“माहेश्वरी समाज:घटती लोकसंख्या, समस्या व उपाय” हा अत्यंत अभ्यासपूर्ण, चिंतनशील लेख नुकताच माझ्या वाचनात आला. लेखकाने अतिशय संशोधन करून, विविध आकडेवारी देऊन हा लेख लिहिलेला असल्यामुळे लेखाचे गांभीर्य लक्षात येते.
माहेश्वरी समाज हा प्रामुख्याने उद्योग, व्यवसाय करणारा, आर्थिकदृष्ट्या सक्षम, शांतताप्रिय समाज म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या समाजाची लोकसंख्या कमी होत चालली आहे, ही केवळ त्या समाजाचीच समस्या नसून ती राष्ट्रीय समस्या म्हणून पाहिली पाहिजे. या समस्येवर उत्तरे शोधण्यासाठी सामाजिक स्तरावर विचार मंथन आणि उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे.

खरं म्हणजे लग्न उशीरा करणे किंवा लग्नच न करणे, केलेच तर करिअर आणि किंवा अन्य कारणांमुळे मूल होऊ न देणे अशा स्वरूपाच्या समस्या हिंदू धर्माच्या अन्य समाजांना देखील भेडसावत आहेत. या प्रकरणी हिंदू धर्माच्या देश विदेशातील धुरिणांनी, सर्व संघटनांनी, भारत सरकारने सुद्धा लक्ष घालणं आवश्यक असून, या बाबतीत अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा काय उपाय योजना करता येऊ शकतील याचा विचार केला पाहिजे.
आज जगात युनोशी संलग्न असलेले एकूण १९५ देश आहेत. त्यापैकी १५७ देश हे ख्रिश्चन धर्मियांची बहुसंख्या असलेले आहेत. ५७ देश हे इस्लाम धर्मियांची बहुसंख्या असलेले आहेत. जगाची सध्याची लोकसंख्या ८०० कोटी इतकी आहे. त्यात
ख्रिश्चन धर्मिय ३१.५१ टक्के,
इस्लाम धर्मिय २३.१८ टक्के,
अन्य धर्मीय १६.३३ टक्के,
तर हिंदू धर्मीय १४.९८ टक्के,
म्हणजेच सर्वात कमी लोकसंख्या असलेले आहेत.
खरं म्हणजे हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे. ती एक संस्कृती, म्हणजे जीवन प्रणाली आहे. इतर सर्व धर्म हे हिंदू धर्माच्या नंतर उदयास आलेले आहेत. कोणे एकेकाळी अर्धे जग हे हिंदुमय होते. जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर हे कंबोडिया देशात आहे. थायलंड देशाच्या बँकॉक या राजधानीच्या ठिकाणी असलेल्या विमानतळाचे नाव, सुवर्णभूमी आहे. मलेशियातील काही शहरांची नावे, संस्कृती, चालीरीती त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला असला तरी आजही प्रामुख्याने हिंदू पद्धतीप्रमाणे आहेत.
इतर धर्म, त्या धर्मांचे अनुयायी हे नेहमीच विस्तारवादी, आक्रमक राहिलेले आहेत. तर हिंदू धर्म हा सहिष्णू, इतर धर्मियांच्या भावनांचा आदर करणारा असा राहिला आहे आणि अजूनही तो तसाच आहे. परंतु याचा फटका जगातील हिंदू लोकसंख्येवर होत आहे. त्यामुळे ही जागतिक समस्या असून जगभरातील हिंदू धर्माच्या धुरिणांनी एकत्र येऊन या समस्येवर विचार विनिमय करून उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा माहेश्वरी समाजावरील लेखात ५० वर्षांनंतर माहेश्वरी समाज अस्तित्वात राहणार नाही, अशी जी सार्थ भिती व्यक्त केली आहे, तीच भीती दुर्दैवाने हिंदू धर्माविषयी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या दृष्टीने सर्वंकष विचार विनिमय करून काही तातडीच्या तर काही दीर्घकालीन उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. शेवटी विचारातूनच कृती घडत असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

— लेखक : देवेंद्र भुजबळ.
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अभ्यासपूर्ण लेख.
Dear Devendra ji, it not only very good article it’s valuable and important too.