विसुभाऊ, प्राचार्य राम शेवाळकर माझ्याकडे आले आहेत आणि त्यांनी तुम्हाला भेटायला बोलावले आहे. लौकरच घरी या.” सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य मदन धनकर यांनी सुरेश देशपांडेच्या घरी फोन करून मला सांगितले आणि मी व सुरेश लगेचच त्यांच्या घरी गेलो. दोघेही आमची वाटच पहात होते. “विसुभाऊ, विदर्भ साहित्य संघाचे यावर्षीचे साहित्य संमेलन अहेरीला घ्यायचे ठरले आहे, म्हणूनच तेथे आपल्या वि.सा. संघाची नवीन शाखा कालच सुरू करून मी आलो आहे. तिथे त्यांना तुझा ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा कार्यक्रम त्यांच्या मदतीसाठी घ्यायला सांगितले आहे. हे पत्र घेऊन तू अहेरीला जाऊन तिथल्या महाविद्यालयाच्या प्राचार्याना भेट, ते तुझा कार्यक्रम ठेवतीलच.!” असे सांगत शेवाळकर सरांनी मला पत्र दिले आणि ते नागपूर साठी रवाना झाले.
नंतरच्या आठवड्यात माझा ‘ओंकार काव्य दर्शन’ हा शालेय कार्यक्रम सादर करण्यासाठी मी गोंडपिंप्रीला जाणारच होतो. तसेच पुढे जाऊन तू अहेरीचा कार्यक्रम ठरव आणि चंद्रपूरला परत ये, असे सुरेशने मला सांगितले. चंद्रपूर शहरातील शाळांमध्ये ठरलेले शालेय कार्यक्रम सादर करून ठरल्या दिवशी मी गोंडपिंपरीला पोहोचलो. सुरेशला त्या दिवशी नागपूरला जायचे असल्याने मी एकटाच तिथे पोहोचलो होतो. सकाळ आणि दुपारच्या सत्रातील माझे शालेय कार्यक्रम खूप चांगले झाले. सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गही माझ्या कार्यक्रमावर खूष झाल्या कारणाने शाळेचे मुख्याध्यापक स्वतः मला सोडायला बसस्टँडवर आले. आम्ही साडेसहा वाजता स्टॅंडवर पोहोचलो कारण नागपूर ते अहेरी शेवटची बस सात वाजताची होती, ती नागपूर पासून येणार असल्याने साडेसात वाजता आली. सोडायला आलेल्या शिक्षकांचा व मुख्याध्यापकांचा निरोप घेऊन मी अहेरीला निघालो.
गोंडपिंपरी ते अहेरी रस्ता तसा तासाभराचाच! पण आमची बस सुमारे नऊ वाजता अहेरीला पोहोचली. कंडक्टरच्या सांगण्यानुसार स्टॅंडवर न जाता मी कॉलेज जवळच्या स्टॉपवर उतरलो. बस निघून गेली, तर सगळीकडे अंधार आणि शुकशुकाट होता. समोरच एक टपरीवजा हॉटेल दिसले म्हणून रस्त्यावरच्या दिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात मी हॉटेलमध्ये गेलो. प्रचंड भूक लागली होती त्यातच “ओ साहेब लौकर ऑर्डर द्या, आत्ता हे एकच हॉटेल उघडं आहे आणि तेसुद्धा बंद करायची वेळ झाली आहे.!” असं हॉटेल मालक बोलत असतानाच दोन पोलिसांनी समोर येऊन मालकाला गप्प केलं आणि आपला मोर्चा माझ्याकडे वळवला. मी मनातून घाबरलो होतो.
“नमस्कार सर, आपण विसुभाऊ बापटच नां ? आम्ही तुमचा एकपात्री कार्यक्रम आमच्या विनोद पडोळ साहेबांच्या बरोबर गडचिरोलीला पाहिला आहे. पण आपण आत्ता इथे कसे काय ?” त्या पोलिसांच्या या बोलण्याने जरा हायसे वाटले आणि मी अहेरीला पोहोचेपर्यंतची सर्व हकीकत त्यांना सांगितली. मग त्यांनीच माझ्या साठी चून-भाताची (झणझणीत पिठलं-भात) ऑर्डर दिली.आणि त्यांच्या बरोबर गप्पा मारत मी जेवून घेतले. ‘विसुभाऊ, इथे आठ वाजताच सर्व सामसूम होते, त्यामुळे प्राचार्य सर तुम्हाला सकाळीच भेटतील. पण चिंता करू नका, आम्ही तुमची आज रात्रीची रहायची व्यवस्था करून देतो. इथून जवळच वन विभागाचे रेस्ट हाऊस आहे. तिथे आपली व्यवस्था होईल.
एकदीड किलोमीटर चालत गेल्यावर आम्ही रेस्ट हाऊस वर पोहोचलो. चारी बाजूला मोठी मोठी झाडं, किर्र अंधारात रेस्ट हाऊस वरचा एका दिव्याचाच काय तो प्रकाश ! पोलिसांनी मागे जाऊन पाहिले पण तिथै कुणीच नव्हते. तिथली शांतता मला भयाण वाटत होती. “सर आपण बसस्टँडवर जाऊया, त्यांच्या रेस्ट हाऊसवर आपली व्यवस्था नक्कीच होईल.” असे सांगत पोलिसांनी मला धीर दिला आणि आम्ही तीनएक किलोमीटर पायपीट करून स्टॅंडवर पोहोचलो. तिथे बऱ्यापैकी जाग होती, स्वच्छ धुतलेल्या बसेस आगारातून बाहेर आणून बसस्टॅंडवर ओळीने लावल्या जात होत्या. ”अहो विसुभाऊ, तुम्ही आत्ता इथे कसे काय ? इतक्या रात्री कुठून आलेत ?” असे विचारत कंडक्टर भोसले समोर आले. चंद्रपूरच्या बसस्टँडवर सुरेशने त्यांची माझ्याशी ओळख करून दिली होती आणि ते अहेरी डेपोतच कंडक्टर होते. बरोबर असलेल्या पोलिसांनीच भोसलेंना सर्व हकीकत सांगितली. नंतर भोसलेंनीच तेथील रेस्ट हाऊस वर माझी रहायची व्यवस्था करून दिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेजच्या प्राचार्यांना भेटलो. शेवाळकर सरांनी दिलेल्या पत्राप्रमाणे अहेरीच्या कार्यक्रमाची तारीख ठरवली आणि चंद्रपूरला परतलो. परमेश्वराने पाठवलेल्या या दूतांमुळेच त्यारात्री माझ्या मुक्कामाची व्यवस्था चांगली झाली, हेच खरं होतं.!

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट. मुंबई.
(सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर