कवियत्री सौ सुरेखा गावंडे यांची निर्मिती दिग्दर्शन असलेला ‘ऑक्सीजन फॉर लाईफ‘ या लघु पटाचे प्रदर्शन येत्या रविवारी कल्याण येथे होत आहे. या निमित्ताने सौ सुरेखा गावंडे यांनी त्यांचा कविता ते चित्रपट हा प्रवास स्वतःच्या शब्दात उलगडून दाखवला आहे. सौ गावंडे यांना न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
माझं बालपण कष्टात गेलं. कारण मला समजण्याच्या अगोदरच माझ्या वडिलांना काळाने हिरावून घेतलं. आम्ही तिघी बहीणी आणि आमची आई एवढंच विश्व त्यावेळी मला माहित होतं.
माझ्या आईनेच मला निसर्गावर व माणसातल्या चांगुलपणावर उदंड प्रेम करायला शिकविलं. म्हणूनच की काय त्या प्रतिकूल परिस्थितीतही निसर्गाची ओढ व वाचनाची आवड मला लहानपणापासूनच लागली.एका खेड्यात हिमतीने नांगर धरणाऱ्या आणि शहरात नारळ, मोसंबी विकणाऱ्या एका अशिक्षित आईची मी मुलगी. माझ्या आईला खूप वाटायचं माझ्या मुलींनी खूप मोठं व्हाव.खूप शिकावं. माझ्या सारखं अडाणी राहू नये.
मी मुंबईच्या गिरगावातल्या झावबावाडीतल्या दिव्याच्या चाळीमध्ये वाढले, शिकले आणि तिथेच लिहूही लागले. मराठीतले मोठं-मोठे नामवंत साहित्यिक या गिरगावातूनच पुढे आलेले.जणू काही मला लिहीण्याची, वाचनाची, साहित्याची गोडी लागली ती ह्या गिरगावातल्या साहित्यिक वातावरणामुळेच.
लहानपणापासूनच माझ्या मनाला सुखद वाटणाऱ्या मनाला बोचणाऱ्या प्रसंगावरुन कविता मनामध्ये घर करु लागल्या.मनातील भावनांच वादळ शब्दरुप कवितेत आकार घेऊ लागलं.कागदावर अवतरलेलं भावनांच शब्दरुपी वादळ म्हणजेच कविता हे समजण्याचं त्यावेळी माझं वय ही नव्हतं. आणि हा चमत्कार इयत्ता आठवी पासून नेहमीचाच होत गेला.माझ्या हाती कधी लेखणी आली आणि मी लिहू लागले हे मला कळलंच नाही. तेव्हापासून कविता हिच माझी जिवाभावाची सखी बनली.
२७ नोव्हेंबर १९८४ या दिवशी माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. माझ्या लग्नानंतर मी सौ.सुरेखा अशोक गावंडे बनून गिरगावातून कल्याणला राहण्यास आले.माझं एम.टी.एन.एल चे आॕफिस मुंबईला हुतात्मा चौक येथे होते. कल्याण ते मुंबई हा माझा लोकल ट्रेनचा नित्य प्रवास सुरू झाला.या प्रवासातच माझ्या अनेक कविता जन्माला आल्या. ‘सांजवेळ’, ‘साक्षी’, ‘संजल ची दंगल’, ‘संवगडी’, ‘संजीवन’ या काव्य संग्रहाची निर्मिती या प्रवासातच झाली.
एका रसिक वाचकाने ‘साक्षी’ या काव्य संग्रहाची प्रशंसा केली. आणि मला जाणीव करुन दिली की ‘साक्षी’ या काव्य संग्रहातील कविता म्हणजे एक प्रकारची गाणी आहेत. या कवितांना ताल आहे लय आहे.
मला आठवतं मी लहान असताना माझे वडील नेहमी जेवणाचे ताट डफली सारखे धरुन ते वाजवत असत. त्याच्या तालावर ते गाणी, पोवाडा गायचे. माझ्या वडिलांनी ताटावर धरलेला तो बोटांचा ताल मला वाटतं माझ्या गीतांमध्ये कुठेतरी लपला आसावा.
नाशिक जिल्ह्यातील दारणा नदीच्या काठी वसलेलं माझ्या मामांच गाव म्हणजे मोहगाव. खरोखर मोहात पडावं असंच हे गाव. मे महिन्याच्या सुट्टीत तिथल्या मातीत मी खेळले, रुळले आणि म्हणूनच मला वाटतं लहानपणापासूनच माझ्यात ग्रामीण जीवन, डोंगर-दरी, शेती, माळरान, पाऊस, पक्षी यांच नितांत आकर्षण निर्माण झाले. नदीचा तो खळखळाट, डोंगरावरुन धावत येणारे झरे, पावसाच्या थुई-थुई धारा आणि तेथील मातीचा तो गंध माझ्या गीतांमध्ये असावा.
माझे मामा दरवर्षी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीला जात असत. त्या वारीतील तो टाळ-मृदुंगाचा ठेका, खेड्यातील लग्नातील गाणी, जात्यावरील ओव्या या सर्व गोष्टींच्या मुळाशी माझ्या गीतांचा संबंध असावा असं मला वाटतं.
‘साक्षी ‘कविता संग्रहातील आठ कविता मी निवडल्या. संगीतकार मानवेलदादा गायकवाड यांच्याकडे चालीसाठी सोपविल्या. चाल लावलेल्या या आठ कविता रेकाँर्डिंग साठी खारच्या लायनीन स्टुडिओत पाठविल्या. गायक डाॕ.नेहा राजपाल, चंद्रशेखर गाडगीळ, संजय सावंत, शकुंतला जाधव या दिग्गज गायकांनी तसेच संगीतकार मानवेलदादांनी कवितेतील शब्दांचे खूप कौतुक केले. लायनीन स्टुडिओतून जेव्हा माझ्या कविता बाहेर पडल्या त्या एक नवीन रुप घेऊनच. कविता आता कविता न राहता त्यांची सुंदर, मधुर, श्रवणीय अशी गाणी झाली होती. ही सर्व गाणी माझीच आहेत, यावर माझा विश्वासच बसत नव्हता.
माझ्या या गाण्यांचा मी व्हिडीयो करावयाचे ठरविले. अनेक छोट्या-मोठ्या कलाकारांनी मोलाची साथ दिली. इतकेच नव्हे तर माझं संपूर्ण कुटुंब यात सहभागी होऊन प्रथमच कॕमेराला सामोरे जाऊन या अल्बमची पूर्तता केली. पाहता-पाहता माझा पहिला अल्बम ‘पहिला पाऊस पहिलं प्रेम’ ची निर्मिती झाली.
आपल्या मुलीला आपण लहानाची मोठी करतो. जेव्हा तिला नववधूच्या रुपात पाहतो तेव्हा आपल्यालाच कळत नाही खरंच आपली मुलगी केव्हढी मोठी झाली, किती सुंदर दिसते ! माझ्या कवितेच्या बाबतीतही असंच घडलं. रेकाँर्डिंग, शुटिंग, एडिटिंग, अभिनय असे सर्व सोपस्कार पार पाडून ‘पहिला पाऊस पहिलं प्रेम’ ही जणू कन्यारुपी कलाकृती माझ्या हातात पडली, तेव्हा माझ्या डोळ्यांवरच विश्वास बसेना की खरंच आपली ही कविता कुठच्या कुठे पोहचली, किती मोठी झाली. चाल, संगीत, आवाज इत्यादी अलंकारानी सजून जणू ती नववधूच्या रुपात माझ्या समोर प्रकट झाली आहे.
अंधेरीच्या त्रिनयन स्टुडिओमध्ये माझी दिग्दर्शक, निर्माते भास्कर डाबेराव, डाॕ.गणेशकुमार पाटील यांच्याशी भेट झाली. ‘पहिला पाऊस पहिलं प्रेम’ या अल्बम मधील गाणी तसेच गाण्यातील शब्द पाहून ते खुश झाले. त्यांनी मला ‘तू फक्त हो म्हण: या मराठी चित्रपटासाठी गाणी लिहीण्यास सांगितले. मी ही संधी सोडायची नाही असा मनाशी ठाम निश्चय केला.व्यस्त असतानाही वेळ काढून अत्यंत प्रयासाने कथेला अनुसरून मी दोन गाणी लिहून पाठवली. चार दिवसांनी त्यांचा जेव्हा फोन आला. भित -भितच मी फोन उचलला. काय आश्चर्य! त्यांना सर्वांना ती गाणी आवडली होती. गाण्यातील शब्दरचना, प्रेमभावना त्यांना खूपच भावले.
‘तू फक्त हो म्हण’ या मराठी चित्रपटासाठी तुमची दोन ही गाणी घेतो, असे त्यांनी सांगितले. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तीस वर्षाच्या मेहनतीचे फळ आता कुठे मला मिळाले.
२०२०-२०२१ या लाॕकडाऊन काळात चित्रपट रखडला. सर्वांनीच आशा सोडली होती. पंरतु २०२२ मध्ये चमत्कार झाला. निर्माते, दिग्दर्शक यांनी पुन्हा मेहनतीने चित्रपट पूर्ण केला.
‘तू फक्त हो म्हण’ हे शिर्षकगीत आणि आर्या आंबेकरच्या आवाजात ‘मन मोहरलं,’ ‘मन बहरलं,’ मन झालया फुलपाखरु ही माझी दोन गाणी चित्रपटात झळकली. १४ आॕक्टोबर २०२२ ला संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित झाला. रसिक मायबाप प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. इतकेच नव्हे तर काही चित्रपटगृहाच्या बाहेर Housefull च्या पाट्या लागल्या. चित्रपटगृहात मोठ्या पडद्यावर जेव्हा गीतकार ‘सुरेखा गावंडे’ नाव आले तेव्हा खरंच डोळ्यांत आनंदाश्रू आले. मला, माझ्या परिवाराला,
मित्र-मैत्रीणींना, नातेवाईक सर्वांनाच खूप अभिमान वाटला. आजही युट्युबवर या चित्रपटातील गाणी बघून मी धन्य होते.
माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक लहान-थोर व्यक्ती मला सहकार्याचा हात देणाऱ्याच भेटल्या हे विशेष. तर या सर्वांचं आणि रसिक मायबाप प्रेक्षक आपलं सुद्धा प्रेम, सहकार्य, आशिर्वाद माझ्यावर कायमस्वरुपी असेच राहोत हिच सदिच्छा व्यक्त करते.
तूर्त येथेच थांबते.

– लेखन : सौ सुरेखा गावंडे
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800