Home कला अजेय : “ऋतूआरोह”

अजेय : “ऋतूआरोह”

1

ठाण्यातील अजेय संस्थेचा 14 वा वर्धापन दिन ‘ऋतुआरोह’ नुकताच संपन्न झाला. ह्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते आणि माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर आणि लेखिका, सौंदर्यतज्ञ डॉ.स्मिता दातार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

संस्थेच्या १३ व्या वर्षपूर्ती विषयी तसेच पुढील वाटचाली विषयी संस्थेचे अध्यक्ष गौरव संभूस यांनी मनोगत व्यक्त केले. संस्था आणि आजची गरज, बदलती आव्हानं, नवीन आलेली माध्यमं, आजच्या युगात संस्थेची खरोखर गरज आहे का, संस्थेमुळे व्यक्तिमत्त्व विकास होतो, संस्थेमुळे ओळख मिळते, अजेय मधल्या कलाकारांना संस्थेमुळे ओळख मिळाली, अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. संपूर्ण सोहळ्याचे निवेदन कार्तिक हजारे-समीर शिर्के या जोडगोळीने केले.

अजेय संस्थेच्या महिला वर्गाने ‘गडकरीतील संध्याकाळ’ हे नाट्य सादर करीत गडकरी रंगायतन विषयी आणि नाटकाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. ह्या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन साधना पाटील यांनी केले होते तर नम्रता दांडेकर, हर्षला ढोमाणे, प्रज्ञा सावंत, पल्लवी गोडबोले आचार्य, प्रतिभा चांदूरकर, सीमा गोडबोले या कलाकारांनी ते सादर केले.

अजेय संस्थेचा आगामी प्रकल्प हा Webseries असून ‘ आगंतुक प्रकरण ‘ या मालिकेमधील काही व्यक्तिरेखांचा ‘ Character Walk’ या वेळी सादर झाला. ह्या “Character Walk’ ची Choreography कार्तिक हजारे ह्याने केली होती. ह्यात एक टीम म्हणून मालिकेतील सर्व व्यक्तिरेखांची प्रेक्षकांना ओळख करून देण्यात आली. ‘आगंतुक प्रकरण ‘ या मराठी Webseries चे लेखक दिग्दर्शक डॉ.क्षितिज कुलकर्णी असून सध्या त्याची प्रस्तावना लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

या नंतर वर्धापन दिनानिमित्त अजेय संस्थेशी संलग्न असलेल्या शतकोटी रसिक या व्हॉटस् अप समुहातील कवींचे कवी संमेलन सादर झाले. ह्या कवी संमेलनात किरण बरडे, विकास भावे, मुग्धा फाटक, प्राजक्ता दैत, शकीला भिंगारे, सुनील शिरसाट,अवधूत यरगोळे, कार्तिक हजारे यांनी भाग घेतला यापैकी काहींनी अजेय संस्थेच्या संकल्पनांवर व काहींनी मुक्त कविता सादर केल्या. काव्यसंमेलनाचे निवेदन विदुला खेडकर आणि अस्मिता चौधरी यांनी त्यांच्या प्रसन्न शैलीने पार पाडले.

कवी संमेलनानंतर संस्थेचे संस्थापक डॉ.क्षितिज कुलकर्णी यांनी संस्थेच्या आगामी प्रकल्पांविषयी माहिती दिली. ज्येष्ठ कवी स्वर्गीय म.पां.भावे यांच्या नावाने “काव्ययात्रा” या उपक्रमाद्वारे एक विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन डॉ.क्षितिज कुलकर्णी यांनी शतकोटी रसिक साहित्य समूहाला व उपस्थितांना केले.

काव्य, समीक्षा, अभिनय यांचे संशोधन केंद्र अजेय संस्था सुरू करत असून त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत रसिकांनी करावी असे आवाहन डॉ.क्षितिज कुलकर्णी यांनी केलं. सध्या संशोधन केंद्राचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

अखेरीस मराठी webseries ‘आगंतुक प्रकरण. चा मुहूर्त ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांच्या हस्ते करण्यात आला. जयंत सावरकर यांच्या उपस्थितीत एका दृश्याचे चित्रीकरण पार पडले. ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांनी आपल्या बोलण्यातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले व अशा रीतीने एका शानदार सोहळ्याची सांगता झाली.

गौरव संभूस

– लेखन : गौरव संभूस. निर्माता, अजेय संस्था, ठाणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. संस्था खूप चांगले कलाकार घडवत आहे. तिला मी देखील आर्थिक मदत देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version