नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. जुन्या मराठी गाण्यांचा गोडवा इतका अवीट आहे की रेडिओ हे मनोरंजनाचं माध्यम जास्त ऐकलं जात नसलं तरीही कधी कधी विस्मृतीत गेलेलं एखादं गाणं आपल्याला आठवतं आणि दिवसभर मग ते गाणं आपल्या मनात वाजत रहातं.
बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ कवी राजा मंगळवेढेकर यांनी लिहिलेलं एक गाणं आज आपण पहाणार आहोत ज्याचे शब्द आहेत –
“उर्मिले त्रिवार वंदन तुला”
राम, लक्ष्मण, सीता, भरत इथपासून ते रावण, मंदोदरी, सुग्रीव, हनुमान अशा रामायणातील सर्व व्यक्तीरेखांचा परिचय दूरदर्शन मालिका आणि रामायणावरील निरनिराळ्या पुस्तकातून आपल्याला होतच असतो. मात्र लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिचा उल्लेख किंवा तिच्याविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही. ज्येष्ठ कवी राजा मंगळवेढेकर यांनी याच उर्मिलेबद्दल लिहिताना “उर्मिले त्रिवार वंदन तुला” असं लिहून या गाण्यातून उर्मिलेच्या व्यक्तीरेखेकडे आपलं लक्ष वेधलं आहे.
त्यजुनी राजसुख जरी जानकी
वनात गेली प्रभू सांगाती
राजमंदिरी तूच साहिल्या वियोगातल्या कळा
उर्मिले, कोणत्याही राजसुखाचा लोभ न ठेवता पत्नी या नात्याने पतीच्या पाठोपाठ सीताही श्रीरामाबरोबर वनात गेली. तिने पत्नीधर्म पाळला आणि सुखदुःखाच्या सर्व प्रसंगात प्रभू श्रीरामांना साथ दिली यामध्ये नक्कीच ती प्रशंसेला पात्र आहे यात शंका नाही. पण अयोध्या नगरीच्या राजगृहात सर्व प्रकारची ऐहिक सुखं उपलब्ध असताना तुझ्या दैवात मात्र पतीच्या विरहाचं दु:ख सोसण्याची वेळ आली. आपलं हे दु:ख चेहेऱ्यावर दिसू न देता चौदा वर्ष पती विरहाचं दु:ख सोसण्याची वेळ एखाद्या स्त्री वर यावी, हा दैवदुर्विलास फक्त तुझ्या आणि तुझ्याच भाग्यात लिहिला होता, जो तू खंबीरपणे सोसला.
सतत साऊलीसम रामाला
भ्राता लक्ष्मण कृतार्थ झाला
तुझ्या मनातील मुक्या भावना कधी न तो उमगला
प्रभू श्रीराम आणि सीतामाई यांच्यासोबत आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून तुझा पती लक्ष्मण देखील वनात गेला. प्रभू श्रीराम आणि सीतामाई वास्तव्य करतील तिथे तो ही त्या दोघांसमवेत आनंदाने राहिला. हरणाचं मायावी रुप धारण केलेल्या मारीच राक्षसाची शिकार करण्यासाठी प्रभू श्रीराम गेले, त्यानंतर त्यांच्या मदतीसाठी जातानाही पर्णकुटीत एकटीने राहिलेल्या सीतामाईवर संकट ओढवू नये म्हणून सर्वतोपरी तिची काळजी घेत लक्ष्मणाने तिला लक्ष्मणरेषा आखून दिली आणि मगच तो आपल्या भावाला मदत करण्यासाठी गेला. रामायणातील हे बंधूप्रेम पाहून पुढील काळात दोघा भावांचं एकमेकांवरील प्रेम पाहिलं कि “अगदी रामलक्ष्मणाची जोडी आहे” अशी उपमा लोक देऊ लागले. रामाच्या पाठीमागे त्याच्या रक्षणासाठी उभा रहाणाऱ्या लक्ष्मणाने एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला असला तरीही पत्नीच्या मनातील मूक भावना तो ओळखू शकला नाही एवढं मात्र खरं.
अंधारातील तू ज्योतीसम
आयु वेचिले आपुले कणकण
सुख तृप्तीचा कधी न तुला गे वाराही लागला
उर्मिले, लक्ष्मणाची पत्नी म्हणून तू राजगृहात प्रवेश केलास आणि तुझा पती मात्र प्रभू श्रीराम आणि सीतामाईसह वनवासात निघून गेला. त्यानेही राजसत्तेचा मोह न धरता वनवास पत्करला, हे वर्तन त्याला शोभा देणारं असलं आणि त्याच्या लौकिकात भर घालणारं असलं तरी मंदिरात जशी समईतली किंवा पणतीमधे तेवणारी वात कणाकणाने झिजत असते, पण तिच्याकडे कोणाचं लक्षही नसतं तसंच तुझ्याबाबतीत झालं आहे…. लक्ष्मण वनवासातील पर्णकुटीत तर तू राजमहालात! पतीच्या विरहाची वेदना अबोलपणे सहन करणाऱ्या तुला सुख समाधानाचा वारा असा कधीच लाभला नाही.
राम जानकी वियोगातुनी
घडले रामायण हे भुवनी
तुझी तपस्या तुझा त्याग परी नच लोकी ठसला
राम, लक्ष्मण आणि सीता अयोध्या नगरी सोडून वनात गेल्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्या घडलेल्या घटनांमधून अनेक व्यक्तीरेखा जगासमोर आल्या. पुढील काळात रामायण, रामचरित मानस या ग्रंथांमधून आणि महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांच्या गीतरामायणामधून, या व्यक्तीरेखा पुन्हा पुन्हा आमच्या समोर येत राहिल्या पण लक्ष्मणाची पत्नी असूनही तू खऱ्या अर्थाने भोगलेला वनवास कुणाच्याच मनात ठसला नाही, त्याबाबतीत जगाकडून तुझी उपेक्षा झाली एवढं मात्र खरं!
थोरचरित तू दूर राहुनी
सुगंध भरला तू रामायणी
उपेक्षाच परि तुझ्या कपाळी न्याय जगी आंधळा
उर्मिले, खरंतर तू लक्ष्मणाची पत्नी असूनही पतीच्या सहवासाला चौदा वर्ष पारखी झालीस. राजगृहात सर्व ऐहिक सुखं उपलब्ध असताना देखील, पतीचा सहवास, प्रेम, माया यातलं काहीही तुझ्या वाट्याला आलं नाही तरीही पतीला कोणत्याही प्रकारे दोष न देता स्वतःचं चारित्र्य तू जपलंस आणि जे काही दैवभोग तुझ्या वाट्याला आले ते विनातक्रार भोगलेस. ही कठीण गोष्ट आचरून खरं तर श्रीरामांच्या या रामायणात तू सुगंध भरला आहेस. पण तुझ्या भाळी मात्र कायम उपेक्षाच येत राहिली…. जिवंतपणी आणि मृत्यूनंतर देखील! “न्यायदेवता आंधळी असते” असं म्हणणाऱ्या ह्या जगानं तुझा उल्लेख टाळून तुझ्या बाबतीतही आंधळा न्याय केला आहे असंच म्हणावं लागेल.
उर्मिलेचं रामायणातील महत्व विशद करणाऱ्या या गाण्याला संगीतकार प्रभाकर जोग यांनी संगीत दिलं असून राम फाटक यांनी उर्मिलेच्या व्यक्तीरेखेवर झालेला अन्याय आपल्या आवाजातून निदर्शनास आणून दिला आहे.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
उर्मिला त्रिवार वंदन तुला अप्रतिम रसग्रहण आहे किती यथोचित समर्पक लिहिलं आहे बढिया आणखी इतरही गण्यांविषयी वाचायला आवडेल