नैसर्गिक दिनचर्येचे महत्त्व
निसर्गोपचार आश्रम आणि न्यूज स्टोरी टुडे यांच्या संयुक्त विद्यमाने उरळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात आयोजित करण्यात आलेले निसर्गोपचार शिबिर काल पासून सुरू झाले.
आश्रमातील अर्ध्या दिवसाची दिनचर्या पार पडल्यावर दुपारच्या सत्रात,
प्रारंभी या शिबिरासाठी येऊ इच्छिणारे परंतु कर्क रोगाने आजारी असलेले निवृत्त माहिती उपसंचालक डॉ संभाजी खराट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या नंतर “प्राकृतिक दिनचर्या” या विषयावर योग शिक्षक श्री सतीश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी बोलताना श्री सोनवणे यांनी सांगितले की, कधीही पोक काढून न बसता नेहमी ताठपणे बसावे. भले आपण कार्यालयात बसलो असो की मोटार सायकल वर किंवा घरी !
आपण लवकर झोपलो पाहिजे जेणे करून पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठून दिवस सुरू केला पाहिजे. आपली रात्रीची ९ से ११.३० या दरम्यान ची झोप खूप महत्वाची असते. यामुळे हार्मोन्स चा समतोल साधला जातो.
आपल्याला ६ तासांची झोप पुरेशी असते. बालके, वयस्कर झालेल्यासाठी दुपारची झोप चांगली आहे. इतरांनी अशी झोप न घेता शवासन केले पाहिजे. प्रकृती नुसार, सूर्यास्त होण्याआधी रात्रीचे जेवण झालेच पाहिजे. तर सकाळचे जेवण सकाळी १० वाजता केले पाहिजे. ॲक्शन ची रिॲक्शन होते. म्हणून ॲक्शन चांगली झाली तर रिॲक्शन चांगली होते, हे लक्षात घेतले पाहिजे. पूर्वी शेतात, जंगलात काम करून, शारीरिक कष्ट करून शरीर निरोगी आणि आकारबध्द रहायचे. आता आपण शरीराला कष्टच पडू देत नाही म्हणून वाकून झाडू मारला पाहिजे. पण तसे न करता मोठा झाडू वापरतो तर तसे न करता वाकुनच झाडले पाहिजे. तसेच शरीराला कष्ट न राहिल्याने दररोज व्यायाम केला पाहिजे. व्यायामाला पर्याय म्हणून रोज चार किलोमिटर चाललेच पाहिजे. रस्त्यावर पळता कामा नये. कारण आजचे रस्ते पळण्यासाठी योग्य नाही.
या आश्रमात जास्तीत जास्त व्यक्ती मनोशारीरिक त्रास असलेले येतात. त्यांना काहीही झालेले नसते तरी पण आपल्याला काही तरी झाले आहे असे वाटत राहते. खरं म्हणजे आपण आपल्या भावना मनात दाबून न ठेवता, भावनांचा वेळीच निचरा झाला पाहिजे. आपण मनमोकळेपणाने जगले पाहिजे. मनात काही ठेवू नये. कुणाला काही बोलायचे असेल तर बोलून मोकळे झाले पाहिजे. आपल्याला हात न टेकवत उठता, बसता आले पाहिजे. बीएमआय नियमितपणे तपासात राहिला पाहिजे.
आश्रमात सर्व पांढरे पदार्थ वर्ज्य आहे. साखर, मैदा, मीठ, तांदूळ, अजिबात खाऊ नये. चहा एकदम सोडल्यास त्रास होतो. म्हणून चहा एकदम न सोडता तो हळूहळू सोडावा. म्हणजे शरीराला सवय झाली की त्रास होणार नाही. दररोज मी ३ किलोमीटरचे अंतर सायकल ने जातो येतो. अशा प्रकारच्या शारीरिक हालचाली केल्या नाही तर आपले शरीर रोबो सारखे होत जाईल.
आपण शरीराचा काही तरी विचार करतो, पण मनाचा मात्र अजिबात विचार करत नाही. घरातील सर्व माणसे दिवस भरात काही काळ एकत्र आली पाहिजे. एकमेकांशी बोलली पाहिजे. एकमेकांची विचारपूस केली पाहिजे. वेळ प्रसंगी त्यांचे पाय, पाठ दाबली पाहिजे. त्यांचे मालिश केले पाहिजे. गावातील ५२ जणांना येथे मसाज करण्यासाठी ठेवले आहे. त्यामुळे त्यांना रोजगार मिळाला आहे, महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. ते मसाज कसे करतात, ते पहा. त्या प्रमाणे शिका. खरं म्हणजे, इथे एकदा आले की परत येण्याची गरज पडली नाही पाहिजे. पण इथे केलेल्या गोष्टींचा नियमित अवलंब न करता, माणसे परत परत इथे येतात, ते अत्यंत चुकीचे आहे. जेवण लवकर केले पाहिजे. लवकर झोपले पाहिजे. जेवण करताना, शौच करताना मोबाईल पाहणे, वृत्तपत्र किंवा इतर काही वाचन करू नये. उभे राहून जेवण करू नये, जेवताना पाणी पिऊ नये. नंतर जेव्हा तहान लागेल, तेव्हाच जेवले पाहिजे.
अशा प्रकारे मार्गदर्शन झाल्यावर उपस्थितांनी विचारलेल्या सर्व शंकांचे निरसन श्री सोनवणे यांनी केले.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान लेख ,बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या आहेत .मार्गदर्शनपर लेख 👏👏🙏🙏
अशी शिबिरे परत परत होण्याची गरज आहे. आपण खूप चांगले काम करत आहात. मनापासून शुभेच्छा🌷