जेव्हा एक स्त्री, विशेषत: ती सासु असेल आणि सुनेच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रेरणा देते, वाटेत आलेल्या प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी स्वतः सोबत करते इतकेच नाही तर तिला पुढे जाण्यासाठी बळ देते व पतीही आपल्या पत्नीचे स्वप्न साकारण्यासाठी ठामपणे तिच्याबरोबर उभा राहतो, सासरची सर्वच मंडळी तिला साथ देतात तेव्हाच, आज तहसीलदार म्हणून अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या सौ प्रिती
डूडुलकर यांच्यासारखे चमत्कार घडू शकतात.
तर जाणून घेऊ हरहुन्नरी, कर्तव्य दक्ष, धडाडीच्या व धाडसी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या या आधुनिक हिरकणीची कहाणी….
पूर्वश्रमीच्या प्रिती वसंत कोरडे यांचा जन्म नागपूर येथे दिनांक १० जुलै १९७६ रोजी झाला. आई सौ सुषमा व वडील श्री वसंत श्रीधर कोरडे यांच्या त्या जेष्ठ कन्या होत.
प्रितीताईंचे शालेय शिक्षण नागपूर येथील नवभारत विद्यालय येथे झाले. त्या बी ए च्या दुसऱ्या वर्षात शिकत असतानाच वडिलांना अटॅक आला. त्यामुळे त्यांना झोपून रहावे लागत असे. अशा बिकट परिस्थितीत त्यांनी बी.ए. व एम.ए. (इतिहास) या पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर त्या घरीच आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेऊ लागल्या. त्यांचे मामा प्रोफेसर होते. त्यामुळे आईची देखील हीच इच्छा होती की मुलीने त्यांच्या सारखे प्रोफेसर व्हावे.
पण नशिबात काही वेगळेच होते. एकदा त्या आपल्या मैत्रिणीच्या घरी गेल्या असताना तिचा भाऊ एक पुस्तक वाचत होता ‘मला फौजदार व्हायचे’ त्यावेळी प्रथमच त्यांना एमपीएससी म्हणजे नक्की काय ? हे समजले. ही परीक्षा फार कठीण असते असं त्यांना माहीत होतं. पण समजा आपल्याला हे नाही जमलं तरी या परीक्षेचा अभ्यासक्रम खुप विविध प्रकारचा, जवळपास सर्व विषय यात समाविष्ट असल्याने सर्व विषयांचे ज्ञान मिळेल आणि भविष्यात मुलांना शिकवताना महाविद्यालयीन अभ्यासक्रमासोबत इतरही काही शिकवत येईल व आपण मुलांना काही वेगळं देऊ शकु या विचाराने त्यांनी ही पुस्तके वाचायला सुरुवात केली.
मुलीने पोलिस अधिकारी होण्यासाठी परीक्षा द्यावी, पुढे पोलिसात नोकरी करावी हे आईला अजिबात मान्य नव्हते. अशात १९९९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक व विक्रीकर निरीक्षक या पदांसाठी एमपीएससीची
जाहिरात आली. त्यांनी ही परीक्षा दिली व पहिल्याच प्रयत्नात त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. मात्र त्या परीक्षेत घोटाळा झाल्यामुळे ती केस २००१ – २००५ पर्यंत कोर्टात चालू होती. त्यामुळे निवड होऊनही त्यांना प्रत्यक्षात जॉईन होता आले नाही. तरी त्या निराश झाल्या नाहीत.
मुली कितीही शिकल्या, सवरल्या तरी आई वडिलांना त्यांच्या लग्नाची काळजी असतेच. प्रितीताई तरी याला अपवाद कशा असणार ? त्यामुळे फेब्रुवारी २००४ मध्ये त्यांचा विवाह भारत सरकारच्या अकाऊंटंट जनरल खात्यात ऑडिट ऑफिसर म्हणून कार्यरत
असलेल्या श्री मंगेश वसंत डुडुलकर यांच्याशी झाला. वर्षभरातच २३ फेब्रुवारी २००५ रोजी एका गोंडस मुलीचा जन्म झाला.
मुलगी अवघी तीन महिन्यांची असतानाच एमपीएससी परिक्षेचा निकाल लागला व प्रितीताईंची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. ही खूप आनंदाची गोष्ट होती. मात्र त्या चिमुकल्या जीवाचे संगोपन, ते खडतर ट्रेनिंग व नोकरी अशी तिहेरी कसरत करणे खूप कठीण, खूप आव्हानात्मक होते.
एकीकडे आईची ममता तर दुसरीकडे स्वतःला सिद्ध करायची संधी या परिस्थितीत निर्णय घेणे खूप कठीण होते. कारण अशी संधी पुढे मिळेल न मिळेल याची काही शाश्वती नव्हती.
त्यात त्यांच्या आईचा या सर्व गोष्टींसाठी पूर्ण विरोध होता. मात्र पतीने धीर दिला. पाठींबा दिला आणि सांगितले तू जरूर जा, करून पहा, अनुभव घे व नंतर काय तो निर्णय घे. सर्वात मोठा प्रश्न होता त्या पाच महिन्याच्या जीवाचा. तेव्हा त्या त्यांचे गुरू श्री धनंजय काणे यांना भेटल्या व काय करावं म्हणून सल्ला घेतला. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘तुला संधी मिळाली आहे. त्याचे सोने कर. प्रत्येक जीव आपलं नशीब घेऊन येतो. तो ही मोठा होईल. तुला कुटुंबाची भक्कम साथ आहे. तू आता मागे पाहू नको.’ हाच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.
पोलिस अधिकारी प्रशिक्षण नागपूर पासून दूर, नाशिक येथे होणार होते. तिथे मुलीला सोबत ठेवण्याची परवानगी मिळाली. पतीसह त्या नाशिक येथे गेल्या. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत पोहचल्यावर तेथील प्रमुख एक स्त्रीच होत्या पण त्यांनी मुलीला सोबत ठेवता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या भरवश्यावर त्या आल्या होत्या की, मुलीला तेथे ठेवता येईल, तो मार्गच बंद झाला होता. आता काय करावे ? असा मोठा प्रश्न पडला.
३० जुन २००५ ची ती रात्र त्या आजही विसरू शकत नाही. प्रचंड पाऊस पडत होता. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे काम चालू होते. त्या आतमध्ये म्हणजे अकॅडमीत तर मुलगी व पती बाहेर. अकॅडमीच्या परिसरात एक मंदिर होते. तेथे ते बाळ, वडील व मावशी थांबल्या होत्या. पण ते अवघे पाच महिन्याचे बाळ जे केवळ आईचे दूध पित होते ते भुकेले होते. रात्रभर रडत होते. काय अवस्था झाली असेल त्या माऊलीची ? विचार ही करवत नाही. ती रात्र काळरात्र होती.
मंदिराच्या बाजूला घोड्याचा तबेला होता. त्याच्या बाजूला रहाण्यासाठी क्वार्टर होते. त्यातील बुटे नावाच्या कुटुंबाने त्यांना घरात बोलावून मुलीसाठी साडीचा पाळणा बाधून दिला. दुधाची सोय केली व तुम्ही बाजूला एक खोली घेऊन राहू शकता, तुमच्या घरातील एका व्यक्तीला बोलून घ्या असा सल्ला दिला.
त्यावेळी त्यांच्या नणंदेचे देखील पोलीस कॉन्स्टेबल साठी ट्रेनिंग चालू होते. त्यांची तीन वर्षाची मुलगी प्रितीताईंच्या सासूबाईकडेच होती. अशावेळी सासूबाई सर्व सोडून प्रथमच एकट्या प्रवास करून नागपूरहून नाशिकला आल्या. तो पर्यंत त्या कधीही एकट्या एवढ्या लांब बाहेर पडल्या नव्हत्या. त्या देवासारख्या
प्रितिताईंच्या मदतीला धावून आल्या.
आता त्या खोलीत त्यांनी संसार थाटला. तिथे ते बाळ व आजी रहात होती. एक स्त्रीच स्त्रीच्या भावना समजू शकते. नाही का ? त्या सासू नाही तर प्रीतीच्या व तिच्या मुलीच्या देखील आई झाल्या होत्या.
ती वेळ, तो काळ प्रिती ताईंची सत्त्वपरीक्षा पहात होता जणू. कारण एकीकडे खडतर ट्रेनिंग चालू होते तर दुसरीकडे जेथे ही चिमुकली होती तो परिसर अकॅडमी पासून बरेच लांब होता.
रोज पहाटे ५.०० ते ८.३० परेड असायची. ८.३० ते ९.०० त्या धावत जाऊन आपल्या मुलीला दूध पाजायला जायच्या. पुन्हा ९.०० ते ३.३० कायद्याची ओळख करून देणारे तास असायचे. ते झाल्यावर पुन्हा धावत आपल्या बाळाकडे जात. संध्याकाळी पुन्हा ५.०० ते ७.०० परेड. पुन्हा धावत पळत जाऊन मुलीला दूध पाजायला जात. इतर सर्व जण जेव्हा आराम करत तेव्हा त्यांची ही कसरत, धावपळ चालू असायची. पण ती एक जिद्दी आई होती. ती थकली नाही. दमली नाही. कारण आई आपल्या पिलांसाठी काहीही करू शकते.
ती ओढ, ते प्रेम होते जे त्यांना बळ देत होते. या खडतर प्रवासाचा सामना करायला साथ होती त्या आईरूपी सासूची. त्यामुळे त्या थोड्या निश्चिंत होत्या की बाळाचा सांभाळ करणारी, ती मायमाऊली होती, तिची सासू. तिच्या लग्नानंतरची आईच जणू.
प्रितीताईंची प्रचंड धावपळ, प्रचंड ओढाताण होत असे. कारण प्रशिक्षणाच्या वेळा अगदी तंतोतत पाळाव्या लागत. उशीर झाला की शिक्षा मिळायची. आईना (सासूबाईंना) देखील त्या लेकराला घेऊन अकॅडमीमध्ये त्यांच्या वेळेनुसार पायी चालत यावं लागे. एवढं लहान बाळ खोलीत एकटे ठेवून, प्रातःविधीसाठी जाणं सुद्धा कठीण होतं. प्रत्येक लहान गोष्टीसाठी, प्रत्येक ठिकाणी बाळाला घेऊन जाणे ही सुद्धा सर्कसच होती. त्यामुळे त्या देखील खूप थकायच्या. त्या बाळाचे देखील हाल होत होते. शेवटी न राहवून आईनी एक कठोर निर्णय घेतला की त्या बाळाला नागपूरला घेऊन जातील.
तेव्हा मुलगी सहा महिन्यांची होती. नागपूरला घरी सासरे, दिर, पती, सासूबाई व आज्जेसासू सगळे मिळून मुलीला सांभाळत. मात्र जास्त वेळ दिला तो आईनी. कारण लहान लेकराचे एक स्त्रीच चांगल्या पद्धतीने करू शकते. वरचे दूध, पेज चालू केली. तिचे आजारपण, जेवण सगळं सगळं आई पाहत होत्या. काही तरी गेल्या जन्मीचे पुण्य असेल म्हणून अशा सासू लाभल्या. त्यांचे ऋण मी आजन्म फेडू शकत नाही असे सांगताना प्रितिताई खूप भावुक झाल्या.
प्रितीताई जेव्हा नागपूरला वडिलांच्या वर्षश्राद्धाला गेल्या होत्या, तेव्हा त्यांना समजले की त्यांची मुलगी नऊ महिन्याची असताना गरम वरणात पडल्याने खूप भाजली होती. ती तीन दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती.मात्र हे घरातल्यानी त्यांना सांगितले नाही कारण त्यांना माहीत होते की कोणत्याही सबबीवर प्रितिताईना घरी येता येणार नाही. जेव्हा त्या मुलीला भेटायला गेल्या तेव्हा तिच्या जखमा भरून आल्या होत्या. मात्र जी जखम या आईच्या काळजावर झाली असेल ती तर न दिसणारी व न भरून येणारी होती.
प्रितीताईंनी सासरच्या पाठिंब्यामुळे खडतर पोलिस प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आणि त्या पोलीस उपनिरीक्षक पदी रुजू झाल्या.पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी २००५ ते २०११ साला पर्यंत चोखपणे जबाबदारी निभावली.
या प्रवासातसुध्दा त्यांना मिळालेली कुटुंबाची साथ खुप महत्त्वाची होती. वेळीअवेळी कर्तव्यावर असताना त्यांचे दिर श्री गणेश वसंत डुडुलकर व जाऊ सौ. रचना यांची साथ सुद्धा खुप महत्त्वाची होती. रचना लग्न होऊन घरी आल्यावर तिने कुटुंबाची जबाबदारी चांगल्याप्रकारे निभावल्याने आईना तिची खूप मदत झाली. तिचेही उपकार मी विसरू शकत नाही असे त्या सांगतात. दरम्यान २०१० साली त्यांना मुलगा झाला. सासूबाईंचं चक्र पुन्हा पहिल्या सारखे चालू झाले. याही वेळी त्यांचे दिर श्री गणेश व जाऊ सौ. रचना यांची साथ लाभली.
त्या उपनिरीक्षक पदी कार्यरत असतानाचे त्यांनी जे अनुभव सांगितले ते काळजाला पिळवटून टाकणारे आहेत .कामठी तालुक्यात जेव्हा त्यांची पोस्टिंग होती, त्यावेळी एका तीन महिन्याचे बाळ उकिरड्यावर टाकल्या गेले होते. तेव्हा त्या बाळाला त्यांनी अनाथ आश्रमात दाखल केले. तर कुही येथे कार्यरत असताना एका वेड्या गरोदर महिलेची प्रसूती एका दुकानासमोर झाली होती. ती महिला आपल्या बाळाला हातात घेऊन रस्त्याने जात होती. तरीही कोणीही तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही की कोणतीही मदत केली नाही. तिला रक्तस्त्राव होत होता. अनेक कुत्री तिच्या मागे लागली होती. जेव्हा प्रितीताईना ही खबर मिळाली तेव्हा त्यांनी तात्काळ धाव घेऊन त्या बाळाला व आईला दवाखान्यात नेले. पुढे त्या बाळाला एका आश्रमात दिले. मात्र ती वेडी महिला पळून गेली.
त्या २००७ साली काटोल येथे कार्यरत असतानाचा एक प्रसंग त्यांनी सांगितला. एक महिला पूर्ण भाजलेली होती. अंगावर फक्त पेटीकोट होता.15 फुटांवरून सुद्धा प्रचंड दुर्गंधी येत होती. ती एकच विनवणी करत होती की मला माझ्या घरी घेऊन चला. तिला वेळेत उपचार मिळाले नव्हते. सर्व अंगातून पस येत होता. अशा अवस्थेत तिला कोणी रिक्षात देखील बसवत नव्हते. त्यावेळी एवढी दुर्गंधी येत असताना प्रितीताईंनी पोलिसांच्या गाडीतून तिला नेले.
समाजात काय चालले आहे, माणूस किती क्रूर झाला आहे, माणसांमधील माणुसकी आज राहिली नाही, माणसांचे वर्तन अतिशय घृणास्पद झाले आहे हे त्यांना जवळून पहायला मिळाले. असे एक न अनेक प्रसंग त्यांनी पाहिले, अनुभवले.
पुढे एमपीएससीची पुन्हा जाहिरात आली. त्यांनी मेडिकल रजा घेतली. फॉर्म भरला. अभ्यासासाठी एक खोली भाड्याने घेतली. तेथे त्या सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत अभ्यास करण्यासाठी जात. विशेष म्हणजे हे करत असताना सासूबाई सकाळी त्यांना डब्बा करून देत व संध्याकाळी घरी आल्यावर देखील त्यांचा रात्रीचा स्वयंपाक झालेला असायचा. म्हणजे केवळ मुलांनाच नव्हे तर त्यांच्याही जेवणाची जबाबदारी सासुबाईनी व जावेनी घेतली. संपूर्ण कुटुंबाची त्यांना पूर्ण साथ होती. प्रोत्साहन होते, म्हणूनच निकाल देखील सकारात्मक लागला व नायब तहसिलदार म्हणून त्यांची निवड झाली. नागपूर येथे त्या एक वर्ष कार्यरत होत्या.
पुढे वर्धा येथे चार वर्षे राहून २०१९ साली त्यांचे प्रमोशन होऊन त्या तहसीलदार झाल्या. तहसीलदार पदाची जबाबदारी पार पाडत असतांना मुख्यालयी राहणे अत्यावश्यक असते. त्यामुळे त्या आजही रोज घरी जाऊ शकत नाही. कुटुंब नागपूरला व त्या वर्धेत. आठवड्यातून एक दिवस घरी जायला मिळते. म्हणजे सासूबाईंची भूमिका आजही तीच. त्यात काही बदल नाही. पण त्या हे सर्व आनंदाने करतात हीच त्यांच्यातील देवत्वाची प्रचिती होय. याही कामात त्या खूप व्यस्त असतात. प्रचंड ताणतणाव असतात. हे जिकीरीचे व जबाबदारीचे काम आहे.
जर त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या नसत्या तर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक ही नोकरी कधीही सोडली नसती. मात्र आज एक पर्याय होता म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असे त्या आवर्जून सांगतात. केवळ कुटुंबाची भक्कम साथ असल्याने त्यांच्या शिक्षणाला, त्या करीत असलेल्या कामाला, त्यांच्या कर्तबगारीला पूर्णपणे न्याय देऊ शकल्या. त्यांच्या कामात त्या शंभर टक्के योगदान देऊन आपली जबाबदारी चोख निभावत आहेत.
गुरू व पती हेच प्रिती ताईंचे प्रेरणास्थान आहे. त्यांना गाणं गायची व वाचनाची खूप आवड आहे. तुमचे पुढील स्वप्न काय ? असे विचारले असताना त्या सांगतात, “मी आजवर खूप धावपळ केली. कुटुंबाला वेळ देता आला नाही. आता ती उणीव भरून काढायची आहे. शेवटी कुठे थांबायचे हे आपल्यालाच कळले पाहिजे. नाही का ? आता कोणतीही परीक्षा देण्याची इच्छा नाही. कारण अनेक लोकांना पाहिले आहे जे पुढे जाण्यासाठीच्या हव्यासापायी नुसते पळत असतात. पुढे सफल नाही झाले तर नैराश्यात जातात. त्यापेक्षा जे आहे त्यात उत्तम करत राहणे हेच महत्वाचे असे मला वाटते.”
तरुणांना मार्गदर्शन करताना त्या सांगतात, भविष्यात काय करायचे हे आधीच निश्चित करा. त्या दिशेने पूर्ण प्रयत्न करा. यश तुमचेच आहे.
मुलींना लग्नानंतर देखील स्वतःचे करिअर करता येते. स्वतःची समाजात ओळख निर्माण करता येते. मात्र त्यासाठी कुटुंबाची साथ लाख मोलाची असते. पण स्वतंत्र संसार थाटून हे शक्य नसते. म्हणून आपल्या कुटुंबाशी जुळवून घ्या. वेगळे रहाण्याचा अट्टाहास न करता सर्वांच्या सोबतीनेच तुम्ही पुढे जाऊ शकता असा लाख मोलाचा सल्ला त्या देतात.
प्रचंड इच्छाशक्ती, सकारात्मक विचारसरणी, जिद्द, चिकाटी व प्रेमळ स्वभाव अशा सर्वगुणसंपन्न प्रितीताई सर्व महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.

– लेखन : रश्मी हेडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
एकीकडे आई चे कर्तव्य पूर्ण करून पोलिसाचे पण कर्तव्य पूर्ण केलेखरंच ताई तुम्हला मनापाऊस सलाम
जय हिंद 🙏🙏🙏
आदरणीय भुजबळ साहेब यांचे storytoday या web portal च्या कामकाजात त्यांची सुविद्ध पत्नी सौ अलका हीचा सिंहाचा वाटा असून बहुतेक एडिटिंग चे सर्व कामकाज त्या स्वतः हाताळीत आहेत म्हणून तर हे पोर्टल नियमित पणे रोजच्या रोज जगभरातील असंख्य चाहत्यांना पोहचत असून जगभरातील लाखो लोक त्याचा आस्वाद घेत असतात त्यांचेही कौतुक व अभिनंदन
खर तर प्रितीची इच्छाशक्ती जिद्द व चिकाटी आणि कुटुंबाची साथ खासकरून सासूबाईंची व पतीची सहकार्याची भावना यामुळे प्रीतीने आपल्या समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे ,खासकरून सौ रश्मी उल्हास शेठ हेडे सातारा या कथेची लेखिका हिने प्रितिकडून ही जी संघर्षमय आयुष्याची माहिती अत्यंत खुबीने मिळवली असणार यामध्ये तिळमात्र शंका नाही रश्मीचे ही कौतुक करावे तेवढे थोडेच आहे विशेष म्हणजे जनसामान्यांपर्यंत अशाप्रकारच्या आव्हानात्मक जीवन कहाण्या पोहचविण्याचे कार्य सेवानिवृत्तीनंतर सुध्दा आरामात घरी न बसताआदरणीय देवेंद्र जी भुजबळ साहेब करीत आहेत हे ही कौतुकास्पद असल्याने त्यांचेही अभिनंदन व कौतुक
प्रितीताईंना खरेचं मानाचा मुजरा त्यांच्याधाडसाला सलाम 🙏🙏🙏🙏खुप प्रेरणादाई लेख