पाठवणी
आपल्या पोर्टल वर आज पासून श्रीमती उज्ज्वला केळकर या त्यांनी अनुवाद केलेल्या कथा तसेच स्वलिखित कथा दर शनिवारी लिहिणार आहेत.
सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या दुर्दैवी वैशाली हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, सासरी जाच होत असल्याने माहेरी येऊनही त्यांना परत सासरच्या क्रूर लोकांकडे बळेबळे पाठविणाऱ्या पालकांच्या डोळ्यात मूळ गुजराती लेखक मोहनलाल पटेल यांच्या “विदाई” या भेदक, हृदयद्रावक कथेचा अनुवाद वाचून, चांगले अंजन घातले जाईल, अशी अपेक्षा आहे.
अल्प परिचय : –
श्रीमती उज्ज्वला केळकर या एम.ए. एम.एड. असून क.ज्युनि. कॉलेज ऑफ एज्यकेशन येथे ३० वर्षे अध्यापन करून त्या निवृत्त झाल्या आहेत. त्यांची विविध साहित्य प्रकारातील ७५ च्या वर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आकाशवाणी साठीही लेखन केलेल्या केळकर मॅडमना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ‘न्यूज स्टोरी टुडे’ परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
— संपादक
‘ऐकलत ? ही मूर्ख, पुन्हा परत आली.’ घराच्या परसातून सरला आपल्या पतीला म्हणाली.
एक उंची पुरी धिप्पाड म्हैस आवाराच्या छोट्याशा फाटकापुढे उभी होती. फाटक बंद होतं.
सोहनलालने ती म्हैस मोतीरामला सहा हजाराला विकली होती. पण ती म्हैस या घराशी इतकी एकरूप झाली होती की आता दुसर्यांदा पळून आली होती.
रागारागाने सरला म्हणाली, ‘मी तिला आवारात घुसू देईन, तर ना ? मी आत्ता तिला मोतीरामच्या घरी घेऊन जाते’ आणि सोहनलाल आवारात येताच ती म्हणाली, ‘यावेळी तिला असं पळवून लावा की ती आपल्या घराचा रस्ताच विसरली पाहिजे.’
‘असं कसं पळवून लावता येईल ?’
‘मग… मग तर ती इथून जाणारच नाही.’
‘तू तिच्या डोळ्यात बघ. किती दयनीय दृष्टीने पाहते आहे. तिच्यासाठी तर हेच तिचं घर आहे. जन्मली, तेव्हापासून इथेच आहे. हे आवार, हे लिंबाचं झाड…’
काय बोलावं, हे सरलाला उमगत नव्हतं. ती काही वेळ म्हशीकडे बघत बसली आणि मग आवाराचं फाटक उघडलं.
म्हैस पळत आपल्या खुंटीपाशी जाऊन उभी राहिली. सोहनलालने तिच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाला, ‘बिचारी भुकेजलेली असेल !.’
मोतीराम पुन्हा म्हशीला न्यायला आला, तेव्हा सरला आणि सोहनलाल यांनी एकमेकांकडे पाहिलं. सोहनलाल खोलीतून पैसे घेऊन आला आणि मोतीरामला म्हणाला, ‘हे तुझे पैसे. नीट मोजून घे.’
मोतीरामने प्रथम पैसे घ्यायला नकार दिला, तेव्हा सोहनलाल म्हणाला, ‘ती नाही राहणार तुझ्याकडे. जे झालं, ते झालं. म्हैस घरी आली, आमच्याही जिवाला शांती मिळतेय.’
थोडी बोलाचाली झाल्यानंतर मोतीराम पैसे घेऊन गेला. तो गेला आणि घरात एकदम शांतता पसरली.
सरला म्हशीच्या पाठीवरून हात फिरवू लागली. नंतर तिला पदराला डोळे पुसताना सोहनलालने पाहिले. त्याच्या मनात आलं, ‘केवळ म्हशीसाठी ती असं करणार नाही. तिच्या मनात आणखी काही तरी आहे. हे सगळं आपल्या मुलीसाठी तर नाही ? ’
तो सरलाजवळ आला आणि म्हणाला, ‘वेडी, जुन्या गोष्टी आठवून काय उपयोग ? आपलंच नशीब फुटकं..’ आणि सरला मोठमोठ्याने रडू लागली. ‘एका जनावराचा विचार करतोय तितकाही विचार मुलीसाठी नाही केला. तीन वेळा ती सासर सोडून आश्रयासाठी आली होती. पण आपण तिला भीती दाखवून, धमक्या देऊन परत पाठवलं.’
’सासरचे लोक मारेकरी झाले. तिच्या आत्म्याला काय वाटलं असेल ?’
मारेकरी आपण आहोत सरला…‘ सासर घर हेच तिचं घर म्हणत पुन्हा पुन्हा तिची पाठवणी केली. तिला घरात घेतलं नाही…’
मग गप्प बसून दोघेही बराच वेळ म्हशीची पाठ कुरवाळत राहिले.

— मूळ गुजराती लेखक : मोहनलाल पटेल
— अनुवादक : उज्ज्वला केळकर. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
थोडक्यात किती मोठा संदेश दिला या छो ट्या कथेने. मुलीचे लग्न करून दिल्यावर ती आंनदात आहे कीं नाही हे सुद्धा खरच प हायला हवे. तिची विचारपूस करायला हवी
सौ उज्ज्वला केळकर,
आपल्याला न्यूज स्टोरी टुडे वर पाहून आणि वाचून आनंद झाला. आपण योग्य ठिकाणी पोहोचल्या आहात हे नक्की!
कथेतील माहेरी परतलेल्या घराच्या अंगणात राहणाऱ्या म्हशी च्या उदाहरणावरून घरातील मुलीला परत न घेण्यात आपली मोठी चूक होती याची जाणीव झाली…!
या कथेने खूप मोठा संदेश दिला आहे.
हृदयस्पर्शी कथा.
मनाला भावलेली कथा 👌👌👌👌इथेच जन्म घेऊनही का ती परकी?..जो पर्यंत आपले विचार बदलणार नाहीत तोपर्यंत अश्या घटना घडतच राहणार. आपणच आपल्या मुलीला उंबरठा ओलांडून जाताना, हे घर नेहमीच तुझं असेल असा विश्वास रुजवायला हवा.