नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. रेडिओ आणि श्रोते हे समीकरण इतकं अतूट आहे की रेडिओवरील कार्यक्रमात मराठी नाटक असो, श्रुतिका असो, शास्त्रीय संगीत असो वा गाणी असोत आम्हा श्रोत्यांच्या अभिरूची प्रमाणे जवळपास सर्वच श्रोत्यांना रेडिओ हा आपल्या घरातला एक सदस्य आहे असंच त्या काळात वाटत आलेलं आहे. निरनिराळ्या प्रकारच्या हिंदी मराठी गाण्यांनी आपलं बालपण, तरूणपण समृध्द केलेलं आहे. आज आपण पहाणार आहोत कविवर्य मधुकर जोशी यांनी लिहिलेलं एक विरह गीत ज्याचे शब्द आहेत –
तू दूरदूर तेथे हूरहूर मात्र येथे
विरहात रात्र मोठी प्रेमी जनास वाटे
या विरहगीतातील मुलीचा पती हा त्यांच्या लग्नानंतर त्याचं काम झाल्यानंतर परत येण्याचं आश्वासन देऊनही बराच काळ तिच्यापासून दूर गेलेला आहे. त्याच्या आठवणीने तिचा जीव व्याकूळ झाला आहे. कामाच्या व्यापात व्यस्त राहिल्यावर दिवस कसाही निघून जातो पण रात्र मात्र आठवणींशी लपंडाव खेळत रहाते आणि चुकून जर डोळा लागला तर दाराची कडी वाजल्याचा भास, त्या पाठोपाठ त्याच्या पदरवाच्या चाहूलीचा भास होऊन ती दरवाजाकडे उघडते तेंव्हा आकाशात मध्यावर आलेला चंद्र देखील तिच्याकडे पाहून हसत रहातो, त्यामुळे पतीराजांच्या सहवासाची ओढ अधिक तीव्र होते. म्हणून मग त्याच्याकडे तक्रार करताना ती सांगते “मी माझं काम झालं की लगेचच परत येईन” असं सांगून तू निघून गेलास त्या गोष्टीला १५ दिवस होऊन गेले तरी अजूनही तू परतला नाहीस. त्यामुळे माझ्या मनाची हूरहूर अधिकच वाढून माझा जीव कासावीस होतो. त्यामुळे विरहाची ही रात्र मात्र उगाचच मोठी होते आहे.
शब्दात सांगू कैसे हे दु:ख अंतरीचे
ओलावले दंवात हे काठ पापण्यांचे
भरला स्वरात कंप, कंपात प्राण दाटे
तुझ्या आठवणीत मी इतकी रमून जाते की अश्रू भरल्या दवात डोळ्यांच्या पापण्यांचे काठ भिजून जातात आणि अशा वेळेस माझ्या स्वरातून एक अनामिक कंप डोकावत रहातो. “कुणाला सांगू माझी कथा” असा प्रश्न उभा रहातो आणि कंठाशी प्राण आल्यावर जी अस्वस्थता वाढत जाते त्यामुळे माझ्या तोंडून शब्द देखील फुटत नाही, पण तुझ्या आठवणीने डोळ्यात अश्रू येऊन डोळे ओले होतात आणि हे दु:ख काही मी कुणाला सांगू शकत नाही.
मी भाबडी मनाची आहेच स्वप्नवेडी
विरूनी तुझ्यात जावे ही आस एक वेडी
राहो अभंग प्रिती राहो अभंग नाते
मला स्वतःला अजूनही विश्वास आहे की विरहाचे हे दिवसही जातील आणि शब्द दिल्याप्रमाणे तू नक्की येशील. माझं अंतर्मन मला ठामपणे सांगत रहातं की थोडी कळ सोस, तुझं दुखरं दु:ख माझ्याकडे दे म्हणजे ते कोणाला समजणार नाही अणि भलत्या सलत्या शंकांना इथे जागा देऊ नकोस. अंतर्मनाच्या या आश्वासनामुळे आपल्या मीलनाची मी उत्सुकतेने वाट पहाते आहे कारण दोन मनांच्या मीलनासाठी मी खूप उत्सुक आहे. ज्यामुळे आपल्या प्रीतीला कोणाची दृष्ट लागणार नाही आणि आपलं नातं अनंत काळपर्यंत अबाधित राहील.
भाळावरी असे हे सौभाग्य लाल कुंकू
विक्राळ काळ येता दोघे तयास जिंकू
स्फुरता मनात आशा ओठात गीत येते
आपल्या लग्नाच्या वेळेस गळ्यात बांधलेलं मंगळसूत्र, तू माझ्या हृदयात घर करून रहात असल्याचं सातत्याने सांगत असतं आणि त्यामुळेच रोज सकाळी आंघोळ झाल्यावर आरशात तू माझ्या मागे उभा असल्याचा भास होतो. आरशात बघून मग मी माझं सौभाग्यलेणं असलेलं हे लाल कुंकू तुझ्या नावाने अभिमानाने लावते. तू जवळपास वावरतो आहेस हीच गोष्ट मला संसारातील दु:खात आणि विरहातही साथ देत रहाते. अर्थात तू नक्की परत येशील ह्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे माझ्या ओठावर आनंदाचं गाणं सहजपणे फुलत जातं आणि पुन्हा एकदा मी तुझ्या आठवणींना उजाळा देत त्यामधे रममाण होत जाते.
संगीतकार यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आशा भोसले यांच्या आवाजात ऐकताना पुन्हा एकदा आपल्याला रेडिओवरील गाण्यांच्या दुनियेत घेऊन जातं.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सूंदर रसग्रहण.
विकासजी, नेहमीप्रमाणे खूप सुंदर रसग्रहण👌👌👌
शब्दातील विरह सुलभ परीक्षणामुळे रसिक वाचकांपर्यंत पोहोचला आहे .
कवीच्या शब्दातील विरह रसिकांच्या मनापर्यंत पोहोचवला आहे . अभिनंदन .
अप्रतिम लिहिता सर आपण … मी खूप मोठा फॅन आहे आपला
धन्यवाद पंकज 🙏
विरह छान मांडला आहे 👍🙂
धन्यवाद गौरव 🙏
खूप सुंदर पद्धतिने आपण सोप्या शब्दात कवितेच वर्णन केले आहे.
🌹धन्यवाद सर 🌹
अशोक साबळे
अंबरनाथ, ठाणे
धन्यवाद सर 🙏
धन्यवाद क्षितिज सर 🙏
वा, गाण्याइतकेच लोभस सदर ! धन्यवाद भावे सर ..