गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘एकला चलो रे’
या कवितेचा प्रा डॉ सतीश शिरसाठ यांनी केलेला मुक्त अनुवाद पुढे देत आहे. नोबेल पुरस्कार विजेत्या एका महान कवीची ही केवळ कविताच नाही, तर जेव्हा आपण एकटेच असतो, अशा वेळी डगमगून न जाता, हृदयाची ज्योत प्रज्वलित करून एकटेच चालत रहाण्याचा प्रेरणादायी सल्ला देणारी, परीसस्पर्श लाभलेली शब्दरचना आहे.या दृष्टीने त्याचे मोल अनन्यसाधारण आहे.
– संपादक
जेव्हा,
ते तुझी हाक ऐकत नसतील
तेव्हा,
एकटाच चालत रहा.
जेव्हा,
ते भयभीत असतील
अरे अभाग्या –
तेव्हा,
तू मनाची कवाडं उघड
आणि
एकटाच स्वतःशी बोल.
जेव्हा,
काटेरी रस्त्यावर ते
तुझी साथ सोडून दूर जातील
अरे अभाग्या-
तेव्हा,
रक्तरंजित पावलांनी
एकटाच
काट्यांना तुडवत जा.
अरे अभाग्या –
जेव्हा,
रात्र काळी आणि तुफानी असेल
तेव्हा,
तुझ्या हृदयाची ज्योत
प्रज्वलीत कर.

– मूळ रचना : रवींद्रनाथ टागोर
अनुवाद : प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
वाह क्या बात है…!