भारतीय हिंदू संस्कृतीतील सण, उत्सव परंपरेतील धार्मिक, अध्यात्मिक परंपरेत बहुअंशी प्रत्येक महिन्यामध्ये धार्मिक, व्रतवैकल्ये, पूजापाठ, श्रद्धेने करण्याचा प्रघात अगदी प्राचीन, अनदीकालापासून आहे हे आपण जाणतो आहोत. ते सर्वश्रुत देखील आहे.
आता नुकताच नवरात्री आणि दसरा ( विजया दशमी ) उत्सव झाला आणि लगेचच पौर्णिमा आली ती पौर्णिमा म्हणजे अश्विन शुद्ध, कोजागिरी पौर्णिमा हिला शारदीय पौर्णिमा असे म्हटले जाते. आणि या पौर्णिमेला भारतीय हिंदू संस्कृतीत विशेष महत्व आहे. या शारदीय पौर्णिमेच्या दिवशी प्रत्यक्षात अगदी साक्षात महालक्ष्मी देवी ही चंद्रमंडळातून अवनीवरती म्हणजेच पृथ्वीवर अवतरते आणि को जागरती, को जागरती म्हणजे पृथ्वीवर कोण जागे आहे. सतर्क आहे, सजग आहे ? ही मानव प्रकृती काय करीत आहे हे पहाण्यासाठी पृथ्वीवर संचार करीत असते.. म्हणून कोजागिरी दिवशी जागरण करतात अशी मनाची धारणा आहे.

अश्विन शुद्ध शारदीय पौर्णिमेच्या दिवशी चंद्रमा हा पृथ्वीच्या अगदी निकट म्हणचे जवळ असतो असे म्हटले जाते आणि आणि त्या वतावरणाचा मानवी प्रकृतीवर खुप चांगला सर्वार्थाने सुदृढ शारीरिक आणि मानसिक, उल्हासदायी परिणाम होतो असेही मानले जाते. या दिवशी श्रद्धेने कोजागिरीचे व्रत करण्याची प्रथा आहे.
दिवसा उपवास करून रात्री महालक्ष्मी तसेच ऐरावतावर म्हणजे हत्तीवर आसनस्थ झालेल्या इंद्रदेवाची यथासांग पूजा करावी ती करताना खालील मंत्र म्हणावा….
“या सा पद्मासनस्था विपुलकरितरी पदमपत्रायताक्षी।।
गंभीरावर्तनभिस्तनभर नमिता शुभ्रवस्त्रोत्तरिया ।।
आणि नंतर रात्री पौर्णिमेच्या चंद्रमाला केशर, बदाम, पिस्ता मिश्रित आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा आणि आपल्या सर्व सहोदरा समवेत, नातेवाईक, मित्रमंडळी सोबत त्याचे प्राशन करीत त्या दुधाचा आस्वाद घेत उत्तररात्रीपर्यंत जागरण करावे अशी पारंपरिक प्रथा आहे.

कोजागिरीच्या अनेक कथा आहेत त्या पौराणिक कथेतून आपल्याला वाचायला मिळतात… या कोजागिरी दिवशी “को जागर, को जागर म्हणजे कोण जागे आहे ? कोण जागे आहे.? असे म्हणत चांदण्यांच्या प्रकाशात अमृतकलश घेवुन प्रत्येकाच्या को..जागरती..? कोण जागे आहे. ते पहात लक्ष्मी फिरत असते.. जिथे लोकं जागी आहेत, जिथे लोकं जागृत आहेत तिथे ती थांबते, स्थिरावते अशी श्रद्धा आहे. म्हणून कोजागिरीला जागरण करण्याची प्रथा आहे. हे कोजागिरीचे व्रत केल्याने कुटुंबात सुबत्ता, धन, धान्य, तृप्ती, समाधान लाभून ऐश्वर्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.
या दिवशी कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याला नवीन कपडे शिवून अश्विनी साजरी करण्याची प्रथा आहे.
पौराणिक कोजगिरी पौर्णिमेच्या व्रताची सनतकुमार संहितेमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. या पौर्णिमे दिवशी कौमुदि महोत्सव साजरा केला जातो. शरद ऋतूतील या पौर्णिमेला शारदीय पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा असे संबोधले जाते.
काही लोक आपल्या पारंपरिक प्रथेप्रमाणे संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर आपल्या घरात, परिसरात, मंदिरात, लक्ष दिवे लावून पूजा करून दुग्धपान करून भजन, गाणी म्हणून जागरण करीत उत्साहाने ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात.
पुत्रपौत्रं धनंधान्यम हस्तश्वादिग्वेरथम प्रजानां भवसि माता आयुष्यनतं करोतु मे,।’
कोजागिरी पूजा मंत्र खालील प्रमाणे म्हणावा :-
ऊं यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये, धनधान्य समृद्धी मे देहि दापय स्वाहा:।।

— लेखन : वि.ग.सातपुते.
अध्यक्ष :- महाकवी कालिदास प्रतिष्ठान. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800