Home संस्कृती आषाढस्य प्रथम दिवसे

आषाढस्य प्रथम दिवसे

0

ज्येष्ठ महिना संपत येतो तोच रस्त्यावर दिंड्या, पताका घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेची वाट धरत आपल्या लाडक्या दैवताला भेटायला निघतात. विठू नामाचा, ज्ञानेश्वर माऊलीचा, तुकाराम महाराजांचा, संत नामदेवांच्या नावाचा गजर करत करत पंढरीला पोहोचतात. त्या आधी आषाढ महिन्याच्या प्रतिपदेला काही घरात पांडुरंगाचं नवरात्र बसते. नऊ दिवस उपास आणि दहाव्या दिवशी पारणं असतं. परत एकादशीचा उपास. एकंदरीतच चातुर्मासाची सुरुवातच अनशन किंवा फलाहाराने होते कारण पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसातल्या वातावरणामुळे पचनशक्ती क्षीण झालेली असते. आरोग्याच्या द्रुष्टीकोनातून उपास करणं योग्य असतं. पण याच वातावरणात कवी, लेखक किंवा इतर साहित्यिकांना मात्र श्रुंगारिक साहित्य सुचतं आणि अगदी मनमोकळेपणाने ते लिहीतात किंवा व्यक्त करतात. याचंच एक अजरामर उदाहरण म्हणजे कालिदासाचं ‘ मेघदूत’.

आषाढाच्या पहिल्या दिवसाला ‘भारतीय व्हॅलेंटाईन डे‘ असंही म्हंटलं जातं कारण वातावरण अतिशय रोमॅंटिक असतं. प्रणयातूर प्रियकर प्रेयसी जमेल तसा हा दिवस साजरा करतात. पण याचा मूळपुरुष आहे कालिदास म्हणून या दिवसाला ‘कालिदास दिवस’ असंही म्हणतात. मेघदूत ही संस्क्रुत साहित्यातील शिरोमणी कलाक्रुती आहे. पती पत्नींचं उत्कट प्रेम किंवा तेवढाच व्याकूळ करणारा विरह मेघदूतापेक्षा दुसर्या कुठल्याच साहित्यक्रुतीत व्यक्त झालेला दिसत नाही. मेघदूताची सुरुवातच आषाढाच्या पहिल्या दिवसाच्या उल्लेखाने केलेली आहे म्हणून याला ‘संस्क्रुत दिन’ असंही म्हणतात.

माझ्या सद्भाह्याने मला कालिदासाच्या बहूतेक सगळ्या साहित्यक्रुती शिकायला मिळाल्या. म्हणून आजचा हा अल्प लेख प्रपंच माझे गुरुवर्य कै. वसंतराव कुंभोजकर सरांना अर्पित करते.

प्रा सुनिता पाठक

— लेखन : प्रा.सौ. सुनीता पाठक. संभाजी नगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version