Monday, June 16, 2025
Homeसाहित्यमनातील कविता...

मनातील कविता…

कुसुमाग्रजांची कविता

विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज हे एक श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक आणि समीक्षक होते. समाज निष्ठ लेखन त्यांनी केले. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकार त्यांनी हाताळले. ते काही काळ चित्रपट व्यवसायात होते, नियकालिकांमधून संपादक म्हणूनही ते कार्यरत होते. कुसुमाग्रज जीवनलहरी, छंदोमयी, विशाखा, किनारा, मराठी माती, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, रसयात्रा, मुक्तायन, प्रवासी पक्षी, समिधा हे त्यांचे काही प्रकाशित काव्यसंग्रह.

शिरवाडकरांच्या स्वतंत्र नाटकांत दुसरा पेशवा, कौंतेय, आमचं नाव बाबुराव, ययाति आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट  यांचा समावेश होतो. दूरचे दिवे, वैजयंती, राजमुकुट, ऑथेल्लो व बेकेट ही त्यांची रूपांतरित नाटके आहेत. वैष्णव, जान्हवी व कल्पनेच्या तीरावर या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.

त्यांच्या कथासंग्रहांत फुलवाली, सतारीचे बोल आणि इतर कथा, काही वृद्ध, काही तरुण , प्रेम आणि मांजर व निवडक बारा कथा यांचा अंतर्भाव होतो. कालिदासाच्या मेघदुताचे मराठी रूपांतर त्यांनी केले आहे. अनेक लघुनिबंधसंग्रह तसेच काही बालकथा व बालगीते यांचाही समावेश त्यांच्या लेखनात होतो. याशिवाय संयुक्त महाराष्ट्र आंदोलनांत सहभाग घेवून त्यांनी सत्याग्रह केला. त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्याचप्रमाणे ते साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आहेत.

‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी
माझे मूळ गाव नाशिक. जन्म तिथे झाला नसला तरी वय वर्ष दीड महिन्यांपासून सहव्वीस- सत्तावीस वर्षांपर्यंतचा काळ मी नाशिक येथे होते. ही माझी भूमी ‘स्वर्गादपि गरीयसी’ असण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शा पासून त्रंबकेश्वर, ब्रह्मगिरी पर्यंत, पंचवटी, पांडवलेण्यां पासून सप्तशृंगी मंदिरापर्यंत, अंजनेरी पासून गोदावरी पर्यंत आणि इगतपुरी हिल स्टेशन पासून वाईन यार्डस् पर्यंत अनेक धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरमणीय कारणे असली तरी माझ्यासाठी ती ‘स्वर्गादपि गरीयसी’ असण्याचे कारण म्हणजे कवीवर्य कुसुमाग्रज यांचे वास्तव्य आणि ह्या भूमीवर स्फुरलेली त्यांची स्वर्गाहून सुंदर कविता !

कविता हा काव्यप्रकार मुळातच भावनाप्रधान स्वभावाचे प्रतीक असणारा. जेंव्हा ही भावुकता प्रतिभेच्या हातात हात धरून गाणी गाऊ लागते तेंव्हा तिची कविता होते. मात्र या भावनाप्रधान वृत्तीची जन्मस्थाने मात्र निरनिराळी असतात. ती काही वेळा अगदीच वैयक्तिक असतात आणि काही वेळा मात्र सामाजिक जाणीवा, सर्वांगीण विकास आणि आस्तिक-नास्तिकतेच्या संकुचित मर्यादा ओलांडून त्या पलीकडे असणाऱ्या मानवतावादातून निर्माण होणारी असतात.

अशा मानवतावादातून जेंव्हा भावुकता जन्म घेते आणि मोरपंखी प्रतिभेच्या हातात हात घालून गाणी गाते, त्यापुढे जावून मयूर नृत्याप्रमाणेच मोहक शब्दांचे तोडे तुकडे सादर करून वैश्विक ऐक्याच्या समेवर येते तेंव्हा ती असते कविवर्य कुसुमाग्रज यांची कविता !
या कवितेत आकर्षित करण्याची, मोहात पाडण्याची सारी खुबी असते परंतु त्याचबरोबर ज्वालेतून उसळणाऱ्या ठिणग्या प्रमाणे उसळून आपल्या अंतरी ती ठिणगी आणि एकेक समरूप ज्वाला पेटवण्याचे सामर्थ्यही असते. वेल्हाळ शब्द आणि वैयक्तिक सुखदुःखाच्या पलीकडे कवितेचे अस्तित्व सिद्ध करणारे आणि समभावाची बीजे पेरणारे कवीवर्य कुसुमाग्रज यांचे काव्य.

गाभारा  नावाची त्यांची कविता

‘दर्शनाला आलात ? या..
पण या देवालयात सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे
सोन्याच्या समया आहेत, हिर्‍यांची झालर आहे
त्यांचेही दर्शन घ्यायला हरकत नाही’

कर्मकांडावर आधारलेली  दांभिक वृत्ती, देव आणि भक्तीचे समाज मान्य, परंतु चुकीचे अर्थ, त्या नावाने समाजात पैदा झालेला आणि जोपासला जाणारा अन्याय आणि असमानता यावर त्यांनी  ह्या कवितेद्वारे ताशेरे ओढलेले आहेत.

‘रेशीम साड्या, टेरीन चे सुट समोर दुमडत होते
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते’

यात असलेली मतलबी वृत्ती बद्दलची चीड, त्याची व्यंगात्मक परंतु अतिशय सुंदर प्रतिकात्मक केलेली मांडणी      किंवा

‘पोलीसात वर्दी आम्ही दिलीच आहे
परत ? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना’

ह्यातील हुकूमशाह, भांडवलशाह वर्गावर केलेली टीका आणि श्रद्धेच्या उथळ, अपवित्र भावनेवरील भाष्य अंतर्मुख करणारे आहे.

गाभारा‘ ही कविता मला अतिशय प्रिय आहे कारण ती कविता, स्वतःच्या देहास ‘मंदीर‘  समजून ‘गाभारा‘ म्हणजे मन आणि त्या अनुषंगाने आपली स्पृह-निस्पृह विचारसरणी इतकी वैयक्तिक असू शकते; होऊ शकते आणि समस्त विश्वाला ‘मंदीर‘ समजून ‘मानवतावाद‘ हा देव मानून त्या अनुषंगाने येणाऱ्या उजव्या-डाव्या विचार प्रणाली, समाजात आढळणारी धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि जातीयवादी असमानता आणि असहिष्णुता इतकी वैश्विकही असू शकते; होऊ शकते. असामान्य दैवी प्रतिभेची अशी उदाहरणे कुसुमाग्रजांच्या काव्यात अनेकदा पाहायला मिळतात.

गाभारा‘ कवितेतील शेवटच्या ओळी अश्या…

‘पत्रव्यवहार चालु आहे… दुसऱ्या मूर्तीसाठी
तसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असते
कारण गाभारा सलामत तर देव पचास-‘

ह्यात समाजातील उथळ, अप्पलपोटी आणि हीन दर्जाची, भावनांचाही व्यापार करण्याची वृत्ती ह्या साऱ्याची अभिव्यक्ती किती नेमक्या शब्दात होते.
‘अखेर कमाई’, ‘अहि नकुल’, ‘आगगाडी आणि जमीन’ ह्या देखील अश्याच जातीयता,  साम्राज्यशाही, भांडवलदार वर्ग आणि असहाय्य हतबल दीन दुबळा वर्ग ह्यावर भाष्य करणाऱ्या कविता. परंतु असे असूनही त्यात निराशावाद मात्र नाही. त्यात आहे लढण्याचे सामर्थ्य, आशावाद आणि विजिगीषू भाव !

‘रण काय भयानक – लोळे आग जळात !
आदळती, वळती, आवळती क्रोधात,
जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनाशी झुंझे वादळवात !’

अप्रतिम कल्पनाशक्ती, उत्प्रेक्षा- रूपके यांचा उपयोग, पल्लेदार भाषाशैली आणि ह्या सगळ्या कोंदणात कोहिनूर हिऱ्यासमान लखलखणारा मानवतावाद ! युगप्रवर्तनाचा जो यज्ञ आयोजिला होता त्यात आहुती समवेत होणारे मंत्रोच्चारण म्हणजे कुसुमाग्रजांची  कविता !

कवीवर्य कुसुमाग्रजांची प्रतिभा स्वातंत्र्य संग्रामातही तळपत्या तलवारीप्रमाणे कार्यरत होती. कवीवर्य कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा‘ ह्या काव्यसंग्रहाने स्वातंत्र्य चळवळीतही महत्वाची भूमिका बजावल्याचे मी वाचले आहे.

‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार’

अश्या वीर रसाच्या धगधगत्या ज्वालेने त्या काळातील संपूर्ण तरुण पिढी देशप्रेम, स्वातंत्र्य आणि अन्याय विरोधी पथावर आणली असणार. निधड्या छातीचे, पोलादी मनगटांचे आणि अच्युत निर्धाराचे बंदिवान स्वातंत्र्यसैनिक, त्यांच्या मुखातील गान असणारी ही कविता.

‘क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान…
…मृत्यूंजय आम्ही आम्हाला कसले कारागार
अहो हे कसले कारागार -‘

जन्म भारत मातेसाठी आणि मृत्यूवरही केवळ भारत मातेचाच अधिकार असे मानणाऱ्यांची ती पिढी, सळसळत्या रक्ताची, निस्वार्थ भावनेची आणि अशा काव्याने देशसेवेस प्रेरितांची. याच कवितेतील दोन कडवी मला फार आवडतात त्यातील काही ओळी अश्या…

‘श्वासांनो, जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातिल खंत
सांगा वेडी मुले तुझी ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार’

ह्या ओळींमधून दिसतं ते पोलादी काळजाच्या आत असलेलं, कवीने ह्या स्वातंत्र्यसेनानींना बहाल केलेलं, सोनचाफ्याच्या फुलाप्रमाणे कोमल मन. मृत्युदंडापूर्वी त्यांनी भारत मातेला केलेला अखेरचा प्रणाम, मनाची ती अवस्था जिथे स्वतःच्या अस्तित्वाची किंमत ठरते ती, कोणत्या कारणासाठी त्या अस्तित्वास पूर्णविराम मिळाला त्यावरून ! हे सारं जे शब्दात उतरतं आणि मग आपल्या हृदयात उतरतं ते ह्या कवीच्या अलौकिक प्रतिभेचे दर्शन देणारे आहे.

‘कशास आई भिजवीसी डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज अमुची पेटता प्रेते
उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळाखळा तुटणार
आई, खळाखळा तुटणार’

असे तेजस्वी शब्द देशप्रेमाची जाज्वल्य भावना अधिक प्रदीप्त करतात यात शंकाच नाही.

मनुष्याचं मन मऊ मातीसारखं. त्यावर संस्कार करावा तसा आकार घडतो. परंतु संस्कार म्हणजे तरी काय ? पूजा, व्रतवैकल्यं म्हणजे नक्कीच संस्कार नाही. धर्म भावना जागृत ठेवण्यासाठी आणि जन्माने मिळणार्‍या काही गोष्टींचा वारसा जतन करण्यासाठी जरी त्यांचे महत्त्व असले तरी कर्मवाद आणि नैतिक मूल्ये ही ज्या संस्कारांवर आधारलेली आहेत, ते असतात श्राव्य संस्कार ! पूर्वीच्या काळी देखील यासाठीच कथा, कीर्तने, ओव्या, अभंग, घरातल्या वयस्कर व्यक्तींनी लहान मुलांना सांगितलेल्या गोष्टी यावर भर दिला जायचा. श्रवण संस्कारांनी किती रोपे रुजवली आणि श्रवण परंपरेने ती जोपासलीही. मग अशा तत्व प्रधान, ध्येयासक्त आणि प्रदीप्त काव्याचे संस्कार ज्या तारुण्यावर झाले असतील ती पिढीच्या पिढी बलिदानाला तयार झाली नसती तरच नवल.

कोलंबसाचे गर्वगीत‘ ही देखील अशीच वीर रसाची, कर्मवादावरील दृढ विश्वास दर्शवणारी कविता.

मात्र अश्या वीर रसाच्या, स्वातंत्र्याच्या, अन्यायविरोधी असंतोष व्यक्त करणाऱ्या कवितांच्या सोबतीलाच कुसुमाग्रजांच्या काही अतिशय सुकुमार, प्रेम भावनेचे दर्शन देणाऱ्या कविता आहेत.
पृथ्वीचे प्रेमगीत‘ ही त्यातीलच एक कल्पना सामर्थ्याची गगनभरारी दाखवणारी कविता. शृंगाराची ही रचना, ती देखील भौगोलिक वास्तवाच्या पल्याड जावून झालेली !

प्रेम भावनेचे सर्वांगीण दर्शन देणाऱ्या आणखी दोन कवितांचा इथे उल्लेख करण्याचा मोह मला आवरत नाही.

‘पुरे झाले चंद्र-सुर्य; पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा…
…सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा…
…उधळून दे तुफान सगळं
काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं’

‘ प्रेम ‘ ह्या कवितेतील, प्रेमीची आक्रमकता, सारी आव्हाने पेलून; झुगारून देवून; व्यक्त होवून, खेचून घेवून केलेलं प्रेम अतिशय आकर्षित करणारं !

मात्र ह्याच्या अगदी विरुद्ध भाव प्रदर्शन करणारी जोगीण  कविता…

‘साद घालशील
तेंव्हाच येईन
जितकं मागशील
तितकच देईन…

तुझा मुकुट
मागणार नाही
सभेत नातं
सांगणार नाही

माझ्यामधल्या
तुझेपणात
जोगीण बनून
जगत राहीन.’

ह्यात तिचा असणारा संयम, मर्यादाशील स्वभाव मोहून टाकणारा.
‘जे हवंय तुला, ते मिळवून राहा’ असे आवाहन तारुण्याला ज्या ‘प्रेम’ कवितेने केलं त्याच कवीच्या ‘जोगीण’ कवितेने निरपेक्ष प्रेमाच्या परमोच्च भावनेची जाणीव करून दिली.

कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ कवितेचा उल्लेख केल्याशिवाय हे आजचे सोपान पूर्ण होवूच शकत नाही.
किती साधे सोपे शब्द, एक लहानसा प्रसंग आणि त्याचे केलेले वर्णन परंतू…

‘खिशाकडे हात जाताच
हसत हसत उठला
पैसे नकोत सर
जरा एकटेपणा वाटला’

स्वाभिमानी वृत्ती दाखवण्यासाठी धारदार शब्दाची गरज आहे म्हणून कोणी सांगितलं ? केवळ एक कृती आणि त्याची दोन ओळीत उभी केलेली शाब्दिक आकृतीही ती दाखवण्यासाठी पुरेशी ठरते.

‘मोडून पडला संसार
तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून
नुसते लढ म्हणा’

स्वसामर्थ्याचा दृढ विश्वास, जीवन संग्रामात न हरता लढण्याची वृत्ती आणि गुरू बद्दलची अढळ भक्ती हे सारं केवळ ह्या चार ओळीत सामावलेलं आहे.

आणि आता सरते शेवटी माझी सगळ्यात लाडकी कविता…

‘नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही…
गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा
मंजिल की जयाची तारांगणात राही’

या कवितेचे रसग्रहण करण्यास मला शब्द अपुरे पडतील, अपुरे पडतील म्हणणं चुकीचं आहे, मला शब्द सुचणारच नाहीत. त्यामुळे असे एक नाते प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात लाभो अशी प्रार्थना करते आणि इथेच थांबते.

कविवर्य कुसुमाग्रज ह्यांचे केवळ काव्य नसून एक स्वतंत्र विश्व आहे, कविवर्य कुसुमाग्रज एक व्यक्ती नसून एक विद्यापीठ आहे कविवर्य कुसुमाग्रज यांची कविता ही ज्वाला नसून वणवा आहे त्याची ठिणगी एकदा आपल्या प्रेरणा विश्वात पडली की हा तेजस्वी वणवा आपल्या भावविश्वात पसरत जातो. कवीवर्य कुसुमाग्रज, आपल्याला माझा प्रणाम 🙏🏻

आपण ज्या मानवतावादी विचारसरणीचे पुरस्कर्ते आहात त्याचाच ‘रंग’ लेवून आलेली माझी ही कविता आपले चरणी अर्पण.

रंग
इंद्रधनू चे रंग एकदा विनाकारण भांडले,
‘मीच खरा उजळ’ म्हणत पृथ्वीवर सांडले.
ज्याने त्याने गोळा केले आपलेच कण; आपल्याच छटा,
झोत उतरले दंगल करत ‘मीच कसा मोठा’
ओलांडून अपुली रेषा साऱ्या चित्रावर पसरले,
देखावे कुरूप करत एक मूल तत्व विसरले.
नांदतील सहिष्णू सृष्टीचक्री; उदात्त असा वारा पळेल,
तेंव्हाच होतील एकरूप आणि शुभ्र शांत धरा मिळेल.
युग लोटले विशाल आकाश काळोख साहतआहे,
‘रंग होतील समजूतदार’ वाट पाहत आहे.
एक दिवस येईल खचित;
रंगांमध्ये वाद नसेल, त्यांना त्यांचा खरा रंग दिसेल,
अंतरंगी तुषार उडतील, स्वच्छ सोनेरी प्रकाश असेल,
क्षितिजावर मग पुन्हा एकदा इंद्रधनूची कमान दिसेल.

दिनांक २७ फेब्रुवारी १९१२ रोजी जन्मलेल्या कुसुमाग्रजांचा शारीररूपी मृत्यू दिनांक १० मार्च १९९९ रोजी जरी झाला तरी ते त्यांच्या प्रतिभेच्या रूपाने अमर आहेत.

डॉ गौरी जोशी – कंसारा

– लेखन : डॉ. गौरी जोशी – कंसारा, न्यू जर्सी, अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments