वंध्यत्व
आई होणे हा प्रत्येक स्त्रीला हवाहवासा वाटणारा अनुभव आहे. परंतु दुर्दैवाने प्रत्येक स्त्री आई होण्याचे सुख अनुभवु शकत नाही. वर्षानुवर्षे दवाखान्याच्या पायर्या झिजवून देखील त्या दांपत्यास अपत्यप्राप्ती होत नाही. अशा वेळेस येणारे नैराश्य हे भयानक असते.
आर्युवेदामध्ये वंध्यत्वावर जरी निरनिराळे उपचार सांगितले असले तरीसुद्धा “सौमनस्य गर्भाधारणाम् श्रेष्ठ” असा उल्लेख आहे. म्हणजे मनाची सुस्थिती हा गर्भ धारणेचा सर्वात श्रेष्ठ हेतु सांगितला आहे. परंतु कित्येक वेळा मानसिक स्वास्थ्य व दाम्पत्याला एकमेकांसंबधी वाटणारा जिव्हाळा प्राकृत असुनदेखिल गर्भधारणा होत नाही. अशावेळी स्त्री किंवा पुरुषामध्ये जननांगासंबंधी काही शारिरीक दोष असू शकतो. शारिर रचनात्मक दोष नसेल तर शारिर क्रियात्मक दोष असु शकतो (Hormonal imbalance).
फक्त स्त्री वंध्यत्वाचा विचार केल्यास अंडाशयाचे आजार (PCOD). वाढलेले वय, थायराॅईडचे आजार, अतिस्थूलता किंवा अतिकृशता गर्भाशय नलिका बंद असणे (fallopian tube block) इत्यादि कारणे प्रामुख्याने दिसुन येतात.
आयुर्वेद चिकित्साप्रणाली नुसार या सर्व व्याधींची रुग्णाचे वय, प्रकृति, ऋतु, अग्नि (भूक लागणे व अन्न पचवण्याची क्षमता) ह्या गोष्टींचा विचार करुन केली जाते.
“यथा पिंडी ते ब्रम्हाडी” या न्यायानुसार आयुर्वेदामध्ये गर्भधारणेची तुलना हि बीजापासून अंकुर निर्मितीशी केलेली आहे. ज्याप्रमाणे अंकुर निर्मितीसाठी ऋतु म्हणजे योग्य असे वातावरण किंवा काल, क्षेत्र म्हणजे सुपीक जमीन. अंबु म्हणजे पाणी आणि बीजाची गरज असते त्याचप्रमाणे गर्भनिर्मितीसाठी ऋतु म्हणजे योग्य काल म्हणजेच मासिक पाळीचा रक्तस्त्राव थांबल्यापासून 5 वा दिवस ते 14/16 वा दिवस हा योग्य काल समजला जातो. यालाच आधुनिक शास्त्रामध्ये (Fertile Period) असे देखील म्हटले जाते. परंतु या कालासाठी स्त्रियांचे मासिक चक्र नियमित पणे 28-30 दिवसांचे असावे लागते.
PCOD सारख्या व्याधींमध्ये स्त्रियांचे मासिक चक्र नियमित नसते. त्यामुळे स्त्रिबीज (ovum) निर्मिती होत नाही. परिणामी गर्भधारणा होत नाही. PCOD शिवाय थायराॅईडचे आजार Hormonal imbalance यामुळे सुध्दा स्त्रीबीज (ovum) निर्मिती होत नाही.
अशा आजारांमध्ये व्याधी व व्यक्तीची प्रकृती बघून नस्य अशा पंचकर्माच्या जोडीला काही औषधांचे प्रयोजन करुन चिकित्सा केली जाऊ शकते.
क्षेत्र = क्षेत्र म्हणजे गर्भाधारणा झाल्यानंतर गर्भ जिथे वाढणार आहे असा अवयव म्हणजेच “गर्भाशय” होय. ज्याप्रमाणे नापीक जमिनीमध्ये पीक येणे अशक्य असते त्याचप्रमाणे गर्भाशयाच्या विकृतीमध्ये गर्भधारणा होत नाही. यामध्ये गर्भाशय प्रमाणापेक्षा लहान असणे (Hypoplastic uterus). गर्भाशयाच्या अंत:त्वचेची विकृति (absence of functional endometrium) गर्भाशयाचा TB ई, विकांराचा सामावेश होतो.
याशिवाय गर्भाशयामध्ये गाठ असणे (Fibroid uterus) किंवा गर्भाशयाचे मुख सैल असणे (Patuolus os) यामध्ये गर्भाधारण जरी झाली तरी गर्भापात होण्याची शक्यता अधिक असते.
अशा वेळी गर्भाशयाचे बल वाढण्यासाठी बला, अश्वगंधा, शतावरी, सारखी औषधे वापरली जातात. गर्भाशयाची शुद्धी करण्यासाठी तर उत्तरबस्ती सारखा श्रेष्ठ उपक्रम दुसरा कुठलाही नाही. गर्भाशयातील गाठ जर 4 cm पेक्षा कमी असेल तर तिचा आकार कमी होण्यासाठी सुद्धा औषधे दिली जातात त्यामुळे यासाठी लागणारे शस्त्रकर्म सुद्धा टाळता येऊ शकते.
अंबु =अंबु म्हणजे मातेने घेतलेल्या आहारापासून बनणारा आद्य आहाररस होय. जर स्त्री आहारविषयक अपथ्यांचे पालन करत असेल तर बनणारा आहाररस हा निकृष्ट प्रतीचा बनतो. परिणामाने आहाररसापासून मातेच्या शरीरात तयार होणारे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सप्त धातु विकृत स्वरूपाचे बनतात. म्हणजेच हे धातु स्वतःचे प्राकृत/स्वाभाविक कर्म योग्य प्रकारे करू शकत नाहीत.
यामधील शुक्राचे आद्य कार्य प्रजोत्पादन हे आहे. स्त्री जर योग्य आहार घेत नसेल तर स्त्रीला प्रजनन क्षमतेवर वरील प्रकारे परिणाम होऊ शकतो.
याशिवाय आहाररसापासून निर्माण होणारा प्रथम धातु म्हणजे रस धातु याचा स्त्रियांच्या मासिक पाळीशी प्रत्यक्ष संबंध असतो.
आजकाल बरेच स्त्रियांचे मासिक चक्र बिघडलेले असते याचे कारण म्हणजे जंक फूड, शीत पेयाचे अतिसेवन अतिमसालेदार आहार असु शकते.
बीज = या शब्दाद्वारे पुरुषबीज व स्त्रीबीज असा उभय अर्थ घ्यावा. कारण गर्भधारणा ही दोन्ही बीजांच्या संयोगानेच होत असते. दोन्हीपैकी एकामध्ये जरी दोष असला तरी गर्भाधारणा होत नाही. किंबहुना झाल्यास गर्भपात होणे, बाळामध्ये शारीरिक अथवा मानसिक व्यंग असणे अशा समस्या उदभवतात.
स्त्रीबीजाचा विचार करता वैज्ञनिक दृष्टिने ३० च्या पुढे स्त्रीबीजांची संख्या तसेच त्यांचा दर्जा हा देखिल खालावत जातो. आजकालच्या आधूनिकीकरणामुळे रजोनिवृत्ति (menopause) जी पुर्वी ४५- ५० व्या वर्षामध्ये यायची, ती हल्ली तिशी मध्ये देखिल पहायला मिळते.
अकाली रजोनिवृत्तीमुळे (premature menopause) केवळ गर्भधारणाच नव्हे तर स्त्रीयांना इतरही सार्वदेहिक समस्या जसे, हाडे ठिसूळ होणे, हृदयविकार, लघवीचे आजार यांना सामोरे जावे लागते.
पुरुषबीजाचा विचार करता जरी पुरुषांची प्रजनन क्षमता वयाच्या ५०- ५५ वर्षापर्यंत कार्यरत असते असे वैज्ञानिक दृष्टिने म्हटले जात असले तरी दिवसेंदिवस पुरूष वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. याची कारणे खालील प्रकारे असु शकतात.
मधुमेह =या व्याधीमुळे लिंगामध्ये ताठरता न येणे (Erectile dysfunction) हे लक्षण दिसते.
गालफुगी (Mumps) सारखा आजार लहानपणी झाला असल्यास त्याने वृषण ग्रंथीला(Testis) इजा पोचते.
उष्ण कटीबंधात काम करणे जसे ड्रायव्हर, आचारी, खाणीत काम करणारे कामगार तसेच घट्ट अंर्तवस्त्र वापरणे. यामूळे वृषण ग्रंथीचे तापमान वाढून त्याचा परिणाम म्हणुन शुक्रोत्पादन (Spermatogenesis) प्रक्रियेमध्ये बिघाड येऊ शकतो.
पुरुषबीज विकृतीमध्ये अल्प शुक्राणु, शुक्राणु नसणे (azoospermia), विकृत शुक्राणु (teratospermia), शुक्राणुची गती कमी असणे (asthenozoospermia) अशा अनेक विकृतींचा सामावेश होतो. स्थूलतेमुळे संभोगाच्या वेळी समस्या येऊन गर्भधारणा होऊ शकत नाही.
आयुर्वेदातील विविध औषधे वापरून तसेच पंचकर्म चिकित्सा प्रणालीचा उपयोग करून अल्प शुक्राणु, विकृत शुक्राणु, शुक्राणुची गती कमी असणे यांची यशस्वीपणे चिकित्सा केली जाऊ शकते.
याशिवाय आयुर्वेदामध्ये गर्भाधारणेपूर्वी स्त्री आणि पुरूषांसाठी ठराविक पद्धतीचा आहार देखील सांगितला आहे. त्याचा उपयोग करून गर्भाधारणेस नक्की मदत होऊ शकते.
त्यामुळे वंध्यत्वामध्ये आयुर्वेदिक चिकित्सा प्रणालीचा उपयोग करून दांपत्यास नक्कीच प्राकृत गर्भाधारणा होण्यास मदत होऊ शकते.

– लेखन : डॉ. वर्षा गायकवाड आनंद
BAMS.MS, स्त्रीरोग एवं प्रसुतीतज्ञ
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800