एकच गाव, पण ते अनुभवण्याची, पाहण्याची दृष्टी कशी वेगवेगळी असते, याचे उदाहरण म्हणजे आजचे
“आम्ही नाशिककर…”
यापूर्वी श्री विलास कुडके लिखित “आम्ही नाशिककर” आपल्या पोर्टलवर प्रसिध्द झाले आहे. आज पाहू या सौ वासंती पाठक यांच्या नजरेतून “आम्ही नाशिककर” ….
– संपादक
एक आट पाट नगर होतं. त्या नगराचे नाव नाशिक. काय आहे या नगरीचे वैशिष्ट्य ?…
नाशिक ही एक प्राचीन, ऐतिहासिक, धार्मिक सांस्कृतिक, साहित्यप्रेमी नगरी. नाशिक हे एक ऐतिहासिक व धार्मिक तीर्थक्षेत्र असल्यामुळे अनेक सरदारांचे वास्तव्य येथे होते.
याशिवाय धार्मिक दृष्टीने नाशिक चे एक वेगळेच महत्व आहे..गोदावरीच्या काठावर अनेक वाड्यांमधून वास्तव्यास असलेली जाणकार पुरोहित मंडळी, नाशिकला असणाऱ्या असंख्य व्यायाम शाळा. त्यात व्यायामाची आवड असणारे अनेक तरुण शारीरिक ताकदीने मजबूत असलेले अनेक पहिलवान, कुस्तीपटू ! त्यामुळे खाद्य संस्कृती इथे बहरली नाही तरच नवल!
पूर्वीचे नाशिक म्हणजे गोदावरीच्या काठावर वसलेले टुमदार गाव ! सोमवार पेठ, तिवंधा, मधली होळी, भद्रकाली पंचवटी या भागात राहणारी ही मंडळी..
ज्या काळात हॉटेल हा प्रकार उदयाला आलेला नव्हता त्या काळात एकत्र कुटुंब पद्धती वाड्यातून नांदत होती. तिथे रोजचे जेवण सुध्दा चौरस षडरस युक्त असे परिपूर्ण होते. कार्य प्रसंगाला आचारी लावून गोड धोड पदार्थ बनविले जात. आपले नेहमीचे जेवण करून झाल्यावर एकेका बैठकीमध्ये बेट लावून शंभर जिलेबी, गुलाबजाम सहज खाऊन पचविण्याची क्षमता या काळातील लोकांकडे होती.
तेव्हाचे नाशिक हे पंचवटी आणि मेन रोड या ठिकाणी एकवटलेले. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत हॉटेल नावाची संस्कृती फारशी उदयाला आलेलीच नव्हती. जी काही बोटावर मोजण्याइतकी होती ती म्हणजे मेन रोडवरील भगवंतराव हॉटेल आणि पांडे मिठाई, बुधा जिलेबीवाले इतकीच ! म्हणजे खवय्यांची रसना तृप्त करण्याची हमखास ठिकाण.
या तीनही हॉटेलना जवळपास शंभर वर्षाचा इतिहास आहे. व्यायाम शाळेत व्यायाम करून आल्यानंतर मिसळ आणि बुध्याची जिलेबी खाल्ली की सकाळ सत्कारणी लागली असे मानले जाई. त्यानंतर लोखंडी कढईत गरम गरम मिळणारे मलईदार दूध असा आहार घेतल्याशिवाय दिवस सार्थकी लागत नसे.
भगवंतराव हॉटेल हे नाशिकमधील सगळ्यात जुने हॉटेल. नाशिकच्या अनेक पिढ्यांनी त्यांच्या खमंग पदार्थांची चव चाखली आहे.त्यामुळे या तीनही ठिकाणी मिळणाऱ्या वस्तू अतिशय रुचकर, चविष्ट ! दिवाळीत तर भगवंतरावमध्ये फराळाच्या पदार्थांसाठी रांगच लागलेली असायची.
पांडे मिठाईकडे लस्सीचा एक भलामोठा ग्लास पाहूनच मन तृप्त व्हायचं! पोटात गेल्यावर तर गारच गार! पेढा, असेल, दूध असेल, सगळ असंच !
मेनरोड वरील सुरती फरसाण हे एक अतिशय नावाजलेलं, सर्व प्रकारचे खारे पदार्थ मिळण्याचे अप्रतिम ठिकाण. इथले फरसाण, शेव, चिवडे, तळलेल्या डाळी, कचोरी यांना तोड नाही. येथील कढी भेळ हा पदार्थ एकदम ‘हटके’ ! मेन रोड आणि आजूबाजूचा परिसर फिरताना कढीभेळ ची एक प्लेट खाल्ली की मन आणि शरीर दोन्ही तृप्त !
भद्रकालीच्या कोपऱ्यावर असणाऱ्या सायंतारा या अत्यंत छोटेखानी होटेल ने स्वतःची ओळख 50, 60 वर्षापासून आजही तशीच ठेवली आहे. तिथे मिळणारा साबुदाणा वडा आणि चटणी यांची चव नाशिककरांनी चाखली नाही असा माणूस विरळा ! बटाटा कचोरी पण अप्रतिम !
बाहेरून येणारे पर्यटक आणि पाहुणे मंडळींना नाशिकची ओळख म्हणजे नाशिकचा चिवडा. आवर्जून हा नाशिकचा चिवडा प्रसिद्ध करण्यामागे माधवजी का बढिया चिवडा तर आहेच पण मकाजी, कोंडाजी पण आहेतच! सर्वत्र हे तीनही खमंग चिवडे आवर्जून घेतले जातात आणि नावाजले जातात.
चिवड्याबरोबरच भत्ता हा प्रकारही नाशिकमध्ये चांगलाच रुळला आहे. त्यामध्ये सानप बंधु, कऱ्हाड बंधू यांचा भेळभत्ता ट्रीपला जाताना बरोबर हवाच ! किंवा घरी चटकन चवदार भेळ खाण्याची इच्छा झाली की आणला भत्ता !
नाशिक मधील अत्यंत प्रसिद्ध पावलेली आणि पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर प्रसिद्ध असलेली नाशिकची मिसळ म्हणजे नाशिक आणि मिसळ यांचे एक अतूट नातं आहे. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये कमला विजय, भगवंतराव किंवा अंबिका काळा मसाल्याची मिसळ ही दोन, तीन गावातली महत्त्वाची मिसळ मिळण्याची ठिकाणे होती.
आता वाढत्या शहराच्या पसाऱ्या बरोबर असंख्य मिसळीचे प्रकार चाखायला मिळतात. आताच्या काळात चुलीवरची मिसळ हा एक लोकप्रिय पदार्थ झाला आहे. कोणे एके काळी दिवसभर राबणाऱ्या गरीब कामगारांसाठी मिसळ आणि चार-पाच पाव असा पोटभर आणि ताकद मिळेल असा सोपा आणि पोटभरीचा असणारा नाश्ता पाहता पाहता गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच सामावून घेणारा ठरला ! या मिसळी ने आणि तिच्या चटकदार चविने एकूण सगळ्यांनाच गारूड केलं हे खरं !
नाशिक मिसळ म्हणजे भरपूर उसळ, सोबत दोन प्रकारच्या रस्स्याचे मग. पापड, दही, कांदा लिंबू… आहाहा ! लिहिताना सुध्दा तोंडाला चटकन पाणी सुटेल अशी ही लज्जतदार मिसळ ! आणि सोबत गुळाची जिलेबी ! वासाने भूक नाही चाळवली तरच नवल! श्यामसुंदर, मामाचा मळा, ओवारा मिसळ, हॉटेल चूल, अशा अनेक ठिकाणांची मिसळ प्रसिद्ध पावलेली आहे. नाशिक करांचा रविवार मिसळीवर सुरू होतो …आणि ती खाऊन पोटात बसली कि मग संध्याकाळ पर्यंत निवांत काम करायला सगळे मोकळे!
अशा या बेमिसाल मिसळ नाम्यानंतर नाशिक मध्ये अनेक खवय्यांना मोहात पाडतील अशी काही कॉन्टिनेन्टल फुड मिळण्याची ठिकाणं तयार झाली आहे, बरं का ! आताच्या तरुणाईला साद घालणारे ठिकाण म्हणजे कॉलेज रोड गंगापूर रोड येथील किलबिल शाळेसमोर लागणारी खाऊ गल्ली ! येथे सर्व प्रकारचे पदार्थ जसे पराठा, पावभाजी पासून तर मेक्सिकन फूड , चायनीज पर्यंत सर्व उपलब्ध आहेत . त्याचबरोबर चाट भांडार देखील हव्या त्या पद्धतीने जिभेचे चोचले पुरवायला तयार आहे. साउथ इंडियन डिश देखील या भागात मुबलक आणि छान चवीच्या आहेत. पिझ्झा बर्गर यासाठी मॅकडोनाल्ड आहेच.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या जिभेला मोहात पाडणारा पदार्थ म्हणजे भेळ. नाशिकच्या असंख्य नाक्यावर जरी भेळ मिळत असली तरी शौकीनची भेळ खाल्ली नाही असा माणूस नाशिक मध्ये सापडणे विरळच ! झणझणीत झटका देणारी पाणीपुरी आणि भेळ यासाठी खवय्यांची तेथे रांग लागलेली असते.
मिठाई साठी पांडे मिठाई, बुधा हलवाई ! अगरवाल स्वीट. आताच्या काळातलं सागर स्वीट, बग्गा स्वीट, येथे अतिशय दर्जेदार आणि चवदार असे पदार्थ आपल्याला मोहात पाडतात. बुधाची जिलेबी ही अत्यंत रुचकर, जाड आणि खमंग तळलेली. नूर मोहम्मद हाजी ही मिठाईची दुकाने देखील खूप प्रसिद्ध आहेत.
त्याचबरोबर बदलत्या काळानुसार नॉनव्हेज मिळण्याची सुद्धा असंख्य हॉटेल्स आणि त्याचे प्रकार उपलब्ध आहेत. कोकणी दरबार, सोनाली मटन भाकरी, जयदुर्गा, बारबेक्यू विले, दिवट्या बुधल्या इत्यादी अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत.
नाशिक मधल्या पेशवाई पान सेंटर मध्ये एकशे अकरा प्रकारची पाने मिळतात. त्यात फायर पान हा एक जरा हटके आणि तरुणाईत फेमस.
त्याचबरोबर येथे असणारे ढाबे आणि त्यामध्ये मिळणारे शेवभाजी, नान, रोटी, दाल तडका इत्यादी पदार्थ नक्कीच चाखावेत असे आहेत.
उन्हाळ्यात सगळ्यांची तहान भागवून शरीराला थंडावा देण्याचं अत्यंत महत्त्वाचे आणि नावाजलेले ठिकाण म्हणजे समर्थ ज्यूस सेंटर. येथे आजही अनेक प्रकारचे ज्यूस विथ आइस्क्रीम मिळतात. पायपीट करून केलेली खरेदी आणि त्यानंतर आलेला सगळा शीण घालवण्याचं हमखास रविवार कारंजा येथे पायनापल ज्युस सेंटर.
महाराष्ट्र आणि गुजरात ह्यांचे एकमेकांशी असणारे नाते घट्ट करण्याचे काम गुजराती थाळी ने नक्कीच केले. दुपारी भरपेट आणि वैशिष्ट्यपूर्ण जेवण करायचं असेल आणि भरपूर पदार्थ खायचे असतील तर हॉटेल पंचवटी हा उत्तम पर्याय. आताच्या काळामध्ये राजभोग, पुरोहित याठिकाणीही विविध भाज्या, चटण्या, कोशिंबिरी यांच्यासहित मिळणारी गुजराती थाळी आणि सोबत ताक ! एक परिपूर्ण स्वाद असलेले शुद्ध शाकाहारी जेवण.
नाशिक हे मुंबई साठी जशी परसबाग आहे, तशी निवांत दोन घटका येउन अस्सल पदार्थांची चव मिळण्याचं माहेर घर आजही आहे असं म्हणायला हरकत नाही.
अशीही नाशिक नगरीची साठाउत्तराची खाद्य कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

– लेखन : वासंती पाठक. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
व्वा.. नाशिक नगरीत क्षणात सफर करुन आणणारा, नाशिकची ओळख अधोरेखित करणारा समर्पक सुंदर लेख