Sunday, July 6, 2025
Homeयशकथाअमलझरीचा अरविंद

अमलझरीचा अरविंद

आध्यात्मिक तेजोमंडळाचे प्रकाशसूर्य म्हणजे माझे हदयस्थ स्नेही श्री. अरविंद करंबळेकर सर होय.

सांगली जिल्ह्यातील निपाणीपासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अमलझरी या छोट्याशा गावचे मुळ रहिवासी असणारे, मनाने अत्यंत खंबीर, निर्मळ, सहृदयी, सतत हसत राहात दुस-याच्या मनात स्नेहभावाचा प्रसाद वाटत जगण्याची कला अवगत असलेले अरविंद सर.

प्रचंड स्मरणशक्ती, सर्वांशी प्रेमळपणाने बोलणे, कधी प्रसंग आलाच तर परखड बोलून आपणही काही कमी नाही हे दाखवणारे सर, दिवसभर शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेत त्यात रमणारे सर, एकदा मैत्री झाली की, आपले अनुभव सांगून हसवणारे सर, त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येकजण मोग-याच्या गंधात भृंगासारखा रमून जातो आणि माणूसपणाच्या गंधात न्हाऊन जातो.

२००७ साली मनात काही निश्चय करुन सर सांगलीहून अमलझरीला पोहचले. दत्त मंदिराचा छोटासा गाभारा पाहून त्यांचे डोळे क्षणभर पाणावले. मंदिराभोवती वाढलेले गवत, रानफुलांच्या वेली, रानझेंडूची उंचच उंच वाढलेली झाडे, काटेरी झुडुपे, अवतीभोवती पडलेल्या जळाऊ लाकडाचा ढिग, वापरून जुनी झालेली पोती, या साऱ्यांतून जाणारी छोटीशी पायवाट, समोरचे भव्य प्रवेशद्वार उदास उदास झालेले, डाव्या बाजूस असलेले मारुती मंदिर झाडाच्या, झुडपाच्या, वेलीत लपल्यासारखे दिसत होते.

हे सर्व पाहिल्यावर सरांचे मन बेचैन झाले, उदास झाले. काहीतरीं करायला हवे याच विचारात असतांना अठ्ठावीस वर्षाचा इतिहास डोळ्यांसमोरुन सरकू लागला. याच मंदिरात व्यतीत झालेले दिवस आठवू लागले. कावडीने पाणी भरतांना चिंब भिजलेल्या क्षणांच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या. आजोबांच्या कडक शिस्तीत परवचे, श्लोक म्हणतांना होणारी घालमेल आठवू लागली, याच मंदिरात अभ्यास करतांना साथ देणारा दिवा आठवू लागला. म्युनसिपल हायस्कूल ते देवचंद काॅलेजचे दिवस जागे होऊन मनात रुंजी घालू लागले. अजाणतेपणी प्रथम श्रेणी मिळाल्याचे कळताच होणारा आनंद आठवू लागला. आधी भोर (पुणे) आणि त्यानंतर सांगलीपर्यंतचा घडलेला प्रवास आठवून मन सुन्न झाले.

सांगलीच्या दिशेने गाडी पळत होती मात्र विचाराची चाके मंदिराभोवतीच फिरत होती. लग्नाच्या निमित्ताने पुण्यास जाण्याचा योग आला पण तिथेही मनात मंदिर आणि त्याचा परिसर नाचत होता. सहज बसल्या बसल्या पाहुण्यांजवळ मनोगत व्यक्त केले “गावी मंदिराचा जीर्णोद्धार करावा म्हणतो” अन् चमत्कार व्हावा तसा प्रतिसाद मिळाला. जमलेल्या पाहुण्यांनी थोडा निधी सरांच्या हाती दिला, ‘ठेव, चांगलं कार्य आहे’ असे शब्द त्यांच्या मुखातून येऊ लागले, त्यावेळी ‘मी फक्त मनात विचार करतोय..’ असे सांगण्याचा सरांनी प्रयत्नही केला पण त्यांना कुणी बोलायची संधीच दिली नाही.

काही दिवसांनी सर अमलझरीला पोहचले पण इथपर्यंतचा प्रवास तसा सोपा नव्हता. त्या जागेची कागदपत्रे नव्हती. सुदैवाने साथ मिळत गेली. एक एक गोष्ट हाती येत गेली. त्यांच्या सा-या हालचाली अप्पा इंगळे पाहत होते. काही तरी चांगले होत आहे, यात आपणही सहभागी व्हावे असे त्यांना वाटले. एक एक काम होऊ लागले.

मंदिराचा मुख्य भाग न हलवता बदल करायचा निश्चय केला. मंदिराचा कळस पायापासून छत्तीस फूट उंच ठेवून कळस चढवला. या वेळी मुलगा सिव्हिल इंजनिअर महेशची मोलाची साथ मिळाली. त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन केले. आतील भागात मुळ भिंत न पाडता उंची वाढवण्यात आली. ऐटीने पत्रे बसवले, पाहुण्यांनी स्वतः हाताने रेखाटून दत्तात्रयाचे भले मोठे चित्र दिले. कोणी कासव हाती ठेवले. भर टाकून जमिन समतल केली गेली. मग गावच्या सहभागाने पुढचा सभामंडप बांधण्यात आला. हनुमान मंदिराच्या भोवती फरशी बसवण्यात आली.

ग्रामपंचायतीने पाण्याची सोय केल्यावर पश्चिमेकडील उजव्या बाजूला संडास बाथरूम व पिण्याच्या पाण्याची टाकी बसवण्यात आली. विजेचे दिवे उजळून निघाले. साउंड सिस्टिमची सोय होताच गाण्याचे स्वर निनादू लागले. हार्मोनियम, तबला, टाळ, चिपळ्या, यांच्या समवेत अभंग, वारकरी भजन गाणाऱ्यांच्या स्वरांचा झनकार ऐकू येऊ लागला.

गावातील महत्वाच्या सभा, प्रशिक्षण, बैठका तिथे होऊ लागल्या. चिमण्यासाठी तांदूळ पाण्याची सोय होताच, मंदिरात त्यांचा स्वर गुंजू लागला. समोरच्या बकुळ झाडांना हिरवीगार पालवी फुटून फुलांचा सडा पडू लागला. दर्शनासाठी हळूहळू लोक येऊ लागले. एखाद्या झाडावर सांयकाळी पक्षांचा थवा निवाऱ्यासाठी झेपावत यावा त्याप्रमाणे अरविंद सरांचे आगमन होताच सरांच्या भोवती लोक गोळा होऊ लागले. हातात पेन वही घेऊन सर त्यांच्या समस्या ऐकून त्यांना सल्ले देऊ लागले. तृप्तमनाने आलेले सर्वजण मनोमन धन्यवाद देत. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वलय उमटू लागले.

या गावातील बरीच मुले आपणहुन अप्पा इंगळे यांच्या समवेत सरांना निरपेक्ष भावाने मदत करु लागली.
संताच्या मनातून निघणारी वैचारिक कंपने व लहरी वातावरणात सातत्याने पसरत असतात. त्या विचार लहरीना आणि त्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या अलौकिक सामर्थ्याला कोण अडवू शकणार ? त्यांच्या निर्मळ आणि शक्तिशाली विचारलहरी खूप दूरवर पसरत राहतात आणि जगाच्या शुध्दीकरणात मोठा हातभार लावतात कारण या विचारलहरी सहस्त्रावधी लोंकाच्या मनात शिरून त्यांच्यावर अनुकूल परिणाम करीत राहतात यात तिळमात्र संशय नाही.

अहो, हेच पहा ना, अमलझरीतील तरुणाई दत्ताचे भक्त बनून सरांच्या सानिध्यात सत्कर्म करीत आहे. भावी पिढीच्या मनात संस्कृतीची बीजे पेरत हा अरविंद उच्चपदी पोहचून मनाच्या, हृदयाच्या सिंहासनावर कधीच विराजमान झाला आहे. अप्पा इंगळेच्या मृदू बोलण्यात कमालीची लीनता, आदरभाव, आपलेपणा, सच्चाई ओतप्रोत भरलेली दिसते.

गावातील मुलांच्या मदतीने प्रभावित होऊन अरविंद सरांनी प्रत्येकाला एकेक घड्याळ देऊ केले. त्याही मुलांनी नम्रपणे त्याचा स्वीकार केला. त्यांच्या नावाची यादी वाचली तरी सरांच्या प्रभावाची, भक्तिभावाची कल्पना येईल . विलास सुरेश इंगळे, कुमार महादेव कंकनवाडे, दादा वसंत पाटील, युवराज भीमराव कंकनवाडे, सुरज महादेव पाटील, नयन रामा रेपे, दत्ता कृष्णा पाटील, सतीश मनोहर कंकनवाडे, अमर मारुती रेपे, अतुल शाम कोकरे, सनी शिवाजी देसाई, मल्लू रामा कंकनवाडे, आप्पा रामा लुगडे, अमोल अनिल कोकरे, बंडा दत्ता कदम, आशिष आप्पा खोत, प्रमोद शामा खोत, गणेश सुनिल कदम, सतीश अशोक खोत, यशवंत दत्ता ढापळे, हरी दत्ता रेपे, प्रथमेश सुनिल कदम, बाळू रघुनाथ खोत, वसंत बंडू रेपे, शांताराम कांबळे, मारुती कांबळे, परशराम पुजारी, अभिजीत शशिकांत कौंदाडे, आप्पा सुरेश इंगळे, चंद्रकांत महादेव खोत या मुलांच्या मनात सरांनी संस्काराची रूजवण केली.

अशा दोनशेपेक्षा जास्त जणांनी दारु सोडली. व्यसनापासून परावृत्त झाले. सरांच्या पदस्पर्शाने अनेक कुटूबात हास्याचे सुखाचे, कौटुंबिक सलोख्याचे वातावरण तयार झाले. हिच मंडळी दुस-यांना व्यसनापासून मुक्त करण्याचे काम करीत आहे.

अलमझरी गाव आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.आपण आपल्या कृतीचे बीज पेरतो आणि सवयीचे फळ त्यातून निर्माण करतो सवय नामक बीजाचे रोपण केले तर चारित्र्य, स्वभाव, किंवा नशीब नावाच्या फळाची प्राप्ती होते. दैव अनुकूल करुन घेऊन अप्रकट सामर्थ्याला प्रकट करुन त्याचा उपयोग केला तर अलौकिक कार्य सिध्दीस जाते.. ते कार्य म्हणजे अमलझरी येथील दत्त मंदिरात ब्लाँक बसवून केलेले थोर कार्य आणि बसवण्याचे काम करणारा त्याचे पहिलेच काम असल्याने तोही विनामोबदला काम करतोय. असा अलौकिक बदल घडविणाऱ्या सरांना लाख लाख मानवंदना. सरांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना दत्तात्रया चरणी करतो.
सरांच्या कर्तबगारीचा सूर्य असाच तळपत राहो हीच सदिच्छा !

मुबारक उमराणी

– लेखन : मुबारक उमराणी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. इतके छान वर्णन केलंय आमच्या काकांचं …… आमचे अरुकाका खरंच उमदे, हरहुन्नरी, धडपडे व संपूर्ण सकारात्मक वृत्तीचे आहेत. त्यांच्याशी थोडा वेळ जरी बोललो तरी मन उत्साहाने भरून येते. अमलझरी मंदिराचा जीर्णोध्दार करुन काकांनी येणाऱ्या पिढयांसाठी फार मोठे कार्य करुन एक नवा आदर्श घालून दिला आहे. काकांना मनापासून सलाम …..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments