सौ नीता उपेन्द्र मेहेंदळे
मी प्रथम नीताताईंना भेटले तेव्हा आमच्या खूप गप्पा झाल्या. अमेरिकेत सियाटेल मध्ये घराजवळच चक्क मेहेंदळे आडनांवाचे कुटुंब रहातात हे नव्यानीच कळले आणि मग भेट व्हायलाच हवी, असे साहजिकच वाटू लागले.
मला कळलं की नीताताई समाज कार्य करतात. त्यांच्या घरात हॅालमध्येच देवघर होत. त्या देवभक्त, धार्मिक वाटत होत्या नीताताई सियाटलला यायच्या आधी रॅाचेस्टर, न्यू यॉर्कला होत्या. तिथे त्या नेहमी देवळात जात असत.j तिथल्या नारायण देशपांडेंनी त्यांना विचारले “तुम्ही एखाद स्वयंपाकातल्या पदार्थांवर पुस्तक लिहू शकता कां ? ते पुस्तक विकून आपण देऊळ स्वयंपुर्ण होण्यासाठी थोडी मदत करू शकतो !“ नीताताईंना नविन पदार्थ बनविण्याची हौस होतीच, त्या चांगल्या सुगरण आहेत. त्यांनी आपल्या आणखी दोन मैत्रिणींना विचारले. त्यातली एक गुजराथी होती आणि दुसरी दाक्षिणात्य होती lll. तिघींनी एकत्र जमून, पदार्थ ठरवून, ते प्रमाणात बसवून, करून पाहून, पुस्तक तयार केले. पदार्थांचे वैशिष्ट्य असे की ते भारतीय असून, त्यांचे जिन्नस अमेरिकेत सहज मिळतात. तिन्ही प्रांतातले पदार्थ ह्यात असल्यामुळे आणि जिन्नस इथे उपलब्ध असताना असल्यामुळे ते चांगलेच लोकप्रिय झाले आणि रॅाचेस्टरच्या हिंदू देवळाला एक उत्पन्नाचे साधन मिळाले.

काही वर्षानंतर नीताताई सियाटलला आल्या. बदली — मग ती जगाच्या पाठीवर कुठेही असो — थोडे दिवस सर्वांनाच जुन्या आठवणीने अस्वस्थ करते. रूटीन आणि नव्या ओळखी होईपर्यंत एक पोकळी पण निर्माण करते. नीताताईंचे पण तसेच झाले. सियाटलच्या देवळात त्यांनी जायला सुरवात केली. तिथे स्वयंसेवक म्हणून शुक्रवारी प्रसाद आणण्यासाठी गुरूजींची परवानगी घेतली.
सुरवातीला शिरा, पुरण, पेढे असे आपले पदार्थ त्यांनी केले आणि नेले. मग त्यांच्या मनांत विचार आला की आपल्या भारतात प्रत्येक प्रांताचे इतके भिन्न भिन्न पदार्थ आहेत , तर आपण दर वेळेस नवीनच पदार्थ करायचा. दर सोमवारी नवा पदार्थ थोडा करून बघायचा, जमला की त्याचे प्रमाण ठरवून परत करायचा. शुक्रवारी नीट जमलेला पदार्थ करून छोट्या छोट्या डब्यांमध्ये भरायचा आणि देवळात प्रसाद म्हणून घेऊन जायचा. असा उपक्रम त्यांनी सतत २ वर्षे राबवला. दोन वर्षात एकही प्रसाद त्यांनी दुसऱ्यांदी केला नाही. हे नाविन्याचे आहे की नाही ? ह्या त्यांच्या कल्पकतेमुळे आणि परिश्रमांमुळे ओळखी वाढल्या आणि देवीपुढे उभं राहून “श्री सुक्त“ म्हणायचा मान मिळायला लागला, म्हणून त्या खूषही झाल्या.
अमेरिकेत समाज कार्य करण्याचा हाही मार्ग असू शकतो, हे मला तेव्हा कळले. नीताताईंचे सातत्य, चिकाटी, श्रध्दा, मेहनत, आवड हेi सर्व गुण मला ह्या उपक्रमा मुळे कळले आणि कौतुक वाटले.
त्यांनी खरं तर ह्या प्रसादावरती पण पुस्तक लिहायला पाहिजे असे वाटले. पण ही त्यांची खरी ओळख नाही.
नीता उपेंद्र मेहेंदळे या एक कुशल व्यावसायिक असून त्यांचा विविध क्षेत्रांमध्ये अनुभव आहे आणि त्यांना समाज सेवा व शिक्षणाची आवड आहे. त्यांनी मुंबईच्या रुईया कॉलेजमधून बी.ए. आणि मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांमध्ये एम.ए. केले आहे. तसेच भवन्स कॉलेज, मुंबई येथून ट्रॅव्हल आणि टुरिझममध्ये डिप्लोमा घेतला आहे.
नीता यांना त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या तळमळीने समाजसेविका बनविले. त्या पुण्यातील “मोहल्ला कमिटी” या स्वयंसेवी संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. तिथे त्यांनी अनेक सामाजिक, राजकीय, पर्यावरणीय आणि जैवविविधतेसंबंधी उपक्रम राबवले. यात वनीकरण मोहीम, वन्य जीवांचा अधिवास आणि विविध सामाजिक कार्ये यांचा समावेश आहे.

समाजासाठी योगदान देण्याबरोबरच, नीता या एक प्रमाणित रत्नपरीक्षक, तसेच हिरे तपासक आहेत. त्या चौथ्या पिढीच्या ज्वेलरी उत्पादक व डिझायनर असून “मोहोर ज्वेलर्स” च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या कामात पारंपरिकता आणि आधुनिकतेचा अनोखा संगम साधला आहे.
नीता यांच्या हृदयात शिक्षणाला विशेष स्थान आहे. शिक्षणासाठी समर्पित असलेल्या विविध संस्थांना त्यांनी मदत केली आहे. त्या स्वतःही आयुष्यभर शिकवण्यावर भर देतात. सध्या त्या संस्कृतच्या चौथ्या वर्षाच्या अध्ययनात आहेत. शिक्षण आणि संस्कृती युवकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या “ॐ स्कूल” च्या सियाटल शाखेच्या संचालक मंडळावर असल्याचा त्यांना अभिमान आहे.
नीता ताईंनी त्यांच्या व्यवसायाची सुरवात १९९५ मध्ये सुरू केली. त्यावेळी त्यांचे यजमान अमेरिकेत आले होते. पण मुलांच्या शिक्षणासाठी त्या पुण्यात राहिल्या होत्या. या व्यवसायाची पाळेमुळे त्यांच्या रक्तातच होती. त्या माहेरच्या चिप्पलकट्टी – त्यांच्या आजोबांची १०० वर्षांची पेढी आहे. “चिप्पलकट्टी सराफ“ म्हणून ते ओळखले जातात.

श्री. लाटे ह्यांच्याबरोबर त्यांनी व्यवसायाला सुरवात केली. व्यवसायतले बारकावे त्यांच्याकडून त्या शिकल्या. नीता ताईंच्या सासूबाईंच्या प्रोत्साहनामुळे, सहकार्यामुळे त्यांनी हा व्यवसाय सुरू करायचे ठरविले. त्यांच्या आई सुलभा चिपलकट्टी ह्यांना नीता ताईच्या कामाबद्दल खूप अभिमान होता. नीता ताईंच्या वडिलांनी त्यांना विक्री कशी करावी, ह्या बद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर नीताताईंनी रत्नांची पारख आणि रत्नशास्त्र आणि ज्वेलरी डिझाइनींगचे कोर्सेस केले.
२००१ साली त्या अमेरिकेत आल्या आणि त्यांनी “नीता’जकलेक्शन” या नावाने व्यवसाय सुरू केला. पुण्यामध्ये त्यांचे उत्पादन केंद्र आहे. त्यांनी साक्स फिफ्थ अवेन्यू या अमेरिकन लक्झरी स्टोअर ला काही वर्षे हिऱ्यांचे दागिने पुरवले. आता त्या मोहोर ह्या नावाने व्यवसाय करतात. तर ॲानलाईन पद्धतीने त्यांनी जागतिक पातळीवर वर काम सुरू केले आहे. नविन प्रकारचे डिझाईन आणि जुन्या दागिन्यांचे बारकावे यांची सांगड करून त्या फ्यूजन डिझाईन्स बनवतात. त्यामुळे त्यांचे दागिने वेगळे वाटून सर्वांच्या पसंतीस येतात.
“उत्तम हिरे हवे असतील तर ते नीता कडे मिळतील“ अशी त्यांची ख्याती आहे.

नीता ताईंचा मुलगा भूषण, हा संगणक अभियंता आहे आणि मुलगी तेजा डॅाक्टर आहे. त्यांनाही ह्या व्यवसायाची आवड आहे. यजमान उपेंन्द्र, भाऊ अतुल चिपलकट्टी आणि वहिनी मंजुश्री चिपलकट्टी व्यवसायाची आर्थिक बाजू सांभाळतात. त्यामुळे हा व्यवसाय आता पुढची पिढीपण समर्थपणे करेल असा विश्वास नीताताईंना वाटतो. त्यांच्या पुढील सर्व सामाजिक, व्यवसायिक उपक्रमांना शुभेच्छा.

— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800