म्हणून जगभर साजरा होतोय. फ्रान्स, ब्रिटन, इटाली, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, पोर्तुगाल, हंगेरी, जर्मनी वगैरे देशातील कामगारांनी १ मे १८९० ला निदर्शने, मोर्चे, संप, अधिवेशन घेऊन पहिला आंतरराष्ट्रीय कामगारदिन साजरा केला.
१ मे दिन साजरा करण्याच्या जगभरच्या तऱ्हा मात्र वेगवेगळ्या आहेत. काही देशात सरकार विरोधी आवाज उठून हा दिवस साजरा केला जातो. पोर्तुगालमध्ये १८७४ कामगारांनी सरकार विरुद्ध आवाज उठवला होता आणि ४५ वर्षाची जुलमी राजवट उलथून टाकली. ब्राझीलमध्ये कामगार संघटना खिळखिळ्या करणाऱ्या कठोर कायद्याविरोधी १९८० मध्ये एक लाख कामगारांनी संप पुकारला होता. दुसऱ्या एका अमेरिकन राज्यात दीड लाख कामगारांनी मोर्चे काढून सैन्याच्या जुलुमाविरुद्ध आवाज उठविला होता.
भारतात १९२७ पासून १ मे दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. भारतातील पहिला कामगारदिन १९२७ साली देशातल्या कामगार चळवळीचे नेतृत्व करीत असलेल्या मुंबईच्या कामगारांनी साजरा केला होता. तेव्हापासूनच आजपर्यंत भारतीय कामगार चळवळीचा इतिहासही गौरवशाली असाच आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत भारतातला कामगार इतर साम्राज्यशाही विरोधी शक्तींच्या खांद्याला खांदा लावून लढला. १९४६ साली तर मुंबईच्या रस्त्यारस्त्यावर नाविक सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून तो लढला आणि ब्रिटिशांचे भारतातले साम्राज्य नष्ट केले.
भारतात पहिले कारखाने १८५२ च्या सुमारास निघाले. १८८० साला पर्यंत तब्बल एक पिढी उलटून जाईपर्यंत औद्योगिक क्षेत्रात फक्त जंगली कायदाच नांदत होता. कामाचे तास १२, १६, १८ आणि कधी कधी त्याहूनही जास्त असत. रविवारची रजा, सुट्ट्या, कामाच्या ठराविक वेळा, यातले काही नव्हते. पाच पाच, सहा सहा वर्षाच्या मुलांकडून मोठ्या माणसांप्रमाणे काम करून घेतले जाई. मुले मशीनमध्ये सापडून जायबंदी झाली तरी त्यांची यत्किंचितही दादफिर्याद कोण घेत नसे. अल्पवयीन मुलाप्रमाणेच महिला व वयोवृद्ध कामगार यांच्यासाठीही कामाच्या वेळेत व इतर बाबतीत कोणत्याही सवलती नव्हत्या. कामाचे जबर तास आणि अत्यंत तुटपुंज वेतन यांच्या जोरावर आपले देशी भांडवलदार मालाच्या भावात इंग्रजी भांडवलदारांची यशस्वी स्पर्धा करू लागले आणि म्हणून इंग्रजी भांडवलदारांनीच हिंदी कामगारांच्या अमानुष शोषणाविरुद्ध ब्रिटिश सरकारकडे तक्रार केली. यासाठी कमिशन नेमण्यात आले. त्यानंतर कामगारांना रविवारची रजा मिळाली. सात वर्षाखालील मुलांना कामावर ठेवता कामा नये म्हणून निर्बंध आले. अर्थात हे सर्व कागदावरच कारण मशिनरीची साफसफाई करण्याच्या नावाखाली कामगाराला रविवारीही कामावर बोलवले जाई आणि डॉक्टर कडून मुलांच्या वयाच्या हवे तसे सर्टिफिकेट मिळवले जाई
१८८१ साली तत्कालीन कामगार पुढारी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे शिष्य श्री नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई गिरणी कामगार मंडळी ही भारतातील पहिली ट्रेड युनियन स्थापन केली. त्यांच्या प्रयत्नामुळे १८८१ साली हा फॅक्टरी ऍक्ट कामगार विषयक पहिला कायदा करण्यात आला. सात वर्षाखालील बालकांना काम करण्यास बंदी, ७ ते १४ वयोगटातील मुलांकडून सात तासाहून जास्त काम घेऊ नये. या मुलांना जेवणाची सुट्टी, अपघातापासून संरक्षण वगैरे सवलती जाहीर करण्यात आल्या. पुढे श्री नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे १८९१ साली फॅक्टरी ऍक्ट मध्ये सुधारणा करण्यात आल्या. त्यानुसार ११ तासाची ड्युटी, अर्धा तास जेवणाची सुट्टी, स्त्रियांना रात्र पाळीवर कामावर बोलवण्यास बंदी, ९ ते १४ वयाच्या मुलांना सात तासांची ड्युटी, साप्ताहिक रजा यासारख्या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. १९११ सालापर्यंत कामाच्या तासासंबंधी सरकारचे निश्चित असं काहीच धोरण नव्हतं. फुटकळ प्रमाणात प्रतिकार चालू असला तरी मजबुत अशी संघटित कामगार चळवळ नव्हती की, कामगारांच्या राष्ट्रीय पातळीवर संघटना नव्हत्या, तरीही असंतोषाचा परिणाम म्हणून १९११ साली फॅक्टरी ऍक्ट मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आल्या.

पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात कामगारांनी संपाचे हत्यार वापरलं. १९१९ ते १९२० च्या दरम्यान कामाच्या तासाचे प्रमाण दहावर आणण्यात आले. त्यानुसार १९३४ साली फॅक्टरी ऍक्ट मध्ये बदल करण्यात आले. आठ तासांची मागणी चालूच होती. फेब्रुवारी १९२५ साली मुंबईत भरलेल्या आयटक च्या पाचव्या अधिवेशनात आठ तासांची मागणी करण्यात आली.
दुसऱ्या महायुद्धानंतर संप, निदर्शने वगैरे आंदोलनाचा परिणाम १९४६ साली कामाच्या आठ तासांची मागणी अखेर पूर्ण झाली. १९४८ साली फॅक्टरी ऍक्टमध्ये नव्याने बदल करून त्या मागणीला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झाले. तेव्हापासून आजतागायत आपल्या देशातील कामगारांच्या कामाच्या तासात काहीही फरक पडलेला नाही. अशा रीतीने अमेरिकन कामगारांनी कामाचे आठ तास व्हावे या मागणीसाठी उग्र लढा लढविला आणि तीच मागणी भारतीय कामगारांच्या पदरात १९४६ साली म्हणजेच बरोबर ८० वर्षांनी पडली.
“जगातील कामगारांनो एक व्हा” असे आव्हान कार्ल मार्क्स यांनी केल्यानंतर जगातील सर्व कामगारांचे प्रश्न सारखे आहेत, आपल्या हक्कांसाठी आपल्याला लढलेच पाहिजे, या भावनेने पेटलेला कामगार मग संघर्षासाठी सिद्ध झाला. ज्या आस्थापनासाठी आपण आपल्या रक्ताचे पाणी करतो त्या आस्थापनाने आपली पिळवणूक करावी, येथे आपल्या विचारांना थारा असू नये, या गोष्टी कामगारांना पटत नसत. कामगार मग ते कुठलेही असो एकूणच त्याचे ध्येय एक असते आपल्या कामाशी इमान राखणे, पडेल ते काम करणे व आपण जेथे काम करतो त्या आस्थापनाची भरभराट करणे. या तळमळीने प्रत्येक कामगार काम करीत असतो. वेळ पडली तर स्वतःच्या जीवही धोक्यात घालणाऱ्या कामगारांना मात्र त्या मोबदल्यात मिळते ती अस्थिरतेची चिरंजीव जखम. आता गरज आहे, यावर कायम स्वरुपी उपाय योजना करण्याची.

— लेखन : मारुती विश्वासराव.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
जागतिक पातळीवरील कामगार चळवळीचा साद्यंत इतिहास सांगून पुढे भारतीय कामगार चळवळीचे सुद्धा उत्तम वर्णन करून सांगणारा अभ्यासपूर्ण लेख मनोज्ञ आहे . लेखकाचे हार्दिक अभिनंदन. 🙏💐