नमस्कार, मंडळी.
पुणे येथील आपल्या लेखिका राधिका भांडारकर यांचा
“अमोलची वटपौर्णिमा” हा कालचा लेख आपण वाचलाच असेल.
याच अनुषंगाने काही ठिकाणी कालची वटपौर्णिमा अभिनवरित्या साजरी करण्यात आली, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
आपल्याकडे आलेल्या काही बातम्या संकलित करून पुढे देत आहे.
सर्व संबंधितांचे मन:पूर्वक अभिनंदन.
– संपादक
१. नांदेड जिल्ह्यात मोहीम
नांदेड जिल्हा परिषदेच्या कल्पक आणि धडाडीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकुर-घुगे यांच्या पुढाकाराने कालपासून नांदेड जिल्ह्यात ९ हजार वडांची झाडे लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्या हस्ते व इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

२. मढवी दांपत्याचे वृक्षारोपण
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याने श्री किरण मढवी यांची वटवृक्ष सामाजिक संस्था ही सातत्याने कार्यरत असते. वटपौर्णिमे निमित्त काल श्री किरण मढवी यांनी सपत्नीक नवी मुंबईतील उलवे येथे वट वृक्षरोपण करुन समाजात आदर्श निर्माण केला आहे. त्याबद्दल सर्वच स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.

३. नव वरवधूचे वृक्षारोपण
शांतीदूत परिवाराच्या पुढाकाराने, कालच विवाहबद्ध झालेल्या उमरगा येथील श्रद्धा व प्रवीण जाधव या
वधुवरांनी पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन, सामाजिक बांधिलकी जपत वडाचे रोपण करून अभिनव पद्धतीने आपला विवाह साजरा केला.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी” म्हणत अनेकांनी त्यांच्याबरोबर वेगवेगळी झाडे लावली.
पर्यावरण रक्षणासाठीचे हे कौतुकास्पद पाऊल आहे.
श्रद्धा व प्रवीण यांचे विशेष अभिनंदन
झाडे लावा झाडे जगवा.
शांतीदूत परिवार….

४. सावित्रीच्या लेकींची वटपौर्णिमा
निसर्गाप्रति असणारी आस्था आणि प्रेम हे देखील एखाद्या संवेदनशील मनाचं मोठेपण दर्शविते. आणि तीच आस्था आणि प्रेम हे एखाद्या संपूर्ण परिवाराच्या हृदयात सामावलेलं असणं हा दुर्मिळ योगायोगच म्हणावा लागेल. आणि ह्याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळाले ते पर्यावरण प्रेमी, वन्यजीव प्रेमी केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या सहचारिणी, निसर्गप्रेमी सावित्रीची लेक सौ राणीताई मुंबईकर आणि सौ सुजाताताई कडू व सौ प्रतिक्षादीदी म्हात्रे या निसर्गप्रेमी सोबतिनींच्यां रूपानं. या तिघींनी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील वेश्वी गावातील एकविरा देवी मंदिराच्या वाटेवर वटवृक्षाच्यां झाडांची लागवड करून वटपौर्णिमा साजरी केली. सण, संस्कृती सोबतच विज्ञानाची कास धरणाऱ्या ह्या सावित्रीच्या लेकीनी वटवृक्षांचीं लागवड करत पर्यावरणाच्या संरक्षणा सोबतच ह्या मानवजातीला ऑक्सिजन रुपी नवसंजीवनी देणाऱ्या ह्या शतायुषी महावृक्षांची लागवड करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

केअर ऑफ़ नेचर संस्थेच्या या निसर्ग प्रेमींचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800