थोर साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख….
गंगाधर गाडगीळ यांचा जन्म मुंबई येथे २५ ऑगस्ट १९२३ रोजी झाला. त्यांचे सर्व शिक्षण मुंबई येथे झाले. १९४४ साली त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयांतून एम.ए. केले. त्यानंतर सुरतच्या प्रेमचंद, मुंबईच्या पोद्दार, सिडनहॅम, रुपारेल महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर १९६४ ते १९७१ पर्यंत ते मुंबईच्या ‘नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड एकनॉमिक्स’ चे प्राचार्य तर १९७१ ते १९७६ या कालावधीत आपटे समूहाचे सल्लागार व त्यानंतर वालचंद उद्योग समूहाचे आर्थिक सल्लागार होते.
गाडगीळ यांना लहानपणापासून वाचन व लेखनाची आवड होती. १९४१ साली वयाच्या १८ व्या वर्षी त्यांची “प्रिया आणी मांजर” ही कथा मासिकात प्रकाशित झाली. १९४६ साली त्यांचा “मानसचित्रे” हा पहिला कथा संग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांचे तीस कथासंग्रह, सहा कादंबऱ्या, सहा प्रवास वर्णने, सहा नाटके, सात समीक्षा ग्रंथ, चाळीस ललित वाड्मयावरील ग्रंथ प्रकाशित झाले. वाड्मयाव्यतिरीक्त त्यांनी इतरही विपुल लेखन केले.
रायपूर येथे १९८१ साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गाडगीळ यांनी भूषवले. १९९६ साली “एका मुंगीचे महाभारत” या त्यांच्या ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. १५ सप्टेंबर २००८ रोजी त्यांचे निधन झाले. श्री गाडगीळ यांना विनम्र अभिवादन.

– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी. कर्जत – रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मराठीतील एका ज्येष्ठ लेखकाचे उचित वर्णन शब्दबद्ध केलेय.