खरा यशस्वी उद्योजक स्वतःबरोबर इतरांची प्रगती साधण्यावर देखील भर देतो. असे दुर्मिळ गुण ज्यांना लाभले आहेत, ते आजचे युवा उद्योग रत्न आहेत काका पेढेवाले अर्थात श्री प्रणित रवींद्र कुंदप.
जाणून घेऊ या त्यांची प्रेरणादायी गोड कथा…
वडील श्री रवींद्र गोपाळ कुंदप व आई सौ उज्वला यांच्या मायेच्या व शिस्तीच्या छत्रछायेत वाढलेले प्रणित यांचा जन्म २ जानेवारी १९८८ रोजी झाला.
प्रणित यांचे शालेय शिक्षण सातारा येथीलच निर्मला कॉन्व्हेंट स्कूल मध्ये तर बारावी पर्यंत चे शिक्षण यशवंतराव चव्हाण विद्यापिठातुन झाले. तर पुणे येथील भारती विद्यापिठातून बी.बी.ए. व पुणे विद्यापीठातुन एम.बी.ए. (मार्केटिंग) या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या.
पुढे प्लेसमेंट द्वारे ‘जस्ट डायल’ या कंपनीत प्रणित यांना नोकरी मिळाली. सातारा येथे ‘जस्ट डायल’ ची सूत्रे त्यांच्या हाती देण्यात आले. तिथून पुढे प्रणित ‘ऑक्सिजन मोबाईल वॉलेट’ कंपनीत टेरिटरी मॅनेजर म्हणून गेले. त्यांच्या अखत्यारीत सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांचा समावेश होता.
प्रणित यांची नोकरी उत्तम चालू होती. उत्तम पद, मान सन्मान, पैसा प्रतिष्ठा असे सर्व काही मिळत होते. पण एका प्रसिद्ध मासिकात त्यांनी, चितळ्यानी लिहिलेला लेख वाचला. त्यात त्यांनी असा उल्लेख केला होता की, मिठाई करण्याची कला यांनी सातारा येथे येऊन तुळजाराम मोदी यांच्याकडून अवगत केली होती आणि आज चितळेबंधू यांचे नाव जगभर प्रसिद्ध झाले आहे.
चितळे यांची कहाणी वाचूनच प्रणित यांना प्रेरणा मिळाली की, आपणही नोकरी करीत न राहता साताऱ्यात राहून काही तरी उद्योगच केला पाहिजे.
रात्रभर ते या कल्पनेचा विचार करीत राहिले. विचार करता करता त्यांच्या लक्षात आले की, सातारचे कंदी पेढे प्रसिध्द आहेत पण त्यांचा नावलौकिक जगभर गेला पाहिजे. निर्णय झाल्यावर त्यांनी नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला.
खरं म्हणजे प्रणित यांचे वडील उद्योजकच आहेत. पण प्रणित ने त्यांच्या व्यवसायात लक्ष न घालता, पेढ्यांचा एकदम नवीन व्यवसाय सुरू करण्याचे धाडस घरच्यांना साशंक करणारे होते. अर्थात आपल्या मुलाने आपल्याही पेक्षा खूप मोठे व्हावे असेच प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. म्हणून त्यांनी प्रणित ला पूर्ण साथ देण्याचे ठरविले.
पेढ्यांचा उद्योग, व्यवसाय करायचा म्हणून प्रणित ने मूलभूत अभ्यास केला. त्यावर त्याच्या लक्षात आले की, सातारा कंदी पेढ्याची चव जगभरातील इतर
पेढ्यांचा वेगळी आहे. या कंदी पेढ्याला १९५० पूर्वी पर्यंत प्रचंड मागणी होती. मात्र त्यानंतर हा पेढा काही शहरांपुरताच मर्यादित राहिला. त्यामुळे सातारी कंदी पेढ्याचे नाव साता समुद्रापार गेलेच पाहिजे, हाच चंग बांधून, सर्वाँना आपलेसे वाटेल असे काका पेढेवाले हे नाव त्याने त्याच्या ब्रँड साठी निवडले. आणि सर्व तयारी करून व्यवसाय सुरू केला.
आंतराष्ट्रीय कीर्ती लाभलेले कास पठार येथे अनेक पर्यटक येत असतात. शनिवार रविवार तर येथे पर्यटकांची खूप रेलचेल असते. अशा ठिकाणी जाऊन कंदी पेढे विकण्यासाठी एक स्टॉल लावला. हळू हळू प्रतिसाद वाढत गेला.
पुढे प्रणित यांना असे वाटले की आपण स्वतःच पेढे बनवावे. म्हणून त्याने पेढे बनविण्याचे सर्व प्रशिक्षण घेतले, आणी सर्वप्रथम ‘वाढे फाटा’ येथे २०१४ साली दुकान सुरू केले. तिथे छान प्रतिसाद मिळाल्याने जवळच महामार्गालगत शहरातील सर्वात मोठे शंभर फुटी पेढ्याची शो रूम सुरू केली.
या शो रूम मध्ये स्वतःच्या उत्पादनांबरोबर प्रणित ने सातारा महिला अँग्रो, महिला बचत गटांनी तयार केलेली लोणचे, पापड, कांदा लसूण मसाले तसेच साताऱ्यातील सुप्रसिद्ध पालेकर, चकोर, चंद्रविलास फरसाण, भावे सुपारी, नमकीन व बेकरी प्रॉडक्ट्स पण ठेवले आहेत. यामुळे स्थानिक महिला बचत गट, उद्योजकांना मोठे व्यासपीठ मिळून अनेक कुटुंबाना रोजगार मिळत आहे. या शो रूम बरोबरच प्रणित ने आनेवाडी टोलनाका, वाई, कराड, शेंद्रे आदी ठिकाणी शाखा सुरू केल्या असून लवकरच मुंबई आणि इतरत्र शाखा सुरू करण्याचा त्याचा मानस आहे.
प्रणित ने ‘माय ऊर्जा’ या नावाजलेल्या कंपनीत काका पेढेवाल्यांचे पाच काउंटर सुरू केले. त्यामुळे
‘काका पेढेवाले’ हा ब्रँड जगभरात पोहचला आहे. मुंबई येथील अनेक बँकवेट हॉल्स सोबत हि प्रणित ने टाय अप केले आहे.
प्रणित ची आजची उलाढाल काही कोटींच्या घरात आहे हे सांगताना त्याच्या आई वडिलांना अभिमान वाटतो व प्रणित ने घेतलेल्या निर्णयाचे समाधान वाटते.
उत्तम दर्जा व उत्तम सेवा यामध्ये काका पेढेवाले कधीही तडजोड करत नाही. सर्व टीम आज प्रत्येक युनिट मध्ये सक्रियपणे कार्यरत असल्याने सर्व उत्तमपणे चालू आहे असे सांगताना प्रणित यांना आनंद होतो. हे श्रेय केवळ माझे नव्हे तर टीम वर्क मुळे शक्य होते हा त्यांचा मनाचा मोठेपणा आवर्जून जाणवतो.
काका पेढेवाले हैं पेढे तयार करताना व विकताना स्वच्छता, शुद्धता याचे काटेकोर पणे पालन करतात त्यामुळे ग्राहक संतुष्ट व समाधानी आहे व हीच आमच्या यशाची पोच पावती आहे असे प्रणित आवर्जून सांगतात.
संतुष्ट व समाधानी ग्राहक हाच काका पेढे वाले यांचा मंत्र आहे. आज त्यांचे अनेक ग्राहक त्यांच्या विदेशात असलेल्या नातेवाईकांना आवर्जून हे पेढे पाठवित असतात. चांगली चव ही केवळ जिभेवरच नाही तर मनात देखील घर करते. त्यामुळे या पेढ्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
प्रणित एकेक छान कल्पना साकारत असतो. एकच पेढा देण्यासाठी त्याने एक छोटेसे पण खूप आकर्षक पॅकिंग केले आहे. हे मी पहिल्यांदाच पाहिले. कारण आजपर्यंत पेढा हा हातात अथवा गुलाबी कागदात दिलेला पाहिला आहे. याची कल्पना तुला कशी सुचली ? असे विचारले असता प्रणित म्हणाला, “कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकवले आहे. त्यात प्राधान्य आहे ते आपले आरोग्य व स्वच्छतेचे. पेढा हा छोट्या आकर्षक पॅकिंग मध्ये दिल्याने हायजीन जपले जाते. शिवाय या पॅकिंगवर एक सुंदर स्माईल आहे. त्यामुळे ते पहाताच पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर सहजच सुंदर हास्य येते. लोकांच्या जीवनात आनंद जपणे हेच काका पेढेवाले यांचे ब्रीद वाक्य आहे. तसेच मागणी नुसार लग्न समारंभात मुला मुलींचे नाव बॉक्स वर लिहिले जाते. परंपरेला आधुनिकतेची जोड नातेसंबंध अजून दृढ करते.”
अशा वेगळ्या कल्पनांमुळे काका पेढेवाले नाव लौकिक मिळवत आहे. भविष्यात विमानातून पेढे परदेशी जावे त्या दृष्टीने प्रणित चे प्रयत्न चालू आहेत.
काका पेढेवाले यांच्या दलनाला छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भेट देऊन कौतुकाची थाप दिली. त्याचबरोबर अनेक सिने तारे तारकांनी देखील भेट देऊन कौतुक केले आहे.
मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत देखील काका पेढेवाले यांचे पेढे पोहचले आहे ही खरच अभिमानास्पद गोष्ट आहे .
ही केवळ एक सुरवात आहे. अजून बरेच काही करायचे आहे. येथेच न थांबता त्याचे स्वप्न आहे की, किमान १००० कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्या इतका उद्योग व्यवसाय वाढवायचा आहे.
कोरोना सारख्या बिकट परिस्थितीत देखील खूप नुकसान सोसून प्रणित ने सर्व कामगार, कर्मचारी यांना ५० टक्के पगार दिला व साथ कायम राहू द्या अशी विनंती सर्वांना केली. पुढे सर्व सुरळीत झाल्यावर सर्व कामगारांची सर्व भरपाई करून त्याने दिलेला शब्द पाळला. हेच यशस्वी उद्योजकाचे रहस्य असते.
सामाजिक भान जपत काका पेढेवाले यांनी संक्रातीच्या निमित्ताने हळदीकुंकू कार्यक्रम घेतला. वाण म्हणून त्यांनी रोपांचे वाटप करत जणू “झाडे लावा झाडे वाढवा” हा दिला.
प्रणित यांना प्रवास करायला नवं नवीन ठिकाणी जायला आवडते. तो सध्या बासरी वाजवायला ही शिकतोय. त्याची पत्नी सौ अरुणा ही देखील एम.बी. ए. आहे. त्यांना तीन वर्षांचा गोंडस मुलगा विहान आहे. प्रणित चा लहान भाऊ रोहित हा सॉफ्टवेअर इंजिनियर असून त्याचे वर्क फ्रॉम होम चालू आहे. बहीण सौ प्रियांका विवेक लेंगडे ही देखील बी.इ.कॉम्पुटर असून हैदराबाद येथे स्थायीक आहे.
प्रणित वडिलांनाच आपले आदर्श व प्रेरणास्थान मानतो. सर्व कुटुंबाची साथ असल्याने तो यशस्वी होऊ शकला असे आवर्जून सांगतो.
श्री प्रणित यांना सकाळ मीडिया तर्फे जनरेशन नेक्स्ट युवा उद्योजक पुरस्कार, सटर्डे क्लब, ग्लोबल ट्रस्ट तर्फे बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड, महाकालिका ट्रस्ट कासार समाज, सातारा यांनी देखील युवा उद्योजक्ता पुरस्कार देऊन प्रणित यांना सन्मानित केले.युवा ३६०° प्रस्तुत ‘थाप शाबासकीची’ (गुणगौरव काष्ठवंत, गुणवंत यशवंताचा) या इयत्ता दहावी परीक्षेत कठीण आणि बिकट परिस्थितीतवर मात करत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या उपक्रमात सामाजिक जाणीवतेतून केलेल्या सहकार्य बद्दल व योगदानाबद्दल, श्री सारंग श्रीनिवास पाटील यांनी, श्री प्रणित यांचे आभार मानले.
आपल्या मित्रांना तो असा संदेश देऊ इच्छितो की, “आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर रिस्क ही घ्यावीच लागते, मग ते क्षेत्र कोणतेही असो. आपले मिशन निश्चित करा व त्या दिशेने वाटचाल करा नेहमी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा मग यश तुमचेच आहे.”
असे ठोस विचारांचे दिलदार व हरहुन्नरी व्यक्तिमत्व लाभलेले श्री प्रणित रवींद्र कुंदप यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
एक यशोगाथा