दही
मागील लेखात आपण गायीचे दूधा विषयी जाणून घेतले. आज आपण गायीचे दही व त्याचे गुण तसेच दही खाण्याचे नियम ह्या विषयी माहिती घेऊ या.
आपल्या आहारातील परिचयाचा पदार्थ म्हणजे दही. सरसकट सर्व पदार्थ कसेही कोठेही खाल्ले तर ते पौष्टिकच असतात असा बऱ्याच जणांचा समज असतो. दही हा त्यातील एक पदार्थ. त्यामधील जिवाणू हे आतड्यांसाठी चांगले असतात म्हणून दही रोज खाणारी देखील माणसे आहेत. आजकाल दही मिश्रित फळे yogurt ह्या नावाने बाजारात मिळतात त्याही बद्दल जाणून घेऊ.
आयुर्वेदात, आठ प्रकारच्या प्राण्यांच्या दुधाचे व दह्याचे वर्णन केले आहे. आपण मात्र गायीच्या दुधापासून निर्मित दह्याचे गुण पाहु, कारण आयुर्वेदात हेच दही सेवनास योग्य सांगितले आहे.
दह्याचे गुण –
*भोजनात रुची उत्पन्न करते
*भुक वाढवते, बल वाढवते
*आंबट रसाचे व उष्ण आहे.
बऱ्याच लोकांना असे वाटते की दही हे थंड आहे. कारण जिभेला त्याचा स्पर्श थंड होतो. पण प्रत्यक्षात ते उष्ण आहे. म्हणूनच पोटाला गार वाटावे म्हणून लोकं दही खातात. परंतु तसे नसते.
*अर्धे विरजलेले दही पचायला जड व कृमि उत्पन्न करणारे आहे. त्यामुळे त्याचे सेवन करणे निषिद्ध आहे.
* कपड्यातून गाळलेले दही, म्हणजेच ज्या दह्यातुंन पाणी काढले आहे. (चक्का) –
असे दही हे वात कमी करणारे, कफ वाढवणारे, अति स्निग्ध, भोजनात रुची निर्माण करते, पचण्यास जड आहे.
म्हणूनच श्रीखंड जे चक्क्यापासून बनते ते मेदस्वी व कफ रोग ग्रस्त, ज्यांना भूक लागत नाही अशा व्यक्तींनी सेवन करू नये.
* दधी सार (दह्यावरची मलई) –
पचण्यास जड, बल देणारी आहे, परंतु ज्यांची पाचन शक्ती जास्त आहे त्यांनीच हे सेवन करावे.
*असार दही (मलई विरहित) –
पचण्यास हलके, गुणाने रुक्ष आहे, वात वाढवणारे व मलावष्टम्ब (constipation) करणारे आहे.
*मस्तु (दह्यावरील पाणी) –
तहान, श्रम, अरुची घालवणारे आहे, मलाचे भेदन करून त्यास बाहेर काढणारे, शरीरातील स्रोतस मोकळी करणारे आहे. परंतु आम्ल तुरट रस व आवृष्य (शुक्राणूंना अयोग्य) असल्यामुळे ह्याचे नित्य सेवन करू नये.
* दही सेवनाचे नियम-
१ दही रात्री सेवन करू नये.
२ दही ग्रीष्म, वसंत, शरद ऋतूंमध्ये सेवन करू नये
(इंग्लिश महिने – मार्च, एप्रिल, मे, सप्टेंबर, ऑक्टोम्बर)
३ हेमंत, शिशिर ऋतु मध्ये दही खाणे चालेल.
(इंग्लिश महिने – नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी)
हे ४ महिने, नुसते दही कधीही खाऊ नये, त्यासोबत मध, साखर, तूप, मुगाचे वरण, अथवा आवळ्याचे चूर्ण ह्यापैकी एकतरी असावे. त्यामुळे दह्याचे पाचन सुकर होते आणि इतर त्रास होत नाही. दह्यासोबत एवढेच मिश्रण अपेक्षित आहे. त्यामुळे फळांसोबत दही आयुर्वेदाला मान्य नाही.
५ दही तापवून/गरम करून खाणे व्यर्ज आहे-
म्हणून दही भात खाताना, भात अधिक गरम नसावा. तसेच कढी बनवताना ताकाला दिलेली फोडणी थोडी कोमट असताना त्यात टाकावी.
बऱ्याच जणांना दही ओक सात्म्य म्हणजेच सतत सेवन केल्याने शरीरास अनुकूल झालेले असते. अशा व्यक्तींनी निदान रात्री दही सेवन टाळावे. तसेच त्याच्या सोबत आवश्यक गोष्टींचे सेवन करावे. आणि दह्याचा अतिरेक करू नये.
* वरील नियम न पाळता दही सेवन केल्यास आयुर्वेदानुसार शरीराच्या खालील तक्रारी जाणवतात ज्वर (ताप), रक्तपित्त (नाक, मुख, मूत्र अथवा मलावाटे रक्त येणे), विसर्प- कुष्ठ (त्वचा विकार), केस गळणे, केस पिकणे, पांडु (ऍनिमिया), सांधे जखडणे अथवा सूज येणे, दुखणे ह्यांसारखे अनेक रोग होतात.
सतत असा अतिरेक झाला तरच ह्या व्याधी उद्भवतात
म्हणूनच दही खा पण शक्य तितके आयुर्वेदाचे नियम पाळूनच. कारण आहार असला तरी अतिरेक नको.
भेटू पुढल्या लेखात. तो पर्यंत…
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे।।

– लेखन : प्रा वैद्य शार्दूल चव्हाण.
एम.डी. आयुर्वेद, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800