आज बुद्ध पौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख.
भगवान गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
नेपाळ सरकारने वर्ष २०२० हे पर्यटन वर्ष म्हणून घोषित केले होते. म्हणून काही झाले तरी त्यावर्षी नेपाळला जायचेच असा मी निश्चय केला होता. त्यापूर्वी नोकरीत असताना पूर्वपरवानगीने रजा घेऊनही ऐनवेळी उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे मला नेपाळला जाणे दोनदा रद्द करावे लागले होते, ही सल मनात कायम होती.

नेपाळला भेट देण्यासाठी मी पूर्वी नोकरी करत असलेल्या दूरदर्शन मधील मित्र निर्माता राम खकाळ आणि नंतर महाराष्ट्र शासनाच्या नोकरीत मित्र झालेले अवर सचिव बी एस गायकवाड असं आमचं त्रिकुट जमलं. बजेट प्रमाणे ट्रॅव्हल एजन्सी बघितली. त्यानुसार आम्ही एकूण ५० प्रवासी, ज्यात बहुतांश बेस्ट चे कर्मचारी होते, मुंबई हून गोरखपूर एक्सप्रेस ने गोरखपूर येथे गेलो. उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री महंत योगी आदित्यनाथ ज्या मठाचे प्रमुख आहेत, तो मठ, मंदिर पाहिले. तिथून पुढे मोठ्या बसने गोरखपूर – नेपाळ दर्शन- पुन्हा गोरखपूर असे आमचे पंधरा दिवसांचे “नेपाळ दर्शन” “चांगलेच” झाले.

नेपाळमध्ये धार्मिक व पर्यटन स्थळे खूप आहेत. गौतम बुद्ध यांचं लुम्बिनी हे जन्म स्थान नेपाळमध्येच आहे. देश विदेशातुन बुद्ध धर्माचे भिख्खू, अनुयायी, श्रद्धाळू दररोज तिथे हजारोंच्या संख्येने येत असतात. नेपाळ सरकारने हे स्थान अतिशय सुंदर ठेवले आहे. शिवाय विविध देशातील सरकारांनी, संस्थांनी या स्थानाच्या सौंदर्यात भर घातली आहे. इथल्या प्रसन्न वातावरणात दिवस कसा जातो, हे कळत नाही.

लुम्बिनी येथे इस. पूर्व ५६३ ला वैशाख पौर्णिमेला, कपीलवस्तू नगरीचे शुद्धोदन राजा व महामाया राणीच्या पोटी सिद्धार्थ राजकुमारचा जन्म झाला. वयाच्या २९ व्या वर्षी सिद्धार्थाने गृहत्याग केला. प्रचलीत शारीरिक यातनामय साधना पद्धतींचा सहा वर्षे अवलंब केला. याने दु:ख मुक्ती ऐवजी शरीर मुक्तीचा अंतिम टप्पा गाठला. ईच्छीत फल प्राप्ती ऐवजी मरणासन्न अवस्था प्राप्त झाली. सिद्धार्थचा राजबिंड देह हाडांचा सापळा झाला. सिद्धार्थने सुजाताची खीर खाऊन साधना पद्धतीत बदल केला. ऐषो आरामाचे टोक व शरीर यातनेचे टोक या दोन्हींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मध्यम मार्ग निवडला.
बुद्धगयेला पिंपळ वृक्षाखाली ईस.पूर्व ५२८ ला, वैशाख पौर्णिमा दिनी, सिद्धार्थ बुद्ध झाला. सर्व ब्रम्हांड चारही ब्रम्ह विहारांनी आनंदाने न्हाऊन निघाले. गौतम बुद्धांनी ४५ वर्षे सतत पायी भ्रमण करत सद्धम्माचा प्रचार केला. ज्ञान प्राप्तीनंतर सारनाथ येथील मृगदाय वनात पंचवर्गीय भिक्षुंना प्रथम प्रवचन दिले. हे प्रवचन “धम्मचक्क पवत्तन” अर्थात धम्मचक्र प्रवर्तन, या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे.
“बहुजन हिताय, बहुजन सुखाय”
करिता, सर्वांच्या दु:ख मुक्ती करिता गौतम बुद्ध प्रचार करीत राहीले. वयाच्या ८० व्या वर्षी ते कुशीनगर येथे आले. येथेच दोन शाल वृक्षांच्या मधे त्यांनी देह त्यागला व महापरिनिर्वाण पदास ते गेले.

जन्म, ज्ञानप्राप्ती, महापरिनिर्वाण या तीनही घटना वैशाख पौर्णिमेला घडून येणे, हे केवळ बुद्धांविषयीच घडले आहे. हे तिन्ही प्रसंग पावन प्रसंग. म्हणूनच याला त्रिविध पावन पौर्णिमा असे म्हणतात.
बुद्धाने या पृथ्वीवर धर्माच्या नावाखाली ज्या जून्या परंपरा प्रचलित होत्या, त्या स्वीकारल्या नाहीत. नवीन धम्म सांगितला. नवीन इतिहास निर्माण केला.
“अत्थाहि अत्थनो नाथो,
कोहि नाथो परोसिया”
अर्थात मनुष्य स्वतःच स्वतःचा स्वामी आहे. त्याचा इतर कोणीही इश्वर नाही, असा स्वयं प्रकाशित बनण्याचा उपदेश केला.
विज्ञानाच्या कसोटीवर आधारित सिद्धांत म्हणजे, “कार्यकारणभाव”! अर्थात कारणाशिवाय काहीही न घडणे. या सिद्धांतामूळे शाश्वतता वादावर आपोआपच पडदा पडला. त्यांनी सांगितले की, सर्व अनित्य आहे.सर्व बदलणारे आहे. हाच निसर्ग नियम आहे.जगात दु:ख आहे हे पूर्वी काही तत्वद्न्य सांगत होते. परंतु दु:खातून मुक्त कसे व्हायचे, याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. तेच उत्तर भगवान बुद्धाने शोधून काढले. या महान कल्याणकारी दिव्य ज्ञानाचा शोध सम्यक सम्बुद्धाने वैशाख पौर्णिमेला लावला.त्या जीवन मुक्त करणाऱ्या मार्गाला “आर्य अष्टांगिक मार्ग” असे म्हणतात.
या मार्गाद्वारे शीलावर अधिष्ठीत होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दु:ख मुक्त होता येते. यालाच काही लोक मुक्ती, मोक्ष म्हणतात. भगवान बुद्धाने याला “निर्वाण” म्हटले आहे. ते म्हणतात, “निब्बाणं परमं सुखं”, निर्वाण हे सर्व श्रेष्ठ सुख आहे.काही लोक निर्वाण म्हणजे मृत्यू असा चूकीचा अर्थ काढतात. निर्वाण ही सर्व श्रेष्ठ सुखाची परमोच्च अवस्था आहे.

भगवान बुद्ध यांनी सांगितलेली विपश्यना मी सपत्नीक नाशिक जिल्ह्यातील धम्मगिरी येथे दहा दिवस राहून केली आहे. जगात मानसिक ताण, तणाव वाढत असताना नियमित विपश्यना करणे खूप आवश्यक आहे. गौतम बुद्ध यांचे उपदेश, जीवन, कार्य जगभर प्रेरणा देत असतात. त्यावर आधारित साहित्य, नाट्य, चित्रपट निर्मिती ही होत असते. आमचे मित्र, विक्रीकर सह आयुक्त सुभाष एंगडे यांनी देखील बुद्धाच्या शिकवणुकीवर आधारित “धम्मपद” हे सुंदर, सुबक, उपयुक्त पुस्तक प्रकाशित केले आहे.
जगात भारत, नेपाळ, चीन, जपान, श्रीलंका, थायलँड आदी देशात बौद्ध धर्माचा विशेष प्रसार झाला आहे. चीन, थायलँड, जपान मधील अनेक प्रसिद्ध बुद्धविहारे पहायची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. विश्व शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मनोभावे वंदन.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
I commented on WhatsApp.so need to be again.only I will say that , philosophy of Buddha never die.It is eternal forever that’s you have shown in your abstract. ..