नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. कॉंप्युटर युगात पत्र हा प्रकार आता आपल्या आयुष्यातून बाद झाला असला तरी “मज सांग सखी तू सांग मला, पत्रात लिहू मी काय तुला” हे गाणं किंवा “खत लीख दे सावरीया के नाम बाबू | कोरे कागज पे लीख दे सलाम बाबू ” हे गाणं आयुष्यातील तारूण्याचा उंबरठा ओलांडून आलेल्या प्रत्येकाला आठवत असेल.
आज आपण पहाणार आहोत एक गाणं, पत्राविषयीचं जे लिहिलं आहे कविवर्य रमेश अणावकर यांनी आणि गाण्याचे शब्द आहेत –

“पत्र तुझे ते येता अवचित
लाली गाली फुलते नकळत”
ही तरूणी आपल्या मनातली खरी गोष्ट अगदी प्रामाणिकपणे कबूल करते आहे आणि आपल्या प्रियकराशीच जणू काही बोलते आहे. अनपेक्षितपणे जेंव्हा का तुझं पत्र माझ्या हातात पडतं ना तेंव्हा माझ्या मनात अक्षरशः आनंदाचं कारंजं उडत असतं. पत्रातल्या मजकुराविषयी तर काय बोलू ? मोत्याच्या दाण्यासारखं असणार तुझं अक्षर पहात त्या अक्षरांवरून मी जेंव्हा हात फिरवते तेंव्हा तेंव्हा मला तुझ्या स्पर्शाचा आभास होतो आणि तू काहीतरी चावटपणा करून जे लिहितोस ते वाचल्यावर माझ्या गालावर लज्जेचे गुलाब फुलत असतात आणि तुझ्या स्पर्शाची ओढ मला अधिकच भासू लागते.
साधे सोपे पत्र सुनेरी
नकळे क्षणभर ठेवू कुठे मी
शब्दोशब्दी प्रीत हासरी
लाज मनाला, मी शरणागत
मधेच कधीतरी चावटपणा करतोस हे खरं असलं तरी बहुतेक वेळा येणारं तुझं पत्र इतकं सुंदर अलंकारिक भाषेत लिहिलेलं असतं ना की मला वाटतं, मी एक सुंदर आणि माझ्या मनाला स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारी एखादी कविता वाचते आहे. असं हृदयाला साद घालणारं तुझं पत्र ह्रदयाजवळ ठेवावं उशीखाली लपवून ठेवावं की पुन्हा पुन्हा त्या पत्राची पारायणं करत रहावी याबद्दल माझ्या मनाचा अक्षरशः गोंधळ उडतो. माझ्यावर असलेलं तुझं प्रेम पत्रात लिहिलेल्या प्रत्येक शब्दाशब्दातून मला जाणवत रहातं. या शब्दांमधल्या तुझ्या भावना जाणवल्या कि गालावर फुलणाऱ्या गुलाबांसोबत, गालावरची नाजूक खळी हलकेच उमलते आणि मग तुझ्या प्रेमासमोर शरणागत झाल्याप्रमाणे माझी मान अवगुंठीत होते.
आजवरी जे बोलू न शकले
शब्दावाचून तू ओळखिले
गीत लाजरे ओठावरले
गुणगुणते मी नयनी गिरवीत
तुझं प्रत्येक पत्र वाचलं की एक गोष्ट माझ्या लक्षात येते. ती म्हणजे बहुधा परकाया प्रवेशाची विद्या अवगत असावी. तुला एक गंमत सांगू का,तू जे काही पत्रात लिहितोस ना, अगदी तसेच विचार माझ्याही मनात नेहमी घोळत असतात, पण मी जे बोलू शकत नाही तेच नेमकं तुझ्या पत्र लिहिण्यातून व्यक्त व्हावं हा योगायोग नक्कीच नाही. माझ्या मनातले विचार जर तुला समजत असतील तर माझ्यासारखी भाग्यवान मीच! तुझ्या पत्राची इतके वेळा पारायणं होतात कि पत्र न उघडताही तुझ्या कवितेतील शब्द माझ्या डोळ्यासमोर नाचत रहातात. माझ्याही नकळत मी ते शब्द एकटीच असले कि स्वतः शी गुणगुणत असते.
वेळी अवेळी झोपेमधूनी
जागी होते मी बावरूनी
खुळ्या मनीचा भास जाणुनी
गुज मनीचे ह्रदयी लपवीत
माझ्या मनात सारखा तुझ्याबद्दलचा विचार सुरू असतो त्यामुळे मी दुपारची वामकुक्षी करत असताना जर चूकून डोळा लागला तर दाराची कडी वाजल्याचा भास होतो आणि मी धावत जाऊन दरवाजा उघडून डोकावून पहाते तर कधीकधी तू मला मिठीत घेतल्याचा आभास मला स्वप्नामध्ये होतो आणि मी बावरून पटकन झोपेतून जागी होते. जागी झाल्यावर मात्र हे स्वप्न असल्याचं माझ्या लक्षात येतं आणि मग मनातलं हे गुपीत आणखी कुणाला (तू सोडून) कळू नये म्हणून मी ते ह्रदयाच्या चोरकप्प्यात बंदिस्त करून ठेवते.

पत्र मग ते कुठलंही का असेना, तो आपल्या आयुष्यातील सोनेरी काळ होता, आपल्या भावनांचं प्रकटीकरण करणारा आधारस्तंभ होता हे या गाण्यातून सिध्द होतं. संगीतकार बाळ चावरे यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं कृष्णा कल्ले यांच्या गोड आवाजात ऐकताना आपलं मन पुन्हा एकदा भूतकाळात फेरी मारून येतं.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
प्रतिभावंत कवी श्री रमेश आणावकर यांची पुनश्च आठवण झाली.गाणं तर उत्तम आहेच. पण आपण रसग्रहण केलेला लेख हि उत्तम.
खूपच छान.आवडले मला
धन्यवाद मॅडम 🙏
धन्यवाद अजित 🙏
Top