Wednesday, June 18, 2025
Homeलेखअवती भवती ( 10 )

अवती भवती ( 10 )

माझी ‘वकिली‘ !
आपण कुठे तरी काही माहिती ऐकून ठेवतो. त्याचा नंतर कित्येक वर्षांनी, कसा उपयोग होतो; याचं एक नमुनेदार उदाहरण सांगतो॰

मुंबईत 1960 च्या दशकात बी. एन. कुलकर्णी म्हणून नावाजलेले उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. त्यांच्या मुलीचं नाव कुसुम. ती ही वडिलांप्रमाणे वकील होऊन उच्च न्यायालयात वकिली करू लागली. हिचे सख्ख्या मावस भावावर प्रेम बसले॰ त्या दोघांनी लग्न करायचे ठरवले॰ हा मावसभाऊ डॉ॰ सुधीर जोशी हा माझे मोठे सख्खे बंधु डॉ॰ अविनाश चांदे यांना वैद्यकीय महाविद्यालयात एक दोन वर्षे ज्येष्ठ होता॰

आता कायद्याने लग्नासाठी जी नाती निषिद्ध आहेत, त्यात सख्ख्या मावस बहिण – भावांचे नाते आहे॰ हे दोघे तर लग्न करणार म्हणून हटून बसले॰ मुलगी कायद्याची पदवीधर; बाप उच्च न्यायालयात न्यायमूर्ती ! साहजिकच, न्या॰ मू॰ कुलकर्णी यांनी या लग्नाला विरोध केला॰

ही गोष्ट मे 1964 मधील॰ महाविद्यालयाला सुटी असल्याने मी माझ्या या बंधुंकडेच होतो॰ मग डॉ॰ जोशी आणि न्या॰ मू॰ कुलकर्णी आमच्याकडे काय मार्ग काढायचा, या साठी विचार विनिमयाला यायचे॰त्या चर्चेच्यावेळी मी ही तेथे असायचा॰

हे लग्न जर झाले तर काय होईल, असा प्रश्न मी न्यायमूर्तींना विचारला॰ एक तर ते लग्न बेकायदेशीर॰ म्हणून या दोघांना जी मुले होतील, ती अनौरस॰ शिवाय, मुले झाल्यावर डॉ॰ जोशी मृत्युपत्र न करता निधन पावले, आणि त्यांच्या भावाने हक्क दाखवला तर ती मुले मालमत्तेपासून वंचित राहतील॰

मग याला मार्ग काय ? असा प्रश्न आम्ही विचारला॰
तर डॉ॰ जोशी यांना स्वत:च्याच मुलांना दत्तक घ्यावे लागले असते; (कारण ती मुले अनौरस म्हणून जन्माला आली आहेत॰) आणि मग डॉ॰ जोशी आपली मालमत्ता त्या मुलांच्या नावाने करू शकले असते॰ नंतरच ती मुले कायदेशीर वारस ठरू शकली असती॰

एक न्यायमूर्ती आणि कायद्याचा सच्चा रखवालदार म्हणून न्या॰ मू॰ कुलकर्णी यांनी या लग्नाला विरोध केला; आणि त्यांच्या अनुपस्थितीत ते लग्न पार पडले॰ मात्र, नंतर न्या॰मू॰ कुलकर्णी यांनी एक स्वागत समारंभ आयोजित केला होता॰

याचा अर्थ काय ? असे विचारल्यावर ते म्हणाले लग्नाला विरोध कायदेशीर भूमिकेतून होता॰ मात्र, एक बाप म्हणून मुलीच्या लग्नाचे स्वागत केलेच पाहिजे !

मात्र, योगायोग म्हणजे या पती – पत्नीला मूलबाळ झालेच नाही॰

या कुसुम जोशी नंतर उच्च न्यायालयात वकिली करत असत॰

या नंतर काही वर्षांनी, मी नासिकला असतांना सुजाता मनोहर या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती झाल्या॰ पण सुजाता मनोहर या गुजरात उच्च न्यायालयाचे न्या॰ मू॰ के॰ टी॰ देसाई यांची मुलगी॰ हे देसाई 1960 पूर्वी मुंबई उच्च न्यायालयात न्या॰ मू॰ होते॰ यांच्याबरोबर एस॰ टी॰ देसाई आणि जे॰ एम॰ शेलात हे ही न्या॰ मू॰ होते॰

गुजरात राज्याच्या निर्मितीनंतर हे तिघे गुजरात उच्च न्यायालयाचे न्या॰ मू॰ झाले॰

गुजरात उच्च न्यायालायचे तिसरे मुख्य न्या॰ मू॰ जे॰ एम॰ शेलात हे होते॰ हे मुंबई उच्च न्यायालाचे न्या॰ मू॰ असतांना यांनी नानावटी –खटल्याचा निकाल दिला होता॰

हे शेलात गाजले केव्हा ?

1973 साली इंदिरा गांधींनी सर्वोच्च न्यायालयाच्या अजितनाथ रे यांना तीन न्या॰ मू॰ चा ज्येष्ठत्वाचा हक्क डावलून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्या॰ मू॰ बनवले, तेव्हा ज्या तीन न्या॰ मू॰ चा हक्क डावलला गेल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांत एक हे जे॰ एम॰ शेलात होते॰ दुसरे के॰ एस॰ हेगडे होते, आणि तिसरे ग्रोवर होते॰

हे हेगडे 1977 साली ‘ जनता पक्षाचे ‘ उमेदवार म्हणून खासदार झाले; आणि संजीव रेड्डी यांची राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यावर लोकसभेचे सभापती झाले॰ मात्र, या तिघांनी एकदम राजीनामे दिले त्यामुळे न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड हे लवकर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्या॰ मू॰ झाले; आणि ते पद त्यांनी तब्बल 7 वर्षे उपभोगले ! त्या पूर्वी कोणालाही इतका दीर्घ काळ हे पद मिळालेले नाही; भविष्यातही बहुधा कोणालाच इतकी मोठी इनिंग्ज मिळेल असे वाटत नाही॰

आणीबाणीत चंद्रचूडांनी बिनकण्याचे वर्तन केले॰ पण शहाबानो खटल्यात कुराणाचा क्रांतीकारक अर्थ लावून तिला पोटगी मिळवून देण्याचा ऐतिहासिक निर्णय चंद्रचूडांनीच दिला॰ हे चंद्रचूड कथा लेखक अरविन्द गोखले यांचे घनिष्ट मित्र॰ ते दोघे दिल्लीत काही वर्षे एकाच खोलीत रहात असत॰

मी नंतर 1974 मध्ये नासिकला स्थायिक होण्यासाठी गेलो॰

1979 मध्ये मला अमरनाथ खोसला म्हणून वरिष्ठ लाभले॰ या खोसलांचे आणि माझे अतिशय जमत असे॰ एक तर मी कामात चोख होतो; दुसरे म्हणजे खोसलांना जुने हिंदी चित्रपट; त्यांतील गाणी अशा अनेक गोष्टींत माझ्याप्रमाणेच रूची होती; शिवाय, मी चांगले इंग्लिश लिहू / बोलू शकत असे॰ त्यामुळे कधी कधी ते मला सायंकाळी मद्यपान आणि भोजनासाठी बोलवत असत॰

माझ्यावर त्यांचा इतका विश्वास होता की, त्यांनी नोकरी बदलण्यासाठी कुठे कुठे अर्ज केले आहेत, हे ही ते मला सांगत असत॰ मी ज्या ‘ तापरिया टूल्स ‘ कंपनीत काम करत होतो, त्यांच्या स्पर्धक कंपनीने जालन्याला एक प्लांट उघडला॰ आम्ही बहुतेकांनी तिकडे अर्ज केले॰ या खोसलांनी पण अर्ज केला॰ अर्हता, अनुभव आणि अन्य दृष्टीनी खोसला यांची निवड सहज व्हावयास हवी होती॰पण त्यांची निवड काही झाली नाही॰

मात्र, माझी निवड झाली.आणि मी तेथे रुजू झालो.जालन्याच्या या नवीन प्लांटचा व्यवस्थापक आमच्याच कंपनीतून अगोदर तेथे गेला होता, म्हणून खोसलांनी त्यांची निवड का झाली नाही ? याचे कारण मला शोधावयास सांगितले॰ त्या व्यवस्थापकाची भेट झाल्यावर मी विचारले, तेव्हा त्याने मला फक्त इतकंच सांगितले की खोसला यांनी त्यांच्या लग्नासंबंधी खोटी माहिती देऊन फसवले आहे; म्हणून त्यांची निवड झाली नाही, अन्यथा ते त्या पदासाठी लायक होते॰

मला धक्काच बसला !

मी खोसलांना ही गोष्ट सांगितली॰यावर खोसलांनी मला जे स्पष्टीकरण दिलं, त्याने मी अवाकच झालो !त्यांनी मला असे सांगितले की त्यांच्याबरोबर जी बाई त्यांची बायको म्हणून राहते ती त्यांची लग्नाची बायको नाही !  (मी अस्वस्थ !)॰ त्या दोघांना त्यावेळेस एक सहा – सात वर्षांची मुलगीही होती॰

हे खोसला चाळिशीत होते॰ त्यांचे ऐन पंचविशीत, त्यांच्या पंजाबातल्या गावात, मुलगी दाखवून रीतसर लग्न झाले होते॰ पण त्यांच्या पत्नीचा स्वभाव विचित्र होता; म्हणून यांचे पटेनासे झाले॰ अखेरीस एक दिवस ती पत्नी यांना सोडून कायमची माहेरी निघून गेली॰ हे वैतागून मुंबईला आले॰

त्यांची या बाईंशी ओळख झाली॰ त्या अविवाहित होत्या॰ यांचे प्रेम जमले॰ त्या बाई यांच्याशी लग्न करावयास तयार झाल्या॰ मात्र, यांनी प्रामाणिकपणे, त्यांचे लग्न झाले असून बायको सोडून गेली आहे; पण त्यांचा रीतसर घट:स्फोट झालेला नाही, असे त्यांना सांगितले॰ पण तरीही त्या बाई यांच्याशी तशा ही परिस्थितीत लग्न करावयास तयार झाल्या॰ यांनी त्या बाईंना जरी त्या कायदेशीर पत्नी नसल्या तरी अंतर देणार नाही, आणि कायदेशीर पत्नीचे सर्व हक्क आणि लाभ देऊ असे वचन दिले॰

त्यामुळे त्या बाई खोसला यांच्याबरोबर लग्न न करताच राहू लागल्या.यथावकाश, त्यांना एक मुलगी झाली.

त्यामुळे खोसला म्हणाले की ते तसे पापभीरू असल्यामुळे अर्जामध्ये Marital Status या रकान्यात माहिती भरताना त्यांचा हात थरथर कापत असे॰ जरी ते त्यात विवाहित असे लिहीत असले तरी त्यांचे मन त्यांना खात असे॰

यातून कशी सुटका करुन घ्यायची ते मला कळत नाही, तुम्ही यातून काही मार्ग सुचवू शकता का ? असे त्यांनी मलाच विचारले॰

आमचे मद्यपान चालू होते; आणि एक पेग झालेला असल्याने माझे विमान बर्‍यापैकी उडू लागलेच होते ! मला एकदम 15 वर्षांपूर्वी न्या॰ मू॰ कुलकर्णी यांच्या बरोबर झालेल्या चर्चा आठवल्या; आणि मी निष्णात कायदे पंडिताच्या थाटात त्यांना मार्ग सुचवला॰ मी त्यांना असे सुचवले की त्यांनी आता प्रथम पत्नीपासून घट:स्फोट मिळावा म्हणून त्यांचे ज्या गावी लग्न झाले त्या गावच्या न्यायालयात खटला दाखल करावा॰ कारण आता ती दोघे 7 वर्षांपेक्षा जास्त काळ विभक्त रहात असल्यामुळे फारकत सहज मिळू शकेल॰

त्यावर ते म्हणाले की, त्यांना गेल्या दहा बारा वर्षांत ती पत्नी कुठे आहे याची खरोखर कल्पना नाही॰ मी त्यांना सांगितले की ती काळजी त्यांनी नाही करायची॰ कोर्ट हे last known address वर समन्स पाठवेल॰ समन्स परत आले तर ते स्थानिक वर्तमानपत्रांत जाहिरात देतील॰ या ठरावीक मुदतीत त्या कोर्टापुढे हजर झाल्या नाहीत तर कोर्ट Ex — party निर्णय देईल॰ मग फारकत त्वरित मिळेल॰

नंतर मुंबईला येऊन एक महिन्याची नोटीस देऊन सध्या ज्यांच्या बरोबर रहात आहेत, त्यांच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह करायचा॰ यथावकाश, पण लवकरच, त्या दोघांना झालेल्या मुलीला दत्तक घ्यायचे; म्हणजे ती मुलगी कायदेशीररित्या या दोघांची मुलगी होईल॰

खोसला थक्क झाले ! (वि॰ आ॰ बुवांच्या भाषेत ‘थक्क व्हायचेच विसरले !’)

तरीही मी त्यांना असे सुचवलं की आपण एका चांगल्या स्थानिक वकिलाकडून, तुमची ओळख न दाखवता, या गोष्टी तपासून घेऊ; आणि मग तुम्ही कार्यवाहीला लागा॰

माझे चुलत बंधु प. रा. चांदे हे नासिकला 1953 पासून वकिली करत होते; त्यांच्या मार्फत लवकरच आम्ही एका वकिलाची भेट घेतली॰ त्यानं हा सल्ला एका नामांकित वकिलानं दिला आहे असाच अभिप्राय व्यक्त केला !

नंतर वर्षभरात (1981) मी नासिक सोडलं॰ मी 1982 ला मुंबईला आलो॰ दोन – तीनदा खोसला मला ट्रेनमध्ये भेटले॰ पण या भेटी इतक्या ओझरत्या होत्या की मी त्यांनी काय केले हे मनात असूनही विचारू शकलो नाही॰

त्या नंतर गेल्या एके चाळीस वर्षांत खोसला मला कधीही भेटले नाहीत॰

मी ही गोष्ट विसरून गेलो॰क्वचित, कधी गप्पा मारायला बसलो आणि गोष्टी निघाल्या तर ही गोष्ट मी सांगत असतो.

जाता जाता….

नानावटी हे नाव खरे नाणावटी असे आहे; आणि त्याचा अर्थ cashier असा आहे; सर्व भारतीय भाषांनी cashier साठी नाणावटी हा शब्द वापरावा असा आ॰ अत्रे यांचा आग्रह होता॰

वरती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून यशवंतराव चंद्रचूड यांचा उल्लेख आला आहे. सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे यशवंतरावांचे सुपुत्र. बाप लेक सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले; हा प्रथमच योग आला आहे !

(या प्रसंगातील काही नावं बदलली आहेत.)

प्रकाश चांदे.

– लेखन : प्रकाश चान्दे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?