रस्ते : असेही, तसेही !
रस्ता ओलांडण्यावरून हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत सं॰ दि॰ नौशाद यांनी त्यांच्या आयुष्यातील रस्ता ओलांडण्याचा प्रसंग मला सांगितला, त्याची आठवण येते॰
ते उत्तर प्रदेशातील लखनौहून 1938 साली मुंबईत सं॰ दि॰ बनण्यासाठी आले॰ कोणाशीच ओळख नसल्यामुळे दादर T T येथे असलेल्या ‘स्टार ऑफ कोचीन‘ हॉटेल जवळच्या एका चाळीत ते जिन्याखाली रहात होते॰ चित्रपट संगीत क्षेत्रात काही तरी करण्याची धडपड होती. समोरच ‘ब्रॉडवे चित्रपट गृह’ होते॰ तेथे आपण संगीत दिलेले चित्रपट कधी लागतील का ? असे स्वप्न नौशाद नेहेमी बघायचे॰
1942/43 साली ते संगीत दिग्दर्शक झाले. पहिले काही चित्रपट तितकेसे यशस्वी झाले नाहीत; पण 1944 साली प्रदर्शित झालेल्या ‘रतन‘ या चित्रपटाने त्यांना अभूतपूर्व प्रसिद्धी मिळवून दिली.
यथावकाश त्यांनी संगीत दिलेला ‘बैजू बावरा‘ (1952) हा चित्रपट ‘ब्रॉडवे चित्रपटगृहा‘ मध्ये लागला; आणि त्याने तेथेच रौप्य महोत्सव साजरा केला॰ त्यावेळेस झालेल्या समारंभात नौशाद ‘ ब्रॉडवे ‘ च्या सज्जात आले; आणि समोरच्या चाळीकडे बोट दाखवून ‘ मी येथे 14 वर्षांपूर्वी रहात होतो ‘, असे म्हणाले॰ ते पुढे म्हणाले, ‘त्या फूटपाथ वरून या फूटपाथवर यायला मला तब्बल 14 वर्षे लागली !‘
हा प्रसंग त्यांनी अनेकवेळा त्यांच्या मुलाखतींत सांगितला॰ आपल्या आत्मचरित्रातही लिहिला आहे; पण आम्हाला सांगताना त्यांना गहिवरून आलेच होते ! दीपक कोनकर, मी आणि नौशादची भेट 1994 सालच्या ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये केव्हातरी झाली.
या आमच्या आणि नौशादच्या भेटी नंतर 2 – 2 || महिन्यांनी मी अर्थतज्ज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांची ठाण्याच्या ‘गडकरी रंगायतन’ मध्ये जाहिर मुलाखत घेतली॰
ठाण्याच्या ‘बेडेकर विद्यालया’ चे अशोक चिटणीस म्हणून एक उपक्रमशील मुख्याध्यापक होते. ते दरवर्षी त्यांच्या विद्यार्थ्यांची नामवंत व्यक्तींशी भेट घडवून आणत. माझी आणि अशोक चिटणीसची मैत्री होती; आणि माझा आणि उच्च शिक्षित डॉ. नरेंद्र जाधव यांचा स्नेह होता. ते त्या वेळेस ‘रिझर्व्ह बँके’ चे डे. गव्हर्नर होते; आणि त्यांनी संपादित केलेल्या त्यांच्या वडिलांच्या ‘आमचा बाप आन आम्ही‘ या आत्मकथनामुळे एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
नरेंद्र जाधव हे लहानपणी वडाळ्याच्या रेल्वे कॉलनीच्या चाळीत रहात होते॰ मी मुलाखत घेत होतो तेव्हा ते नरीमन पॉइंटवर ‘शलाका‘ या शासनाच्या आलिशान सदनिका असलेल्या इमारतीत रहात होते॰ ‘त्या फूट पाथवरून या फूटपाथवर यायला मला 14 वर्षे लागली’, हे नौशाद यांचे वाक्य मला आठवत होते; त्यामुळे मी पहिलाच प्रश्न डॉ. नरेंद्र जाधव यांना ‘वडाळ्याची चाळ ते नरीमन पॉइंट हे 21 कि॰ मी॰ चे अंतर कापण्यास आपल्याला किती वर्षे लागली ?‘, हा केला॰ यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला !
यशवंतराव चव्हाण हे दिल्लीत गेल्यावर 1, ‘रेस कोर्स रोड’ या बंगल्यात रहात होते॰ बरोबर त्याच्याच समोर 1, ‘सफदरजंग रोड’ हा बंगला होता॰ या बंगल्यात पंतप्रधान इंदिरा गांधी रहात असत॰ मात्र, 1950 च्या दशकात, अर्थमंत्री असतांना सी॰ डी॰ देशमुख या बंगल्यात रहात असत; असे त्यांनी आपल्या ‘Course Of My Life’ या आत्मचरित्रात नोंदवून ठेवले आहे॰
1962 साली संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेल्यावर यशवंतराव यांनी प्रशासनात आणि अन्यत्र आपली छाप झपाट्याने पाडली. शिवाय, त्यावेळेस लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे 44 / 45 खासदार असत. त्या पैकी 42 / 43 खासदार काँग्रेसचे असत. यशवंतरावांची त्यांच्यावर पकड असल्यामुळे ती त्यांची राजकीय ताकत होती.
नेहरूंनंतर लाल बहादूर शास्त्री केवळ 18 / 19 महिन्यांत निधन पावले. इंदिरा गांधी केंद्रीय मंत्रिमंडळात होत्या; पण त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व अजून सिद्ध झाले नव्हते. त्या मुळे अन्य काही काँग्रेसच्या नेत्यांबरोबर, यशवंतरावांचे नावही भावी पंतप्रधान म्हणून काही काळ निश्चित स्पर्धेत होते॰
3 मे 1969 रोजी रोजी तत्कालीन राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचे अकस्मात निधन झाल्यावर, काँग्रेसमधील उजवे आणि डावे अशा दोन्ही ग्रुपमधील दरी रुंदावली; आणि दोन्ही ग्रुपनी पंतप्रधानपद आपल्या ताब्यात राहावे, यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु केली !
1969 साली ‘तुमच्याकडे असलेले 44 खासदार घेऊन आमच्यांत या; तुम्हाला पंतप्रधानपद देतो‘, असा देकार उजव्या ‘सिंडीकेट’ ने यशवंतरावना दिला होता॰ पण यशवंतरावांना हे धाडस करवले नाही॰ ते जर खरोखरच पंतप्रधान झाले असते तर त्यांनी निश्चितच चांगला कारभार केला असता; असे म्हणावयास जागा आहे॰ त्यांच्या ‘रिस्क‘ न घेण्याच्या स्वभावामुळे त्यांना 1, रेस कोर्स वरुन रस्ता ओलांडून 1, सफदर् जंग येथे जाऊन पंतप्रधान काही होता आले नाही !
जाता जाता…..
यशवंतरावांना दिल्लीतील ‘रेसकोर्स‘ रस्ता ओलांडता आला नाही; ही गोष्ट 1969 सालची. मात्र, नंतर राजकारण इतकं बदललं की असे रस्ते बहुश: सगळ्याच पक्षांतले राजकारणी बिनदिक्कत ओलांडू लागले ! त्याची या घटकेपर्यंत अमोज उदाहरणे सांगता येतील. पण यांतील सर्वात नमुनेदार उदाहरण हरियाणा राज्यातील 1980 मध्ये ‘जनता पक्षा‘च्या भजनलाल या मुख्यमंत्र्याचे आहे !
1980 च्या जूनमध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष बहुमतानं निवडून आला; आणि इंदिरा गांधी या पुन्हा पंतप्रधान झाल्या. साहजिकच, ज्या राज्यांत ‘जनता पक्ष’ सत्तेवर होता; त्या राज्यांच्या विधानसभा त्या बरखास्त करणार होत्या. याची कुणकुण लागताच हरियाणा च्या भजनलाल या ‘जनता पक्षा‘ च्या मुख्यमंत्र्यानं मंत्रिमंडळासकट अख्खा जनता पक्ष ‘काँग्रेस पक्षा’ त सामील केला !
त्या वेळेस राज्यपाल ग. दे. तपासे होते. या तपासे यांचे जामात डॉ. रमेश प्रभू हे ‘शिवसेना‘ पक्षात होते; आणि मुंबईचे महापौर झाले होते. वरती सी. डी. देशमुख यांच्या ‘Course Of My Life‘ या आत्मचरित्राचा उल्लेख आला आहे. ‘Course of My Life‘ चे लेखन चांगल्या इंग्लिश भाषेत झाले नसल्याने त्याचे परीक्षण करताना ‘Illustrated Weekly Of India‘ या साप्ताहिकाच्या तत्कालीन संपादकांनी (खुशवंतसिंगांनी) ‘हे पुस्तक चांगले इंग्लिश असणार्या लेखकाकडून लिहून घ्यावयास हवे होते‘, अशी टीका केली होती. ती रास्त होती; असे माझे मत ते पुस्तक 1976 मध्ये वाचल्यावर झाले॰
नंतर सुमारे 40 / 45 वर्षांनी वर्षांनी इंग्लिश भाषेचे प्राध्यापक व्ही. जी. नंद यांनीही, एकदा आमच्या बोलण्यात ‘Course Of My Life’ चा उल्लेख झाल्यावर तीच टीका केली.
त्यावेळेस मी त्यांना खुशवंत सिंग यांची टीका सांगितली.
या पुस्तकाचे मराठी भाषांतर त्यांचेच बंधु वाय॰ डी॰ देशमुख यांनी ‘ माझा जीवन प्रवाह ‘ या नावाने केले आहे॰ हे वाय॰ डी॰ देशमुख रायगड जिल्ह्यातील रोह्याचे दीर्घकाळ नगराध्यक्ष होते॰
भूतपूर्व न्या. मू. आणि केंद्रीय मंत्री एम. के. छागला यांनी लिहिलेलं त्यांचं आत्मचरित्र ‘Roses In December‘ हे मात्र सुंदर इंग्लिश भाषेचा अप्रतिम नमुना आहे !

– लेखन : प्रकाश चान्दे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800