सर्वांनाच ज्यांचा अभिमान वाटतो, असे अतिशय प्रभावी, प्रतिभाशाली, शांत, धाडसी व तितकेच प्रेमळ व्यक्तिमत्व लाभलेले सर्वांचे लाडके मामा मुरुडकर हे एक आदर्श उद्योजक आहेत.
आजच्या तरुण पिढीसाठी त्यांची यशकथा निश्चितच प्रेरणादायी आहे. तर जाणून घेऊ त्यांचा जीवन प्रवास..
श्री जयंत काशिनाथ मुरुडकर उर्फ मामा मुरूडकर यांचा जन्म ३१, मार्च १९४२ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथील भारत हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील खूप श्रीमंत होते. ते व्याजाने पैसे देत. मात्र कोणताही हिशोब अथवा लिखापढी नसल्याने अनेकांनी त्यांना फसवले. सहा भाऊ व तीन बहिणी असा मोठा परिवार. अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करत, नोकरी करीत
त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले आणि अखेर ते इंजिनिअर झाले. अतिशय जिद्दी स्वभाव व मोठे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याची प्रचंड इच्छाशक्ती, धडाडी, सकारात्मक विचारसरणी व कष्टाची तयारी असल्याने ते यशाची एकेक पायरी चढू लागले.
श्री मामा मुरुडकर हे प्रथम सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीला लागले. तिथे अनेक ठिकाणी त्यांची बदली होत असे. अनेक चढ उतारांचा त्यांनी सामना केला. त्यामुळे अनेक अनुभव गाठीशी आले. १९६७ साली त्यांचे लग्न झाले. पत्नी सौ अनुराधा यांचे माहेर वाई येथील आहे. १९७२ सालच्या दुष्काळात जिल्हा परिषद, ठाणे येथे त्यांची बदली झाली. तर १९७३ साली वाई येथील धोम प्रकल्प येथे त्यांनी काम पाहिले. त्यावेळी भाड्याची खोली घेऊन ते रहात असत. वाढत्या प्रपंचाचा विचार करून त्यांनी १९७५ साली स्वखुशीने नोकरी सोडली. खरे तर त्यांना ठाणे येथे स्थायिक होण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी टेंबी नाका येथे स्वतःचे पहिले घर देखील घेतले होते. मात्र तसे झाले नाही.
मामा १९७९ साली सातारा येथे आले. सुरुवातीला ते स्वतः छोटी छोटी कामे घेऊ लागले. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळू लागले. म्हणून त्यांनी सातारा एमआयडीसीमध्ये प्लॉट घेतला. १९८२ साली त्यांनी स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यावेळी मित्रांचे खूप सहकार्य लाभले. मित्र जामिन राहिले. त्यामुळे व बँकेतून साडेतीन लाखाचे कर्ज मिळाले. त्यातून एक लाखाची मशीन घेतली. एक लाखाची शेड टाकली. उरलेले पैसे उद्योगात भांडवल म्हणून गुंतवले.
सिमेंट ब्लॉक्स, सिमेंट चॅनेल्सचे ते उत्पादन करत. पहिले एक ते दीड वर्षे उत्तम प्रतिसाद मिळाला. एवढेच करून चालणार नाही म्हणून ते आयआयटी, रुरकी येथे प्रशिक्षणासाठी गेले. तिथे त्यांनी सिमेंटच्या टाक्या तयार करणे, टॉयलेट युनिट तयार करणे, लिंटेल असे विविध प्रकारचे, फेरो सिमेंट टेक्निकचे प्रशिक्षण घेतले. या नवीन तंत्रज्ञानाचा त्यांना व्यवसायात खूप फायदा झाला. काळाप्रमाणे व वेळेप्रमाणे बदलले पाहिजे असे त्यांचे मत असल्याने दिवसेंदिवस प्रगती होत गेली.

“जशी मागणी तसा पुरवठा” हे ब्रीदवाक्य मनात ठेवून ते काम करत राहिले. कामाचा ओघ वाढू लागला. दर्जेदार, चोख व प्रामाणिक कामाची ती पावतीच होती जणू. सर्वांचा त्यांनी विश्वास संपादन केला. घरकुल योजना, पंचायत समिती, अंगणवाडी शाळा बांधणे, बागेसाठी लागणारी बाके, पाण्याच्या टाक्या, कंपाउंड शेड, रोड किलोमीटर स्टोन, मोठे सिमेंटचे पोल, चेंबर कव्हर, गांडूळ खत निर्मितीसाठी लागणारे बॉक्स अशी एक न अनेक उत्पादने त्यांनी तयार केली.

मामा ज्या वेळी साईट वर असायचे त्यावेळी पत्नी सौ अनुराधा या घर सांभाळून व्यवसायातही लक्ष देत. कामगारांकडून नीट काम करून घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे, कामाचा दर्जा पहाणे, सुपर्व्हिजन करणे, अशी कामे त्या करत. त्यामुळे मामांचा खूप मदत होई. त्यांचा कामाचा ताण कमी होत असे. वेळेचा सदुपयोग करणे, उत्तम नियोजन करणे ही एका यशस्वी स्त्रीची कला असते. त्यामुळे अनेक कामे ती एकावेळी करू शकते अशी ही अष्टभुजा पाठीशी होती त्यामुळे मामांची दिवसेंदिवस प्रगती होत गेली.
पत्नीने कुटुंब तसेच व्यवसाय अशी दुहेरी कसरत केली याचे मामांना खूप कौतुक व सार्थ अभिमान देखील आहे.जोडीदाराची भक्कम साथ असेल तर अशक्य ही शक्य करण्याचे सामर्थ्य असते असे त्यांचे ठाम मत आहे.अगदी सुरवातीपासून पत्नीने लक्ष घातले म्हणून अनेक गोष्टी सोप्या होत गेल्या.
व्यवसायात अनेक बदल होत गेले. या वाटेत अनेक चांगले वाईट प्रसंग देखील आले. व्यवसायात कमी जास्त मागणी होत असे. मात्र दोघेही न डगमगता, न थांबता, न घाबरता आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा सामना हिमतीने करीत राहिले.
फेरो सिमेंट मध्ये कुंड्या, सिमेंटचे ग्रिल जे फारसे लोक करत नाही असे काम ते आज घेतात. व्यवसायात आधुनिक बदल केल्यामुळे उत्तम मागणी आहे. मंदिराचे शिखर तयार करणे, घराचे डोम करणे तसेच आश्रम, शाळा, कॉलेज, कॅन्टीन व हॉटेल्स मध्ये बायोगॅस निर्मितीचे काम ते करत आहे.

अंगावर शहारे उभे करणारा एक प्रसंग सांगताना अनुराधा काकू खूप भावनिक झाल्या.
तो प्रसंग त्या कधीही विसरू शकत नाही, कारण मामांचा तो पुनर्जन्मच होता. बहुदा चांगले काम, अनेकांचे आशीर्वाद व परमेश्वराची कृपा म्हणून सर्व कुटुंब सावरले. तर अशी ही घटना २००९ साली घडली. त्यावेळी क्रशर रिपेरिंगचे काम सुरू होते. अचानक तो ८०० किलो वजनाचा क्रशर मामांच्या पायावर पडला. पण म्हणतात ना, “देव तारी त्याला कोण मारी ?” त्यांच्या पायाच्या हाडाचा अक्षरशः
भुगा झाला. नट बोल्ट लावून पाय जोडण्यात आला. त्यावेळी दर चार दिवसांनी ड्रेसिंग करावे लागत असे. संपूर्ण कुटुंबाने मामांची खूप काळजी घेतली. मामांची प्रचंड इच्छा शक्ती पाहून डॉक्टर देखीलआश्चर्य करत. व्यायाम, योग्य आहार व आराम केल्यामुळे ते काही महिन्यात बरे होऊ शकले.
मामांचे दातृत्व अनोखे आहे .त्यांना कोणतीही प्रसिद्धी आवडत नाही. मामांनी आजपर्यंत सामाजिक कार्यात नेहमीच मोठ्या मनाने मदत केली. जसे मंदिराचे बांधकाम असो अथवा महिला मेळावा, नवरात्रीत घेतलेले सांस्कृतिक कार्यक्रम, भागवत सप्ताह, वधू वर मेळावा अशा अनेक लहान मोठ्या कार्यक्रमात त्यांचा आर्थिक दृष्ट्या मोठा सहभाग असतो.
मामांनी मंदार सांस्कृतिक ट्रस्टची स्थापना केली असून या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत दिली जाते. तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून ते स्वावलंबी बनतील. कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक खर्च, औषध उपचारात मदत, कोरोनाच्या काळात अन्न धान्य मदत, मजुरांना वेळोवेळी मदत अशा एक न अनेक गोष्टी या ट्रस्टच्या माध्यमातून चालू असतात.
लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणे, कोणालाही न दुखवता त्यांचे दुःख हलके करणे हे त्यांना मनस्वी आवडते. यामुळे ते आज अनेकांशी जोडून आहेत. अनेकांच्या मनात त्यांचे आदराचे स्थान आहे. म्हणून ते सर्वांचे लाडके मामा मुरुडकर झाले आहेत.
बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने सातारा ब्रांच कडून मामा मुरुडकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मामा मुरुडकर यांना सामाजिक कामाची तसेच वाचन करण्याची आवड आहे.ते गेली ४० वर्षांपासून योगासने करतात. व्यवसायात नवीन प्रयोग करण्याची त्यांना आवड आहे. सामान्य लोकांना परवडेल अशी उत्पादने करणे यावर त्यांचा जास्त भर आहे.
घरचा व्यवसाय असल्याने अगदी लहानपणापासून मुलं देखील मदत करत असतात. त्यांची मोठी मुलगी सौ मनीषा विपीन विभूते ही एम.इ. इलेक्ट्रॉनिक्स असून डी.वाय. पाटील, आकुर्डी येथे हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून कार्यरत आहे. तर मुलगा मंदार याने बी.ई.सिव्हिल मध्ये प्राविण्य मिळविले असून त्याचा स्वतःचा हार्डवेअर व टाईल्सचा व्यवसाय आहे. लहान मुलगा केदार याने प्रॉडक्शन इंजिनिअरिंग केले आहे त्याचा सीएनजी व व्हीएमजी टूल्स बनविण्याचा व्यवसाय आहे.
मोठी सून सौ शुभांगी व धाकटी सून सौ ज्योती या देखील व्यवसायात बरोबरीने मदत करतात. कारण अनुराधा ताईंचे ठाम मत आहे की सुनांनी केवळ चूल व मुल न करता स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे.
अशा आधुनिक विचारांची आज समाजाला अत्यंत गरज आहे. कारण त्यामुळे केवळ त्या कुटुंबाचीच नव्हे तर समाजाची देखील प्रगती होते. आज लग्न करताना मुलींनी केवळ सरकारी नोकरी करणारा, पुणे मुंबईत रहाणार जोडीदार न पहाता एक व्यवसायिक जोडीदार निवडावा व आपल्या शिक्षणाचा उपयोग घरच्या व्यवसायात करावा अशा दृष्टीकोनाची समाजाला नितांत गरज आहे.
सौ अनुराधाताई यांना वाचनाची व बागकामाची खूप आवड असून घराच्या बाहेर त्यांनी सुंदर बगीचा फुलवला आहे.
मामा मुरुडकर व सौ अनुराधा मुरुडकर तरुणांना सांगू इच्छितात की, व्यवसायात नफा किंवा तोटा या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता सतत प्रयत्नशील असले पाहिजे. यशप्राप्तीसाठी कोणतेही शॉर्टकट्स नसतात. त्यामुळे कष्टाला पर्याय नाही. जिद्द, चिकाटी, प्रगतिशील व प्रामाणिक काम असेल तर तुम्ही नक्कीच जिंकणार. पुढे चालत रहा व थांबू नका कारण जो थांबला तो संपला.
असे हे मामा मुरुडकर व त्यांचे संपूर्ण कुटुंबच समाजासाठी एक आदर्श आहे. त्यांचे आचार व विचार अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
मामा मुरुडकरांचे कार्य अभिमानास्पद.