Thursday, June 19, 2025
Homeलेखअवती भवती : 11

अवती भवती : 11

इंदापूर : हे आणि ते !
इंदापूर हे कुलाबा (आताच्या रायगड) जिल्ह्यातले एक अगदी छोटे गाव॰ हे 1952 – 53 साली जेमतेम अडीच – तीन हजार वस्तीचे माणगाव तालुक्यातले खेडेगाव होते॰ पण येथे ST चा स्टँड 1954 – 55 सालीच, तेथील लोकांनी न मागणी करताच, बांधला गेला॰

त्याची चित्तरकथाच आहे !

पुणे जिल्ह्यातले पुणे – सोलापूर रस्त्यावर, तालुका असलेले इंदापूर हे गाव मालोजीराजे भोसलेंची जहागीर असल्यापासून प्रसिद्ध आहे॰ शिवाय, ते एक बाजारपेठेचे गाव आहे॰ त्या निमित्ताने येथे बाहेरगावच्या लोकांचे रोजचे येणे जाणे असते.

तत्कालिन मुंबई राज्यात, 1949 नंतर येथे एस॰ टी॰ ची बस सेवा सुरू झाली; पण या गावात स्टँड नव्हता॰ स्थानिक आमदारांनी जोर लावून स्टँडची मागणी मान्य करून घेतली॰

वर्क ऑर्डर निघून काम सुरू झाले॰

मात्र, गम्मत अशी झाली की त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम खात्यात बहुसंख्य कोकणातले लोक भरती झालेले होते॰ त्यांना पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरसाठी हा स्टँड मंजूर झाला आहे, याचा पत्ताच नव्हता; कारण असे गाव पुणे जिल्ह्यात आहे हेच त्यांना ठाऊक नव्हते !

त्यामुळे या Stand चे काम कुलाबा जिल्ह्यातील इंदापूर या गावी सुरु झाले !

बरे, या कुलाबा जिल्ह्यातल्या इंदापूरच्या लोकांनाही आश्चर्य वाटले की मागणी न करता स्टँड का बांधला जात आहे ?

काम सुरू झाले॰

त्याची बातमीही आली !

पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरचे लोक संभ्रमात; की येथे तर काहीच काम झालेले दिसत नाही ! म्हणून शेवटी विधानसभेत प्रश्न विचारला गेला॰ तर त्याला उत्तर आले, की काम सुरू झाले असून वेगाने प्रगती पथावर आहे॰ पायाचे बांधकाम पूर्ण झाले असून काही महिन्यांतच इमारत पूर्ण होईल॰

मग तर गदारोळच झाला !

अखेरीस त्या इंदापूरचे लोक मंत्र्यांना भेटायला आले आणि म्हणाले की आपण प्रत्यक्ष येऊन आम्हाला ते बांधकाम दाखवावे॰

मग चक्रे वेगाने फिरली !

चवकशी झाली, आणि निष्पन्न झाले की स्टँड पुणे जिल्ह्यातील इंदापूरला न बांधला जाता कुलाबा जिल्ह्यातलया इंदापूरला बांधला जात आहे !

हे कसे झाले याचीही चवकशी झाली॰ तेव्हा उघड झाले की पी. डब्ल्यू. डी. खात्यातल्या लोकांना पुणे जिल्ह्यातही इंदापूर म्हणून एक गाव आहे आणि हा स्टँड त्या गावासाठी मंजूर झाला आहे; हे ठाउकच नव्हते ! अर्थात, त्यावेळचे लोकप्रतिनिधी समजूतदार असल्याने हे काम पूर्ण करून दिले गेले॰ आजच्या काळात हे काम थांबवले गेले असते; आणि वर्षानुवर्षे ते तशाच अवस्थेत पडून राहिले असते !

त्यावेळेस महाडचे एक शंकरराव वडके म्हणून PWD खात्यात सचिवालयात (त्या वेळेस सचिवालय म्हणत. 1977 पासून ‘ मंत्रालय ‘ म्हणू लागले.) कारकून होते; ते रजा घेऊन महाडला आले की आमच्या घरी गप्पा मारावयास येत॰

त्यावेळेस हटकून ही आठवण सांगत !

त्यामुळे 1954 – 55 पासून मी जेव्हा जेव्हा या इंदापूरवरून गेलो तेव्हा तेव्हा ही आठवण मला आठवतेच ! महाड हे माझे जन्मगाव, आणि रत्नागिरी सासुरवाडी; त्यामुळे या इंदापूरवरून जाण्याचे प्रसंग येतातच ! तसेच, सोलापूरला रस्त्याने गेलो की, ज्या गावासाठी Stand मंजूर झाला होता, ते इंदापूर लागते. सोलापूरला खासगी गाडी अथवा एस. टी. ने जाण्याचे प्रसंगही आले. त्या ही वेळेस ही आठवण हटकून येते !

एकदा मी सोलापूरला जागतिक दर्जाचे शल्यकर्मी डॉ. वि. ना. श्रीखंडे यांच्याबरोबर त्यांच्या कारने जात होतो. त्या वेळेस त्यांनाही ही आठवण मी सांगितली !

या कथानकाला एक छोटेसे उपकथानक आहे.

ते 2011 साली रायगड जिल्ह्यातल्या रोह्याला कोकण मराठी साहित्य परिषदेचे सम्मेलन झाले॰

या संमेलनाला ‘ग्रंथाली’ चा तत्कालिन संचालक प्रभाकर भिडे आणि मी गेलो होतो.

श्रीनिवास गडकरी म्हणून पत्रकार, लेखक, इतिहासाची आवड असणारे गृहस्थ आहेत॰ त्यांनी ‘ ग्रंथाली‘ च्या  ‘ज्ञानयज्ञ‘ प्रकल्पात रोहे गावावर एक माहितीपूर्ण पुस्तिका लिहिली आहे॰ यांचे ‘अमृत‘ आणि अन्यत्र लेख प्रसिद्ध होत असतात॰ यांच्याशी ओळख करून घेण्याची माझी इच्छा होती॰ ती 2011 च्या एप्रिलमध्ये रोह्याला पूर्ण झाली॰

तेथे गप्पा मारताना त्यांनी त्यांचे गाव तळा – इंदापूर असे सांगितले॰ मग मी इंदापूरच्या स्टँडविषयीची ही कथा त्यांना सांगितली॰ ही कथा ऐकून ते नाराज झाले. कारण त्यांचे मामा 1952 – 57 या काळात त्या भागाचे आमदार होते; आणि गडकरींच्या मते हा स्टँड त्यांच्या मामांनी केलेल्या प्रयत्नामुळे बांधला गेला॰

मात्र, ते पूर्णत: खरे नव्हते॰

मी दोन तीन मुद्दे त्यांना सांगितले॰ कोकणात जे ST चे स्टँड बांधले गेले आहेत ते रेल्वे स्टेशन सारखे त्यांना दोन्ही बाजूला दोन प्लॅटफॉर्म असत; आणि गाड्या एका पाठोपाठ एक अशा उभ्या राहत. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात (त्या वेळेस त्याला ‘देश‘ किंवा ‘घाट‘ म्हटले जात असे॰ बरीच वर्षे पनवेलच्या ST Stand मध्ये ‘ घाटाकडे जाणार्‍या गाड्या ‘ असेच लिहिले होते०) जे स्टँड बांधले गेले आहेत ते मध्यभागी एक इमारत आणि बाहेरगावी जाणार्‍या गाड्यांसाठी बाहेर मोकळी जागा; अशा पद्धतीचे बांधलेले असतात॰ तेथे गाड्या एका पाठोपाठ एक अशा उभ्या न राहता, एकमेकांना समांतर अशा गाड्या उभ्या राहत.

कोकणातला पहिला असा स्टँड महाडला 1951 साली बांधला गेला; आणि त्याचे उद्घाटन त्या वेळेस पुरवठा मंत्री असलेले यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. म्हणून त्याला ‘महाड डिजाइन‘ स्टँड असे म्हणतात॰ तर इंदापूरचा स्टँड हा महाड डिजाइन चा स्टँड नाही॰ शिवाय, जेव्हा हा स्टँड बांधला गेला तेव्हा इंदापूर हे दोन – तीन हजार वस्तीचे गाव होते॰ पनवेल, पेण, चिपळूण, रत्नागिरी येथे सुद्धा स्टँड मंजूर झाले नव्हते॰ इतक्या मोठ्या गावी स्टँड मंजूर न होता अशा छोट्या गावात स्टँड कसा बांधला गेला ? इतके काही कोकणातले आमदार वजनदार नव्हते॰

गडकरी यांच्या आमदार मामांनी तेथे Stand व्हावा म्हणून प्रयत्न केले असतीलही. तालुकाही नसलेल्या गावी स्टँड बांधणे फायदेशीर आहे हे महामंडळाला त्यांनी कसे पटवून दिले असेल ? ते ही रत्नागिरी, चिपळूण अशा गावी Stand बांधले गेले नसताना ! शिवाय, मी गडकरींना P. W. D. मध्ये कोकणातल्या लोकांचे प्राबल्य; त्यांना माहित नसलेले पुण्याजवळचे इंदापूर; P. W. D. मधील शंकराराव वडक्यांचे आमच्याकडचे नियमित येणे – जाणे; या गोष्टीही सांगितल्या॰

मग ते गडकरी काही बोलले नाहीत॰

पण मग आमची मैत्री झाली॰ ते त्या वेळेस पेणला रहात असत॰ नंतर एका रविवारी मी पेणला त्यांच्याकडे दिवस भरासाठी गेलो होतो॰ त्या वेळेस भरपूर गप्पा झाल्या. आता अधून मधून आमचा चलभाष वरुन संपर्क असतो॰

जाता जाता ….

महाराष्ट्र राज्याच्या शासकीय सेवेत असलेले एक बहुश्रुत साहित्यिक (आता दिवंगत) ज. बा. कुलकर्णी हे डोम्बिवलीला रहात होते. मी 1983 साली डोंबिवलीत आल्यावर माझी सुप्रसिद्ध विनोदी लेखक आणि माझे ज्येष्ठ स्नेही वि. आ. बुवा यांनी यथावकाश या ज. बा. कुलकर्णी यांच्याशी ओळख करुन दिली.

महाराष्ट्र राज्याचे, साहित्याची उत्तम जाण असलेले, पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सचिवालयातील सर्व कर्मचाऱ्यांना कळकळीने सांगत की, सचिवालय हे रुग्णालय आहे, असे समजा. रुग्णालयात कोणीही हौसेने येत नाही; आणि आला तरी लवकरात लवकर त्याला घरी जायची ओढ असते.

गाव, तालुका, जिल्हा पातळीवर काम न झाल्यामुळे नाईलाजाने माणसं सचिवालयात येतात. तेव्हा त्यांचे काम लवकरात लवकर कसे होईल, याची काळजी घ्या.

किती चपखल आणि समर्पक उपमा !

ज. बा. कुलकर्णी ही आठवण खूप वेळा सांगत !

प्रकाश चांदे.

– लेखन : प्रकाश चान्दे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments