१४ फेब्रुवारी २०२६, रविवारचा दिवस.. अहमदनगर महाविद्यालयाचा परिसर.. सकाळची स्वच्छ, ताजी आणि थंड हवा… येणाऱ्या प्रत्येकाचे मन आणि शरीर उत्साही व चैतन्य दायी बनलेले.. सूर्याच्या सोनेरी किरणांनी पसरलेला हा परिसर मनाला मोहवणारा..
ग्रंथालयाचे सुसज्ज सभागृह.. एकेक माजी विद्यार्थी येत होता .. स्नेहमेळाव्यात एकमेकांना अनेक वर्षांनी पाहून मनाला खूप आनंद होत होता… आजचा दिवस त्यांच्या सर्वांसाठी अत्यंत खास असल्यासारखे उपस्थित मित्रांना वाटत होते …, ‘शाळा सुटली, पाटी फुटली’ असे आपण म्हणतो, पण शाळेची ओढ कधीच कमी होत नसते… तसे आज इथे जमल्यावर प्रत्येकाला वाटत होते की पुन्हा एकदा या महाविद्यालयाच्या वर्गातील बाकावर येऊन बसलो आहोत..!ग्रंथालयातील पुस्तके चाळत आहोत.. !!


एकमेकांचे हस्तांदोलन होत असतांनाच प्रभारी प्राचार्य डॉ. नोएल पारगे, डॉ. प्रीतम बेदरकर उपप्राचार्य, डॉ. सय्यद रज्जाक, समन्वयक नॉन-ग्रँट विभाग, श्री. प्रशांत दहिभाते, माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष, प्रा. डी. जी. भालसिंग उपप्राचार्य, आणि डॉ. अभिजित कुलकर्णी सचिव, माजी विद्यार्थी संघटना आदींचे सहका-यांसह पाचारण होते .. आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या आणि आपल्यावर चांगले संस्कार करणाऱ्या सर्व गुरुजनांना उपस्थित प्रत्येक जण मनोमनी वंदन करीत असतो… महाविद्यालयात शिकत असताना शिक्षकांची भीती वाटायची.., पण आज कळून येते की त्यांनी शिस्त लावली म्हणून आपण आज आयुष्यात यश मिळवू शकलो…
… ते महाविद्यालयातील टिफिन शेअर करणे, मधल्या सुट्टीत मस्ती करणे, परीक्षेची भीती आणि सरांचा ओरडा… या सर्व आठवणी आजही ताज्या होऊन जातात… काळानुसार सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावलेले …पण या मैत्रीचे बंध आजही तितकेच घट्ट होऊन गेलेले…


..आपल्या अहमदनगर महाविद्यालयाने आपल्याला केवळ शिक्षण दिले नाही, तर जगायचे कसे, हे शिकवले, ते अशा दिवशी कळून येते… आज आपण इथे पुन्हा भेटत आहोत, तेव्हा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासोबतच, आपल्या महाविद्यालयासाठी आणि सध्या शिकत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण काय करू शकतो, यावरही इथे चर्चा झाली.

.. आपले महाविद्यालय आपली ओळख आहे, ते अधिक प्रगत करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे प्रत्येक जण ठरवीत असतो. .. बाप्पा हिवाळेंचे साकार झालेले व टी. आणि जे. बार्नबस सरांनी सुरक्षित फुलवलेले स्वप्न चिरंतन ठेऊ या..
…..आयुष्यात कितीही मोठे झालो, तरी या महाविद्यालयाच्या दिवसांसारखा निखळ आनंद कुठेही मिळाला नाही..

आजचा हा स्नेहमेळावा मैत्रीची ही ज्योत अशीच तेवत ठेवू या… माजी विद्यार्थ्यांसाठी जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा मैत्रीपूर्ण आणि भावनिक सोहळा …अनेक वर्षांपूर्वीच्या मित्रांची भेट व जुन्या आठवणींची उजळणी असे स्वरूप ….जुन्या मित्रांना भेटणे, महाविद्यालयीन जीवनातील दिवस पुन्हा जगणे आणि ऋणानुबंध जोडणे, या सारखी दुसरी मजा नाही.. ३०-३५ वर्षांनी भेटणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा हा स्नेह मेळावा एक भावनिक अनुभव…

— लेखन : प्रा. जवाहर मुथा. नगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
