Wednesday, June 18, 2025
Homeलेखआयुर्वेद उवाच : ६

आयुर्वेद उवाच : ६

नमस्कार मंडळी.
मागच्या लेखात आपण दह्या विषयी माहिती घेतली. या लेखात ताक समजून घेऊ या.

तक्र (ताक)
तक्र शक्रस्य दुर्लभम ।।
म्हणजे इंद्राला अमृत मिळेल परंतु ताक नाही, ताकास पृथ्वीवरील अमृत म्हटले आहे. तरी सुद्धा त्याचे काही नियम आहेत ते पाहू.

ताक दह्या पासून तयार होते तरी त्याचे गुण वेगळे आहेत. कारण त्यावर होणारे अन्न संस्कार होत.

ताकाचे गुण :
ताक मधुर, आम्ल व तुरट रसाचे असते, पचायला हलके, रुक्ष, भूक वाढवणारे आहे.

सूज, अतिसार (dysentry), ग्रहणी (अपचनाचा जुनाट विकार), पांडुरोग (anemia), अर्श (मूळव्याध), प्लिहा रोग (spleen disease), गुल्म (पोटात गोळा येणे), तृष्णा (सतत तहान लागणे) , प्रसेक (सतत लाळ गळणे), मेदाचे विकार, कफाचे विकार, कष्टानं मूत्र प्रवृत्ती, अति तेलकट तुपकट पदार्थ खाऊन होणारे अपचन, उलट सुलट खाऊन होणारी अन्न विषबाधा.
ह्या सर्व रोगांमध्ये आहारीय द्रव्यात ताक समाविष्ट करावे.
काही रोगांमध्ये ताक हेच अन्न, पाणी आणि औषध म्हणून दिले जाते.

ताक निर्माण विधी :
दह्याला घुसळवून त्यातून लोणी काढल्यावर उरलेल्या दह्यात अर्धा भाग पाणी घालून जे ना अधिक घट्ट ना अधिक पातळ असा द्रव पदार्थ बनतो ते म्हणजे ताक.

ताक पिण्याचे लाभ व काळ :
ताक हे शितकाळात प्यावे. जेव्हा अन्न पचत नसेल भूक नसेल तेव्हा ताक घ्यावे. कफाचे रोगात, शरीर जड वाटत असताना, पोटात सतत वायु धरत असेल अशा वेळी ताक घ्यावे.

ताक केव्हा पिऊ नये :
व्रण (जखम) झालेल्या व्यक्ती, क्षत क्षीण झालेल्या व्यक्ती, उष्णकाळात (उन्हाळ्यात, ऑक्टोबर हिट) मध्ये, स्वभावातः अथवा आजाराने दुर्बल व्यक्ती, मूर्च्छा (चक्कर), भ्रम (hallucinations), दाह, रक्तपित्त (नाक, मुख, मूत्रमार्ग, मलमार्ग ह्यातून रक्तस्त्राव) अशावेळेस ताकाचे सेवन करू नये.

वास्तविक पाहता ताक थंड म्हणून आपण सेवन करतो, परंतु ताक उष्ण आहे, ते पाचन शक्ती सुधारते आणि म्हणून त्याचा उपयोग योग्य प्रकारे करावा.

मधुर व आम्ल ताकाचे गुण :
हे ताकाच्या दह्यावरून कळते. जर दही जास्त आंबट असेल तर ताक हि आंबट होणार.
मधुर ताक – कफ वाढवते, पित्त कमी करते
आंबट ताक – वात कमी होतो, पित्त वाढते

दोषांनुसार ताकाचे सेवन :
वात वाढल्यास – आंबट ताक + सैंधव मीठ
पित्त वाढल्यास – मधुर ताक + साखर
कफ वाढल्यास – ताक + सुंठ+ मिरे + पिंपळी

तक्र कुर्चिका :
ताकाला तापवून थोडे घट्ट करणे (कढी). हे मलाला बांधून ठेवणारे, वात वाढवणारे, रुक्ष, लवकर न पचणारे आहे. त्यामुळे ह्याचे सेवन कमीच करावे.

तक्रा चे चक्र येथेच संपते. भेटूया पुढल्या लेखात. तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे।।
क्रमशः

डॉ शार्दूल चव्हाण

– लेखन : प्रा वैद्य शार्दूल चव्हाण. मुंबई
एम. डी. आयुर्वेद
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments