ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या 85 जन्मदिनाच्या निमित्ताने नगर येथील स्नेहालय संस्थेने नुकतेच, सद्भावना युवा संमेलनाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते मानसोपचार तज्ञ डॉ. भरत वटवाणी होते.
यावेळी बोलताना श्री अण्णा हजारे यांनी प्रचलित राजकीय व्यवस्था संवादाऐवजी तरूणाईला गृहीत धरत असल्याने अस्वस्थ तरुणाई हिंसक होताना दिसते आहे. अहिंसेचा मार्ग न सोडता सत्याग्रह केला, तर देशातील ही तरुणाई व्यवस्थेत पुढील दशकात स्थायी बदल घडविल, असा विश्वास व्यक्त केला.
नगर जिल्ह्यातील निंबळक येथील अनामप्रेम संस्थेच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्प परिसरात संपन्न झालेल्या या शिबिरात 16 जिल्ह्यांमधील निवडक 230 विद्यार्थी -विद्यार्थिनी सहभागी झाले होते. या शिबिरात अण्णांनी तरुणाईशी ऑनलाईन संवाद साधला. या तरुणाईला अनेक कृतीशील कार्यकर्त्यांशी संवादाची संधी मिळाली.
यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, पद्मश्री नीलिमा मिश्रा, गरिबांसाठी प्रभात फाउंडेशन तर्फे नि:शुल्क नेत्र सेवा देणारे नेत्रतज्ञ डॉ. प्रशांत थोरात, बेवारस वृद्धांना सांभाळणाऱ्या बीड येथील परिवार वृद्धाश्रमाच्या मनिषा पवार, विदर्भातील मनोरुग्णांसाठी काम करणारे डॉक्टर आरती आणि डॉ. नंदकुमार पालवे दांपत्य, बाबा आमटे यांचे निकट सहकारी आणि आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र मेस्त्री आणि सौ शालन मेस्त्री, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या निशा भोसले आणि प्रशांत पोतदार, वंचितांसाठी गेली 4 दशके काम करणारे 2 सेवाव्रती दांपत्ये सौ संगीता आणि डॉ. उमाकांत चनशेट्टी तसेच सौ.माया आणि नरेश बदनोरे, 1972 ते 1978 या काळात जगातील 68 देशात एकही पैसा खिशात न ठेवता सायकलवरून विश्वभ्रमण करणारे सुभाष सेहगल, मानसोपचार क्षेत्रात नगर जिल्ह्यात समर्पित कार्य करणारे सौ दिप्ती आणि डॉ. नीरज करंदीकर, आदी उपस्थित होते.
सेवाकार्याचा पाया
डॉ.भरत वटवाणी यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील म. गांधी, विनोबा, मौलाना आझाद, खान अब्दुल गफारखान, क्रांतिकारी भगत सिंह आणि इतरांच्या सामाजिक जाणिवांची प्रेरक उदाहरणे नमूद केली. कुठलेही सेवाकार्य अध्यात्मिक पायावर उभे असेल, तरच सफल होईल. आकाराने मोठे काम करण्यापेक्षा अत्युच्च मानवी मूल्यांच्या आधारे आणि किती उच्च गुणवत्तेचे कार्य आपण करतो, यावर त्याची प्रेरणा क्षमता अवलंबून असते असे डॉ. वटवानी यांनी शिबिरार्थींना सांगितले.
यावेळी बालमातांचे प्रश्न आणि दत्तक विधान या क्षेत्रातील अनुभव व्यक्त करणाऱ्या स्नेहांकुर संचालिका डॉ प्राजक्ता कुलकर्णी यांच्या “मायेचा स्नेहांकुर” आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न हाताळताना येणाऱ्या अनुभवाबद्दल श्री रमाकांत दोड्डि लिखित “तिमिरातून तेजाकडे” या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
मानसिक आजारांवरील “मानसग्राम” या पुनर्वसन प्रकल्पाच्या बांधकामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
नवे संकल्प
स्नेहालय परिवारातील अनामप्रेम, श्रीगोंदा येथील विद्यार्थी सहाय्यक समिती, कर्जत येथील स्नेहप्रेम, शेवगाव येथील उचल फाउंडेशन आदी संस्थांनी आयोजनात सहभाग दिला.
2 दिवसांच्या या शिबिरात सामूहिक श्रमदान, सेवा कार्याच्या नव्या दिशा आणि देशातील सद्भावनेचे आव्हान, या विषयांवरील गटचर्चा झाली. त्यातूनच येत्या 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान भारतासह, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका अशा शेजारी देशात बदलासाठी काम करणाऱ्या तरुणाईचे 31 वे युवा प्रेरणा शिबीर आयोजित करण्याचे ठरले.
राळेगणसिद्धी ते गुजरात मधील दांडी, अशी सहावी सदभावना सायकल यात्रा येत्या 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान (गांधी जयंती निमित्ताने) आयोजित करण्याचे ठरले. या यात्रेत बदल घडवणारी 100 माणसे आणि सामाजिक संस्थांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
स्नेहालयच्या सेवा प्रकल्पांना भेटी, स्थानिक गरजेनुसार असे प्रकल्प आपापल्या ठिकाणी सुरू करण्यासाठीचे मार्गदर्शन यावेळी देण्यात आले.
सेवाकार्य करीयर म्हणून स्वीकारणाऱ्या तरुणाईला आवश्यक चाकोरीबाहेरील विचारशैली वरील कृतिशील कार्यकर्त्यांनी यावेळी परिचित करून दिली.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
खुप छान 👌👌👌👍👍