Saturday, May 17, 2025
HomeUncategorizedमौनाचे महत्व

मौनाचे महत्व

संत मेहेरबाबा जन्मभर बोललेच नाहीत. श्री अरविंद सलग 40 वर्षे विचार गुंफेत मौनावस्थेत राहिले. पण याच काळात हजारो पृष्ठांचे साहित्य त्यांच्या लेखणीतून प्रकटले. महात्मा गांधी दर सोमवारी मौन पाळत आणि वाचन, लेखन, प्रार्थना व आठवड्यातील राहिलेली कामे पूर्ण करत. ज्ञानप्राप्तीनंतर बुद्ध शांत होते. महावीर बारा वर्षे मौनात राहिले.

आपण नेहमी अनिवार्य, अपरिहार्य आणि दुसऱ्याचं हित होईल असं बोलावं. अन्यथा चूप बसावं. आपण बोलल्यावर समोरचा माणूस प्रश्नांच्या – समस्यांच्या साखळीतून मुक्त व्हायला हवा. शुभ शब्द आपली ताकद वाढवतात. अशुभ शब्द आपल्याला कमजोर बनवतात. अघळपघळ बोलू नये. काही दुःखे वृथा बोलण्यातून वाट्याला येतात. वादविवाद, भांडणे, गैरसमज, निष्फळ चर्चा, ताणतणाव यांत आपले 10% आयुष्य बरबाद होते. वैखरीचे लंघन अधूनमधून करावे म्हणजे विचार मर्यादांचे उल्लंघन टळेल.

आपणच आपल्या मनाशी संवाद साधणे म्हणजे चिंतन ! मौन म्हणजे आत्मचिंतन ! कबीरजी म्हणतात, “ऐसी बानी बोलिये, मन का आपा खोय, औरन को सीतल करे आपहु सीतल होय।” “A meaningful silence is better than meaningless words.”

खरं तर मौनाची साधना करणाराच बोलण्याचा हकदार असतो. मौनाने त्याच्या शब्दांना सामर्थ्य प्राप्त होते. बुद्धांकडं एक दार्शनिक आला. खूप मोठ्या मोठ्या माणसांना भेटलो म्हणाला. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच नाही म्हटला. बुध्द म्हणाले, ‘एक महिना शांत रहा, मौन पाळ’ मग विचार. तो हो म्हणाला, पण खरंच द्याल ना माझ्या प्रश्नाचं उत्तर ? त्याचा प्रश्न ऐकून बुद्धांशेजारी बसलेला एक शिष्य हसला. त्या दार्शनिकाने त्याला हसण्याचे कारण विचारले, तेव्हा भिक्खू म्हणाला, काही महिन्यांपूर्वी मला पण बुध्दांनी हेच करायला लावले. आता मी प्रश्न – उत्तराच्या खेळातून मुक्त झालो आहे. मौनसाधनेनंतर तूही प्रश्न विचारणंच विसरून जाशील.

प्रश्नांतून उत्तरांची आणि उत्तरांतून प्रश्नांची निर्मिती होतच राहते. निष्फळ चर्चा झडतात, कार्य रखडते, आत्मशांती हरवते. बोलण्यामुळे आपला इतरांशी संवाद होतो, आपण इतरांशी जोडले जातो. परंतु मौनाने स्वतःशी संवाद होतो. मौनाने खोटं बोलणं थांबतं. निंदाकर्म घडत नाही. स्मरणशक्ती बळकट होते. आपल्या तोंडाची मालकी आपल्याकडेच असल्याचे सिद्ध होते.

रोज पहाटे एखाद दोन तास मौनसाधना केली तर इच्छाशक्ती प्रबळ होते. प्रेम, शांती, पवित्रता, शक्ती, सुख, ज्ञान,आनंद हे आत्म्याचे मूळ सात संस्कार जागृत राहतात. वैचारिक ठामपणा येतो, विचारांचे अधिष्ठान प्राप्त होते. शत्रूंची संख्या घटते, मैत्रभाव फुलतो. एका मिनिटात आपण पाचशे शब्द बोलत असू तर ते अर्ध्यावर आणू, अन् हळहळू शून्यावर ! बोलण्याचं ओझं थकवतं. मौन हलकंफुलकं असतं. मौन आनंदाचा वसंत घेऊन येतं. बोललं की बऱ्याचदा इमान ढळतं.

मौन प्रामाणिक असतं कारण माणूस इतरांशी खोटं बोलेल परंतु स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. मौनाने आपल्या अंतरंगातील सत्याचा परिचय होतो. निःशब्द माणसाच्या विचारांचं खंडन कुणी करू शकतो का ? मौनाने वाणी विशाल होईल, सत्य होईल, सात्विक होईल आणि लोक आपलं बोलणं ऐकण्यासाठी आतुर होतील. थोरांचे बोलणे सार्थक असते, म्हणून तर त्यांचा एक एक शब्द ऐकण्यासाठी लोक तळमळतात. गंमत ही, की ज्यांच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे असे वाणी तपस्वी बोलत नाहीत आणि ज्यांनी बोलू नये असे वाचाळवीर पाट्याच्या पाट्या बोलतात. काही मिळवण्यासाठी नाही, तर देण्यासाठी बोलायचं असतं. फूल सुगंधातून, दिवा सहस्त्ररश्मींतून, झाड थंडगार छायेतून तर वारा शीतल स्पर्शातून बोलतो. खऱ्या भावना शब्दांशिवायच व्यक्त होतात. त्यामुळं मौन आणि वाणीत संतुलन ठेवणं गरजेचं.

मितभाषी माणसं आपली प्रचंड मानसिक ऊर्जा वाचवतात. बऱ्याचदा बोलण्यातून गैरसमज होतात, मौनाबद्दल तसे नाही. बोलणं मुखाबाहेर पडलं की आपली हुकमत संपते, मग त्यावर ताबा असतो ऐकणाऱ्याचा ! परा, पश्यन्ति, मध्यमा, वैखरी हे वाणीचे प्रकार ! मौनाचा एक व्यावहारिक फायदा म्हणजे ते आपले अज्ञान झाकून ठेवते, त्यामुळे भल्याभल्यांना आपल्या नसलेल्या विद्वत्तेचा पत्ता लागत नाही.

मौन संसर्गजन्य असते. त्यामुळंच मुक्या माणसाशी आपण त्याच्याप्रमाणेच खाणाखुणांनी बोलायला लागतो. आपण काहीही नाही बोललो तरी दुनियेचं फार काही अडत नाही याचा साक्षात्कारही मौनच घडवते. मौन कृतीला चालना देते. समर्थ माणसं जास्त बोलत नसतात. रागानं अबोला धरणं मौन नसतं. “आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः। बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थ साधनम् ॥” बोलणे होतेय तोपर्यंतच बोलावे ; बोलणे बडबड, वटवट, कटकट वाटू लागतेय असे वाटले की थांबावे. चौकशा करू नये, वृथा सल्ले देऊ नये, दुसऱ्यांच्या बोलण्यात नाक खुपसू नये. बहुधा संघर्ष टळावा म्हणून आपल्या परंपरेत मार्गशीर्षात मौनी एकादशी आणि माघात मौनी अमावस्या यांचा समावेश केलेला असावा. मौन हा आपले बोलणे आखीव रेखीव, मितुले, रसाळ बनवणारा परीसच आहे !
मुनी म्हणजे मौन झालेला, काही आधुनिक मुनी मात्र स्वतःचे खाजगी चॅनेल सुरू करून कोलाहल माजवतांना दिसतात. आपलं 99 % बोलणं कचरा पसरवत असतं. मौन मतलब वाणी को संयत करना। व्यर्थ बोलण्याने मन मोकळे होण्याऐवजी रिकामे होण्याची शक्यता असते.
वायफळ व अनावश्यक बोलणे, ही सवय शिस्तीची कमतरता दर्शवते. दुसऱ्यांची बोलती बंद करणं सोपं असतं ; पण स्वतःची बोलती बंद करणं कठीण ! अन्यायाच्या – शोषणाच्या विरुद्ध आणि इतरांच्या भल्याचं तेवढं बोलू एरवी शांत राहू. शांतीत क्रांती करायची. शेवटी विचार करायलाही थोडा अवकाश मिळवायलाच हवा.

— लेखन : प्रा डॉ संजय गोर्डे. संगमनेर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अतिशय उत्कृष्ठ लेख ,प्रत्येकाला माहीत असत पंरतु आचरणात आणता येत नाही ,तुम्ही इतक सुंदर समजावून सांगितलय की मी आतापासून ठरवलय मौन (जेवढे शक्य आहे 😅तेवढ )पाळण्याच .👏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on आमचा वाडा…
कविता बिरारी on पहलगाम
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on स्नेहाची रेसिपी’ – १३
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : ४८
विजया वाळुंज on जशाच तसे
अरविंद विनायक ढवळे on “पद्मश्री” उदय देशपांडे
पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी on माझी जडणघडण : ४८
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यम गोंधळ : संनियंत्रण आवश्यक
Pratibha Saraph on काही अलक
शितल अहेर on जशाच तसे
प्रदीप पाटील on जिचे तिचे आकाश : ८