मुंबई दूरदर्शन केंद्राला या २ ऑक्टोबर रोजी ५० वर्षे पूर्ण झाली. या केंद्राचा अनेकांच्या जडण घडणीत मोलाचा वाटा आहे. प्रा. विसुभाऊ बापट हे त्यातीलच एक. दूरदर्शन शी संबंधित त्यांच्या आठवणी वाचू या भागात….
– संपादक
मुंबई दूरदर्शनच्या सुधीर पाटणकर यांची निर्मिती असलेल्या “कुटुंब रंगलंय काव्यात” या माझ्या एकपात्री कार्यक्रमाला भरघोस यश मिळाले.

माझ्या या कार्यक्रमाचे संगीत संयोजन जयंत ओक यांनी केले तर फ्लोअर मॅनेजर होते वंदन कुलकर्णी ! माझा कार्यक्रम सादर झाल्यानंतरच्या ‘सप्रेम नमस्कार’ या कार्यक्रमात आकाशानंद यांनी डॉ.किरण चित्रे
यांच्यासमोर ठेवलेला पत्रांचा ढीग दाखवत ते रसिकांना म्हणाले, “या सगळ्या पत्रात प्रा. विसुभाऊंचा एकपात्री कार्यक्रम आवडला, हे लिहून त्यांनी मुंबई दूरदर्शनवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील आमच्या असंख्य रसिकांनी आम्हाला ही पोच-पावतीच दिलेली आहे.”

दूरदर्शनवरील माझ्या कार्यक्रमाला मिळालेल्या प्रसिद्धीला धरूनच मी मुंबईत रहायला यायचे निश्चित ठरवले. ‘विदर्भ विकास मंडळात’ राहून मी दूरदर्शनचे शूटिंग केले होते आणि नाटक परिनिरीक्षण मंडळाचे सर्टिफिकेटही मिळविले होते. पण मुंबईत स्थिर होण्यासाठी मला जागा मिळवणे आवश्यक होते. हा माझा राहण्याचा प्रश्न कांही दिवसांसाठी सोडवला उमरेडच्या (नागपूर) माझ्या मानस भगिनी डॉ.लीना रस्तोगी यांनी ! तिची एक बहिण दयाताई घोंगे वडाळ्याच्या ‘बिपीटी क्वार्टर’ मध्ये रहात होती. तिला सांगून माझा तात्पुरता मुंबईत राहण्याचा प्रश्न लीना ताईने सोडवला.
आता वृत्तपत्रांत जाहिरात करण्यासाठी मला फोन नंबर सह ऑफीस मिळवणे आवश्यक होते. सुप्रसिद्ध नाट्य कलावंत मा. मोहनदास सुखटणकर यांनी दिलेल्या पत्रामुळे मा.दाजी पणशीकर व नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या शिवाजी मंदिरात असलेल्या “नाट्य संपदा” या संस्थेने मला आश्रय दिला. तिथे बसून नाटकाचे कॉन्टॅक्टर म्हणून काम करणाऱ्या एस्. पुरुषोत्तम यांच्या “आपली रंगभूमी” मार्फत माझे कार्यक्रम ठरवायला दाजींनी सांगितले आणि माझी पहिली जाहिरात लोकसत्ता दैनिकात झळकली. या जाहिरातीसाठी मला गुरुवर्य सदानंद जोशी (मी अत्रे बोलतोय) व बी.वाय.पाध्ये पब्लिसिटी यांनी दिलेले सहकार्य मी कधीही विसरू शकणार नाही. त्या एका जाहिरातीने गणेशोत्सव ओव्हर पॅक झाला, दहा दिवसांत माझे चौदा कार्यक्रम झाले. मुंबईत माझे चांगले बस्तान बसले.
दरम्यान दयाताईला वडाळ्याची जागा सोडून डोंबिवलीला जावे लागले. तोपर्यंत माझा मुंबईत रहायचा प्रश्न सुटला होता. शिवाजी मंदिर पासून अगदी जवळ राहणाऱ्या श्रीमती शालिनीताई पटवर्धन यांच्याकडे मला ‘पेईंग गेस्ट’ म्हणून जागा मिळाली होती. छबिलदास गल्लीतील सुगत-निवास मध्ये माझी राहण्याची सोय झाली आणि तिथे राहून २००० साला पर्यंत मी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर देशविदेशात “कुटुंब रंगलंय काव्यात” या माझ्या एकपात्री कार्यक्रमाचे प्रयोग करीत फिरलो.
पुढे मावशींना देवाज्ञा झाल्यानंतर मी दादरला जागा घेतली. परंतु सुरुवातीला शालिनीताई पटवर्धन यांनी माझ्या मावशी बनून मला रहायला जागा दिली, म्हणूनच मला मुंबईत राहून नाव कमावता आले.
क्रमशः

– लेखन : प्रा. विसुभाऊ बापट, दादर, मुंबई.
(सादरकर्ते – कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800