तर मंडळी. आपण बोलत आहोत जगातल्या प्रसिद्ध देशा बद्दल, म्हणजे अमेरिकेबद्दल.
देश प्रसिद्ध कसा होतो, तर त्या देशातल्या फक्त चांगल्या गोष्टी जगासमोर आणायच्या. आपल्याला तर आधी दोष शोधायची सवय आहे. हो की नाही ?
रोजच्या रोज अध्यात्मिक गोष्टी, पोस्ट, विचार दुसऱ्यांना सांगणारे आपण आधी चुका शोधतो आणि नुसते शोधत नाही, तर त्याची बोंबाबोब ही करतो.
अमेरिका हा देश शंभर टक्के बरोबर आहे का ? नाही. नक्कीच नाही. कुठलाच देश, कुठलीच व्यक्ती शंभर टक्के बरोबर नसते. फक्त प्रत्येक व्यक्तीला वाटते मात्र, मी शंभर टक्के बरोबर आहे असं..
अर्थात जोक्स अपार्ट. अमेरिका ही इतकी परफेक्ट नाही..
उलट कित्येक बाबतीत आपला भारत देश जास्त चांगला आहे.
देश चांगला आहे, नागरिक चांगले आहेत. तरी आपण नंबर एक ह्या स्थानी नाही.
असे का ? तर कारणं अनेक आहेत.
तर आता पुढचा प्रवास. आम्ही गाडीतून घरी जात असताना रस्त्यावर खूपच अंधार होता.
इतका प्रगत देश आणि इतका अंधार! डाऊन टाऊन सोडलं तर रस्त्यावर अगदी मिणमिणते दिवे.
आम्ही रहात होतो तो भाग ही खेडेगावा सारखाच होता.
मोठी शहरे सोडली तर इतका अंधार ? आम्हाला फारच आश्चर्य वाटले..
दुसऱ्या दिवशी उठलो, खिडकी उघडली तर घरातूनच सूर्याचं मनोहर दर्शन. लालसर पिवळी प्रभा पसरलेली.
मन प्रसन्न झाले. अगदी नागावची आठवण आली.
आसपास प्रचंड शांतता. एवढी की झाडाच्या गळणाऱ्या पानांचाही आवाज. एवढ्या शांततेची आपल्याला सवयच नाही.
मला दिवसाच सर्व हॉरर मूव्हीचे सीन आठवायला लागले. हवा मात्र शुद्ध. फॉलमुळे वेगवेगळ्या रंगांचा गालिचा जमिनीवर पसरलेला.
वर निळे आकाश, सर्वत्र हिरवळ, जमिनीवर फॉल मुळे पडलेली रंगीबेरंगी पान..
पण फुलं मात्र नाहीत ह.. ही सुंदर, निरनिराळ्या फुलांची देणगी आपल्यालाच मिळाली आहे.
खूप दमल्यामुळे दोन दिवस घरीच आराम केला. मग तिसऱ्या दिवशी सामान आणण्यासाठी वॉलमार्टला गेलो.
तिथे स्वतःच्या गाडीशिवाय पर्याय नाही. टॅक्सी, ओला, उबर, बस अशी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस फारच कमी प्रमाणात आहे.
खेडेगावात तर नाहीच. असली तरी प्रचंड महाग आहे. परवडणारी नाहीच.
एवढ्या मोठ्या प्रगत देशात ट्रान्सपोर्टची अशी अवस्था आहे. ह्याचे आश्चर्य वाटले.
वॉलमार्ट ला गेलो. अपंग व्यक्तीही स्वतः गाडी चालवत येऊन, स्वतःचे काम, स्वतः करते हे बघून कौतुक ही वाटले आणि कोणी त्यांच्या मदतीला नाही म्हणून वाईट ही वाटले.
सगळीकडे खूप स्वच्छ्ता. नजरेत भरणारी. ते बघून आपल्याकडे अशी स्वच्छता नसते, ह्याची जाणीव झाली.
मला आठवते, माझ्या लहानपणी आई सांगायची की कपडे फाटके असतील तरी चालतील, पण स्वच्छ धुतलेले पाहिजेत. म्हणजेच स्वच्छतेचे धडे आपल्याला लहानपणापासून मिळालेले आहेत.
मग ते आपण मोठं झाल्यावर कसे विसरतो ? आपण आपले घर स्वच्छ ठेवतो आणि बाहेर घाण करतो. लहानपणापासून जे आपण शिकतो, ते आपण कसे आणि का विसरतो ? रस्ता, सार्वजनिक ठिकाण, सार्वजनिक जागा, बागा, काहीही असो, आपण ते अस्वच्छ ठेवणार आणि अमेरिकेत तिथे स्वच्छ्ता ठेवतात..देशाची संपत्ती आपली संपत्ती असे मानतात.
म्हणजे अमेरिकेत ही तेच शिकतात, जे आपण शिकतो. पण ते विसरत नाहीत. हा स्वच्छतेचा नियम ही रक्तात भिनलेला. म्हणजे तिथे अस्वच्छता करणारे नाहीत का ? आहेत की पण प्रमाण कमी आहे. आपल्याकडे अस्वच्छता करणारे लोक जास्त आहेत तर तिथे अस्वच्छता करणारे लोक कमी आहेत.
नियम पाळणारे, स्वच्छ्ता ठेवणारे, दुसरा घाईत असेल तर त्याला पुढे जाऊ देणारे असे नागरिक जास्त प्रमाणात आहेत.
आपल्याकडे नियम तोडला की “मी किती ग्रेट आहे” म्हणत कॉलर ताठ करत फिरणारे जास्त आहेत. त्यातून राजकारणी लोक, त्यांच्या आसपास वावरणारे त्यांचे चेले तर बघायलाच नको. जणू सगळा देशच खिशात घेऊन फिरतोय असा आविर्भाव.
असे ग्रेट लोकं त्यांच्याकडे कमी आहेत. राजकारण, पैसा, सत्ता असे सगळे त्यांच्या डोक्यात जरा कमी जाते. मी म्हणजे कोणीतरी अशी भावना जरा कमीच आहे. दुसऱ्याला मान, सन्मान देणं हे तर त्यांच्या कडून शिकावे. खरे तर आपल्याला हे ही लहानणापासूनच शिकवलं आहे.
आपल्या देशातील बहुसंख्य लोकांनी हे असे वागणं सोडलं ते कंटाळून. त्याचा काही फायदा नाही, असे वाटत गेलं.
ह्याला कारणीभूत समाजातले ते लोक, ज्यांना चुकीचे असूनही समर्थन मिळत गेले.
पण आता मात्र आपण एकत्र आले पाहिजे. आपले चांगले घेऊन ते पुढे गेलेत.
आपण आपले चांगले पुढे न्यायलाच पाहिजे.
एवढ्या प्रगत अमेरिकेत एवढा अंधार का, ह्या प्रश्नाचं उत्तर अजून तसच ठेवते..
थोडी उत्कंठा वाढवत…
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर. ठाणे
– संपादन: देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800