फार प्राचीन काळापासून कला ही मानवी जीवनाचे एक महत्त्वाचे अंग बनलेली आहे. मानव हा जसाजसा विकसित होत गेला, तसतशी कला त्याच्या जीवनात अधिक ठामपणे द्दढमुल झाली. कलेचे जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कलेमुळेच मानवी जीवन समृद्ध, संपन्न व आनंदमय बनविता येते. जीवनाला अर्थप्राप्त होतो. ते जगावसे वाटते. आपल्या जीवनातून कला वजा केल्यास बाकी राहील ते केवळ पशुतुल्य आयुष्य. मनुष्याला कला स्वाद, कला आनंद लुटता यावा म्हणूनच भगवंताने खऱ्या अर्थाने त्यात अंतर्भाव निर्माण केले आहे.
कला म्हणजे विचार आणि भावना यांचे उत्स्फूर्त आणि सौंदर्यपूर्ण प्रकटीकरण. कला ही भगवंताचे दुसरे रूप आणि कलाकार हा त्याचा पुजारी. कला म्हणजे भाषा.
सध्या कोरोना महामारीने सर्वांच्याच मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. नकारात्मक, विकृत त्रासदायक स्वप्ने, कोरोनाची भीती, त्याचबरोबर ताणतणाव वाढल्याने चिंताग्रस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी मानवी मनावर जबरदस्त ताण निर्माण झाला आहे. महामारी, शारीरिक आरोग्यावर औषधे, लस आली आहे. मानसिक तणाव यावरही औषध आहेच पण कला ही त्यावर अत्यंत प्रभावी उपचार ठरते. अगदी प्राचीन काळापासून मानसोपचारमध्ये चालत आले आहे.
प्रत्येक मुल जन्माला यायच्या अगोदर त्याच्या मातेकडून त्यावर गर्भ कला संस्कार झालेले असतात. त्यामुळे प्रत्येक मनुष्याला कुठली न कुठली कला लाभलेली असते. त्यात लपलेल्या कला कोणी हौस तर कोणी व्यावसायीक दृष्टीकोनातून आत्मसात करतात. कुठलीही कला प्रथम त्या कलाकाराला आत्म समाधान देत असते.
आत्ताच्या ह्या महामारीच्या काळात आपण कुठलीही कला आपल्या आवडीनुसार जोपासा. हे खुप गरजेचे आहे व आपल्या ताणतणावर ही एक संजीवनीच ठरु शकते. आज आधुनिक काळात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे सहजतेने आपल्याला आवडत्या कलेची माहिती, तसेच ऑनलाईन व्याख्यान मिळेल. संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, हस्तकला, कविता, तसेच बागकाम, बुद्धिबळ, वाचन, संग्रह छंद जोपासा. चिंतन, प्राणायाम इ. कला आत्मसात करा.
कराओके सिस्टीमवर आपल्या आवाजात आपल्या आवडीची गाणी गाऊन तर बगा, गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करून तर बघा , कागदाच्या तुकड्यावर चित्र काढून तर बघा! पण ते मला येईल का? जमेल का? ही चिंता सोडा. फक्त सुरूवात तर करा. कलांनी आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. ते आनंददायी आणि मनोरंजक आहे. कलेने जगाची सौंदर्याचा धारणा ओळखू शकतो. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कलेची भुमिका प्रचंड महत्वाची आहे.निश्चितच आपले नैराश्य दुर होईल व मन प्रसन्न, जीवन आनंदमय होईल.
– लेखन: कलाकार हेमंत दंडवते.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.