नमस्कार, वाचक हो.
“चला केरळला” या लेखमालेत आज आपण केरळच्या खाद्य संस्कृतीविषयी माहिती घेणार आहोत.
केरळची खाद्यसंस्कृती
कुठलीही संस्कृती तिथल्या इतिहास, भौगोलिक वातावरणावर अवलंबून असते. तसेच इथेही आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन तिन्ही धर्मांमुळे इथल्या खाद्य संस्कृतीतही चविंची विविधता आढळून येते. यातच संस्कृतीची मुळंही रुजली आहेत.
शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या खाद्य पदार्थांच्या प्रेमात आपण केरळमध्ये आल्यावर पडतो. आज आपण शाकाहारी पदार्थांची माहिती घेणार आहोत.
केरळ म्हटल्यावर आपल्याला आठवते हिरवीगार भाताची शेती, केळीच्या बागा, नारळाच्या बागा आणि मसाले. त्यामुळे इथल्या आहारात हे चारही घटक महत्वाचे आहेत, एकमेकांना पूरक आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इथे विविध प्रकारच्या केळी मिळतात. स्नॅक्स म्हणून केळीचे चिप्स असतातच पण शिजवेलेले ( वाफवलेले ) केळही नाष्ट्यासाठी वापरतात. लहान मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक म्हणून शिजवेलेले केळ खायला देतात. नैवेद्य किंवा प्रसाद म्हणूनही वापर केला जातो.

सकाळचा नाष्टा हा सर्वांसाठीच महत्वाचा भाग. त्यामुळे कितीही गडबड असली तरी कमीत कमी भाताची गरम पेज तरी पिऊन लोक बाहेर पडतात. सोबत आवडीनुसार लिंब किंवा चिंचेचं नी गुळाचे लोणचे.

नाष्ट्यासाठी इडली, वडा, दोसा हे पदार्थ असतात. पण या शिवाय खास आवडीचे केरळी पदार्थ म्हणजे पुट्ट, आप्पम, इडियाप्पम ( नुलपूट्ट ). तिन्ही पदार्थ
तांदळापासून बनलेले पण प्रत्येकाची स्वतःची खास ओळख, खास चव. तिन्ही पदार्थ हरभऱ्याच्या करी बरोबर खाऊ शकता. पुट्ट शिजवलेल्या केळा सोबतही आवडीने खाल्ले जाते.

तर आप्पमचा जोडीदार स्ट्यू.. नारळाच्या दुधाची करी परफेक्ट कॉम्बिनेशन.
चहा विषयी बोलायचं झालं तर दुध घालून केलेल्या चहा पेक्षा कोरा चहा ( कट्टण चाया ) केरळ वासियांना फार प्रिय आहे.
आमटी किंवा रस्सा भाजीसाठी इथे करी हा शब्द वापरला जातो. अंडा करी, कडला करी…
दुपारच्या जेवणात लाल भात किंवा पांढरा, भाज्या सांबार /रसम, पापड, लोणचं. प्रत्येकाच्या आवडीवर कमी जास्त काही पदार्थ पण दही किंवा ताक शक्यतो रोज आहारात असतेच.

खोबरेल तेलात जेवण बनवले जाते. कढीपत्याचा सढळ हाताने वापर, मेथी, हिरवी मिरची, काळ्या मिऱ्याच्या वापरांमुळे पदार्थ खास होऊन जातात.
इथे सर्व प्रकारच्या फळ भाज्यांचा उपयोग आहारात केला जातो. सोबत पिण्यास गरम पाणी. विविध आयुर्वेदिक वनस्पती एकत्र करून पावडर केली जाते, ती पाण्यात घालून पाणी गरम केल्यावर पाण्याचा रंग बदलतो पण शरीरासाठी फायदेशीर फार असते.
बाराही महिने शक्यतो लोक गरम पाणी पितात आणि कदाचित आहार, आचारामुळेच इथल्या लोकांचं सरासरी आयुष्यही जास्त आहे.
बरेच पारंपरिक गोड पदार्थही केले जातात. नयीआप्पम, अचाप्पम, वटायाप्पम, एला अडा अशा विविध पदार्थांचे मूळ तांदूळ, नारळ, गूळ हेच. पण चव ढव मात्र वेगळी.

चार वाजता स्नॅक्स म्हणून केळापासून बनवलेली गोड भजी (पळमपुरी), केळाची तिखट भजी, उडीद वडा, डाळीचा वडा असे पदार्थ सर्वांनाच आवडतात.
तांदूळ किंवा ठराविक डाळींची खीर करताना त्यातही गूळ, वेलची पावडर, आवडीवर सुकामेवा आणि नारळाचे दुधही घालतात.

निसर्ग वातावरण पाहताना आपल्याला केरळचे वेगळेपण भावतेच पण इथल्या खाद्य पदार्थांमधूनही वेगळी छाप पडते.

– लेखन : सौ. मनिषा पाटील, पालकाड, केरळ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.
मनिषा खूप छान माहिती दिलीय..सुंदर!!