Wednesday, June 18, 2025
Homeलेख'कुटुंब रंगलंय काव्यात' ( २७ )

‘कुटुंब रंगलंय काव्यात’ ( २७ )

विदर्भातील वर्तमानपत्रांनी माझ्या दोन्ही कार्यक्रमांना भरपूर प्रसिद्धी दिली, आणि त्यामुळे कार्यक्रम सादर करण्यासाठी मला विदर्भातील विविध गावांतून आमंत्रित केले जात होते. तसेच एक निमंत्रण चंद्रपुरातील ‘सन्मित्र मंडळ’ या संस्थेचे सुद्धा आले, आणि मी चंद्रपुरात दाखल झालो.

नित्याप्रमाणे एका लॉजवरील एक कॉट बुक करून मी ‘कात्यायनी रुग्णालयात’ डॉ.अंदनकर यांना भेटायला गेलो. सन्मित्र मंडळाचे सर्वेसर्वा होते डॉ.बबनराव अंदनकर आणि अँड राम हस्तक, आणि या दोन रसिकांनीच त्यांच्या सन्मित्रांसाठी ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा माझा एकपात्री कार्यक्रम आयोजित केला होता.

प्राचार्य मदन धनकर, प्रा.सुरेश द्वादशीवार, प्राचार्य सुरेश केळकर, भास्कर भट, कावडकर सुधीर मुनगंटीवार, प्रा.जयंतराव मादुस्कर या मातब्बर रसिकांप्रमाणेच सुरेश देशपांडे (नागपूर पत्रिका व नागपूर टाईम्स), सुनील देशपांडे (डेली हितवाद), मोहन धनकर (लोकमत), खत्री गुरुजी, अरूण दिवाण (दै.तरुण भारत), क्रांती नालमवार (दै.महाविदर्भ) प्रकाश शर्मा (दै.नव-भारत), विनायक एकबोटे या पत्रकारांना सुद्धा सन्मित्र मंडळाने निमंत्रित केले होते.

जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी श्री.महाजन आणि त्यांचे सहाय्यक अधिकारी श्री. चंद्रकांत क्षिरसागर माझ्या कार्यक्रमाला जातीने उपस्थित होते. चंद्रपूर शहरातील दर्दी रसिक व त्यांचे कुटुंबीय यांनी मला उत्स्फूर्त दाद दिल्याने माझा तो एकपात्री प्रयोग अतिशय बहारदार झाला. सन्मित्र मंडळाच्या या कार्यक्रमाला सुद्धा चंद्रपूर वार्ता पत्रात सर्व पत्रकार बंधुंनी भरपूर प्रसिद्धी दिली आणि संपूर्ण जिल्ह्यात माझ्या कार्यक्रमाला खूप नाव मिळाले. जिल्ह्याच्या माहिती अधिकार्यांनी तर ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ ला यूएन्आय-पीटीआय पर्यंत प्रसिद्धी दिली.

मराठी भाषेवर आणि कवितेवर प्रचंड प्रेम करणाऱ्या या सर्व रसिकांबरोबर माझी चांगली मैत्री झाली, त्यामुळेच चंद्रपूर शहरात व जिल्ह्यात माझे कार्यक्रम ठरविण्याचा मार्ग फारच सोपा झाला. श्री.भास्कर भट लो.टिळक विद्यालयात मराठी विभाग प्रमुख कार्यरत असल्यामुळे त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी माझा शालेय कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला शहरातील इतर सर्व शाळांमधील मराठीच्या शिक्षकांना आवर्जून निमंत्रित केले होते. तेथील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने माझा कार्यक्रम बहारदार झाला. त्यानंतर सौ.भट मॅडमनी त्यांच्या लो.टिळक कन्या विद्यालयातही माझा ‘ओंकार काव्य दर्शन’ कार्यक्रम आयोजित केला व तोही यशस्वी झाला.

तो कार्यक्रम करून मी लॉजवर परतलो तेंव्हा माझे सर्व सामान गायब झाले होते. मॅनेजर कडे चौकशी करताच त्यांनी सांगितले, “सर, पत्रकार सुरेश देशपांडे यांनी तुमचे सामान त्यांच्या घरी नेले आहे आणि तुम्हाला घरी यायला सांगितले आहे.” पठाणपुरा भागात राहणाऱ्या सुरेश यांच्या घरी मी पोहोचलो तेंव्हा दोघांनी माझा चांगलाच समाचार घेतला. सौ.रजनी वहिनी मला म्हणाल्या, “भाऊजी, मोठ्या भावाचे घर इथे असतांना तुम्ही लॉजवर राहणे‌ योग्य नाही, म्हणून मीच तुमचे सामान आणायला सांगितले. तुम्ही चंद्रपूरात याल त्यावेळी इथेच राहून कार्यक्रम करायचे, लॉजवर जायचे नाही.”  त्या दिवसापासून मी सुरेशच्या कुटुंबाचा एक भाग बनलो.

विसुभाऊ बापट

– लेखन : प्रा. विसुभाऊ बापट, मुंबई.
(सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?