जगभर जातीयवाद कधीपासून सुरू झाला हा अभ्यासाचा विषय आहे. जुन्या गोष्टी, ज्या लिहून ठेवल्यायत त्यात किती तथ्य आहे हे ही माहित नाही. पण त्याची प्रखरता मात्र सगळीकडे आहे. देश कुठलाही असो.
अमेरिकेत ही छुपा जातीयवाद कधी कधी जाणवत होता. आपल्या देशासारखाच ! कोणी उघड बोलते, तर कोणी मागून.
ह्या बाह्य रुपाचं अजूनही महत्व आहे ह.. अगदी सगळ्या देशात. मग ह्या बाह्य रुपापाई चर्च, मशीद, देऊळ, गुरुद्वारा ह्यात ही भेद होतो.
असे भेद हे आपणच निर्माण केले आहेत. आता तर जातीयवादाचे उग्र रूप घेतले आहे. त्यांचे परिणाम सगळीकडे दिसत आहेत.
तसेच हा देश, तो देश, हा प्रांत, तो प्रांत. हा ही भेदच की !
प्रत्येक देश दुसऱ्या देशाशी स्पर्धा करतो. स्पर्धा असावी, पण निकोप. ती सर्व जगातल्या मानवाच्या प्रगतीसाठी असावी. पण आता स्पर्धेचे रूप संहाराच्या दिशेने चालले आहे.
आता अहंकार, राजकारण प्रचंड वाढले आहे. व्यक्ती, देश, संस्था सगळीकडेच वाढले आहेत.
मला “पंच्छी नदिया पवन के झोकें.. कोई सरहद ना उन्हे रोके” हे गीत फार आवडतं.
आपण पशू, पक्ष्यांच्यापेक्षाही भयंकर वागत आहोत.
आपण आपल्या वागण्याने ही दरी निर्माण केली आहे माणसा माणसात. मग देश कुठलाही असो.
खरंच, जातीचा आणि माणुसकीचा काही संबंध आहे का ? तर दूर दूर पर्यंत तो नाहीये हे लक्षात येतं.
इथे थोडी अध्यात्माची जोड देत लिहिते की प्रत्येक व्यक्ती ही तिच्या चैतन्य स्वरूपानुसार व्यक्त होते. जात, पात, धर्म ह्या नुसार नाही.
हा विषय दरी निर्माण करणारा आहे म्हणून आपण वेळीच त्याला थांबवलं पाहिजे असे मात्र मनापासून वाटते.
मागच्या आठवड्यात आर्थिक दरी हेच जातीयवादाचे मुख्य कारण आहे, अशी चांगली चर्चा झाली. म्हणूनच आपली आर्थिक परिस्थिती चांगली होत राहील, हा प्रयत्न करण्याचे अमेरिकन लोकांचे गुण आपण घेतले पाहिजेत.
अमेरिकेत माझा अनुभव खूप चांगला होता. आम्ही अनेकांना भेटलो तेव्हा खूप गप्पा मारल्या. त्या भारतात काय चांगल, अमेरिकेत काय चांगल ह्यावर चर्चा झाल्या.
एकमेकांचे चांगले ते घ्यावं असे विचारही सारखे होते म्हणून चर्चेतून आनंद ही मिळाला. नाहीतर कित्येकदा चर्चा कमी आणि वाद जास्त होतात.
जयपूर वगैरे ठिकाणी भेट दिलेले मला काही भेटले. आपल्या वैभवाबद्दल, तिथल्या सौंदर्याबद्दल भरभरून बोलत होते. ते ऐकून खूप छान वाटलं.
दुसरं अतिशय महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या कामातून स्वतः ला सिद्ध करणे, ह्या गोष्टीला असलेलं महत्व खूप आवडलं. तुमचं काम उत्कृष्ठ असेल तर तिथे राजकारण फार कमी आहे. कदाचित काही ठिकाणी असू शकते. पण बहुतेक ठिकाणी कामातली निष्ठा महत्वाची मानली जाते.
खरे तर हे सर्व बघून वाईट वाटले. आपण ही ह्याच गोष्टींना महत्व दिलं, तर कुठल्या कुठे जाऊ. जगात आपल नाव होईल.
आपल्या राजकीय नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थापायी सामान्य माणसाचं आयुष्य अवघड करून ठेवंल आहे, ह्याची जाणीव तिथे गेलं की जास्त होते.
राजकारण सर्व देशात आहे, असते आणि ते राहीलही. पण आपल्या देशात सर्व सामान्य माणूस समोर ठेऊन काम होत नाही. त्याला गृहीत धरल जाते.
तिथे आपल्या देशातला नागरिक सुखी कसा होईल, त्या दृष्टीने प्रयत्न होत असतात. भ्रष्टाचार ही असेल किंवा आहेच. पण त्याची दाहकता एवढी नाही, जेवढी आपल्या देशात आहे.
नागरिकांना जाणीव आहे त्यांच्या हक्काची पण त्याच बरोबर जबाबदारीचीही. आपला देश चांगला होण्यासाठी नियम पाळले पाहिजेत ही जाणीवही आहे..
अमेरिकेत कायदा, नियम सर्व आपल्याच फायद्यासाठी ह्याची जाणीव आहे नागरिकांना. आपल्याकडे ती बरेच प्रमाणात कमी आहे. जे नियमाने वागतात, ते वेडे ठरवले जातात.
अमेरिकन लोकांना त्यांच्या देशाचा अभिमान आहे. तो त्यांच्या बोलण्यातून जाणवतो. आपल्याकडे आपल्या पिढी पर्यंत आहे हा अभिमान, पण तरुण पिढीला खूप कमी आहे हे जाणवतं.
त्यांची काही चूक नाही. आदर्श घ्यावा अशी माणसंच फार थोडी आहेत. जी आहेत त्यांना मीडिया समोर आणत नाही.
तिथेही काही प्रमाणात मीडिया असाच आहे. तरी काही चॅनल चांगल्या गोष्टी दाखवतात.
पुढच्या भागात तिथल्या मीडिया बद्दल लिहीन. काही गोष्टी बघताना अगदी आपल्या देशाची आठवण झाली.
खरच..व्यक्ती इथून तिथून सारख्याच असतात. देश कुठलाही असो. हेच सत्य जाणवतं.
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदुरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800