आपल्याला जवळपास रोजच सूर्याचं दर्शन घडत आणि सूर्य हा आपला हक्काचा अशी आपली भावना आहेच..
पण ज्या देशांमध्ये दुपारी तीन वाजता किंवा चार वाजता अंधार होतो, त्यांना विचारा सूर्याची किंमत !
तेच जाणू शकतात..
आज क्लायमेट सनी आहे, हीच गोष्ट काही देशात उत्साह निर्माण करणारी आहे..म्हणजे उत्सव साजरा करणारी अस म्हणल तरी चालेल..
तशीच अमेरिकेत ही…..
त्यांच हवामान खात अतिशय उत्तम आणि परफेक्ट काम करतं.. जवळ जवळ संपूर्ण वर्षाचा हवामानाचा अभ्यास असतो अस म्हणाल तरी योग्य होईल…
त्यांच्याकडची सगळीच खाती, न खाता उत्कृष्ठ काम करतात, हे विशेष..
आणि ह्या सर्व गोष्टीचं आम्हाला खरच खूप कौतुक वाटलं..
“साहेब ..कायतरी घेऊन काम करून टाका..” अशी सवय तिथे कोणी कोणाला लावली नाही आणि कोणी घेतली नाही..
कॉपोर्रेट लेव्हलवर जरी काही होत असेल, तरी वरपासून खालपर्यंत अशी सवय फार कुठे दिसली नाही..
मात्र कामाला जेवढे दिवस लागतील, त्याहून जास्त लागले तरी का ते उत्तर देण अपेक्षित नाही आणि मी नेहमी परफेक्ट ह्या नादात चूक कबूल करण, जरा कमीच. तेवढा अहंकार मात्र कुठे कुठे डोकावतो..
अर्थात हा अहंकार आजकाल वाढलाच आहे म्हणा. मग देश कुठलाही असो..
जे जे चांगल आहे, ते ते घ्यावे अशी शिकवण आपल्याला आधी पासून मिळाली आहेच की. म्हणून त्यांच ही जे चांगल आहे त्याचा ही उल्लेख केला आहे.
आपल्या पूर्वजांना सूर्याचं महत्व आधीच कळल असेल..
म्हणूनच गायत्री मंत्राची निर्मिती झाली असेल.
मला एक अमेरिकन मैत्रीण म्हणाली जर आमच्याकडे सूर्य रोज उगवत असता तर आम्ही त्याचा उपयोग सौर ऊर्जेसाठी केला असता..निसर्ग वाचवला असता. आणखी शुद्ध हवा मिळाली असती..!
मी मनात म्हणल, “बाई इथे आल्यावर जाणवलं तुमचं निसर्ग प्रेम आणि शुध्द हवा म्हणजे काय ते..”
पण मनातच बोलले ह..देशप्रेम सोडायचं नाहीच..काहीही होवो.. हो ना..! पण हे ऐकून मला वाटल की आपल तोंड कायम पश्चिम दिशेला..त्यांनी केलं की आपण कॉपी करणार..हेच आपल्याला शिकवलं गेलय आधी पासून.
अमेरिकेत प्रचंड थंडी असते…जवळपास सात ते आठ महिने..त्यातले काही महिने तर हाडं गोठवणारी थंडी असते..मग हीटरचा प्रचंड वापर करावा लागतो.. त्यामुळे वीज अतिशय जपून वापरावी लागते..
खास करून स्वतः च घर असेल, जास्त करून स्वतःचच घर असत, मग खूप खर्च येतो..रेंटवर रहात असाल तर मालक सर्व मेन्टेन करतो. तेही महागच असत.
मग वीजेची काटकसर म्हणून घराच्या बाहेर, घरात अगदी मिणमिणते दिवे असतात..
इतके मिणमिणते की आपल्या भारतात खेड्यातही भरपूर उजेड आहे हे जाणवतं इतके..
खरच भारतासारखं निसर्गाचं वरदान कुठल्याच देशाला नसेल.
अमेरिकेत सुरवातीला तर असा अंधार बघून भीतीच वाटते..
आणि ह्या अंधाराचा फायदा चोर, गुंड घेतातच. एवढा मोठा प्रगत देश, पण सुरक्षितता अजिबात नाही.
का आणि त्याची कारणं पुढच्या भागात..
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800