Home लेख कारगिल : शबानी की जुबानी

कारगिल : शबानी की जुबानी

1

कारगील जवळ एक शंकराचे देऊळ आहे. १९९९ कारगीलच्या युद्धात कारगिल गावावर वर खूप बॉम्ब हल्ले झाले. असं म्हणतात की या मंदिराच्या आजुबाजूला बॉम्ब पडले पण फुटले नाहीत. जवानांनी बॉम्ब गोळे लांब नेऊन निकामी केले.

भारतीय लष्कराने पुनरुज्जीवन करुन तेच देऊळ आता छान बांधलंय. या देवळाजवळ बॉम्ब खरंच फुटले का नाही ? हा वैयक्तिक विश्वास अविश्वासाच्या सीमारेषेवरचा मुद्दा. पण देऊळ पहाण्या आधी आमच्या गाडीचा सारथी शबानी यानी जी काय सैर घडवली ती अविस्मरणीय.

अशासाठी, की भारत पाकिस्तान सीमारेषेवर असलेल्या गावाच्या अगदी जवळ घेऊन गेला. ते भारत पाकिस्तान सीमेवरचं गांव, तिथे जाताना उंच डोंगरात असलेले बंकर. तिथे सतत ‘तय्यार’ अशा स्थितीत मधे रहाणारे जवान, त्यांना कुमक पोहोचवणारे लडाखी गावकरी, त्यांची सामान वाहून नेणारी खेचरे. या सर्व माहिती बरोबर ओसंडून वहाणारं देशप्रेम.

कारगील युद्ध सुरु झालं तेंव्हा हा पठ्ठा शिकायला श्रीनगरला होता. आईवडील कारगील मधे. काळजीनी त्यांना शोधायला परत गावात आला तेंव्हा समजलं बाजारपेठेसकट आर्मीने सर्व गांव सुरक्षित जागी हलवलं आहे. आईवडील भेटले. जीव भांड्यात पडला. शबानी आणि त्याचे काही मित्र आर्मी ऑफिसर्सना भेटले. “हम आपकी मदद करना चाहतें है”….
“क्या कर सकतें हो ?”…… “
बस, जो भी हमसे बन सके” डोंगराळ, खडकाळ वाळवंटासारख्या या भागात जवानांबरोबर या प्रदेशात लहानाचा मोठा झालेला लडाखी नक्कीच मदत करु शकणार होता. आणि तशी त्यांनी केली पण.

युद्ध काळात जखमी, मृत जवानांना कॅम्प मध्ये परत आणणे, कुमक पोहोचवणे. पडेल ती मदत केली. आर्मीनी बक्षीस दिले तेही नाकारले. “ये जमीन हमारी है, ये देश हमारा है”…… वळणावळणाच्या रस्त्यावर सराईतपणे गाडी चालवत शबानी आम्हांला युद्ध भूमीजवळ नेऊन परत सुरक्षित जगात घेऊन आला.
जवानांना सलाम तर नक्कीच, पण अशा अनेक शबानींना त्रिवार वंदन..

अनघा मुधोळकर

— लेखन : अनघा मुधोळकर
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. देशहिताला प्राधान्य देणारे शबानी यांना मानाचा मुजरा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version