यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील पथसंचलनात ‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राचा चित्ररथ होता. राज्याच्यावतीने दरवर्षी असे चित्ररथ उभारले जातात ज्यामधून महाराष्ट्राची अस्मिता ठळकपणे दिसावी.
सन 1971 ते 2022 या 51 वर्षाच्या काळात महाराष्ट्राने 38 वेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्रीय परंपरेचे दर्शन घडविले आहे आणि 12 वेळा ऊत्कृष्ट चित्ररथासाठीचा पुरस्कारही पटकाविला आहे.
यावर्षीपासून राजपथावरील पथसंचलनात सामील झालेल्या राज्यांच्या चित्ररथाला आणि लष्करी मार्चिंग तुकडीला ऑनलाईन नोंदणीव्दारे मत देऊन जिंकविता येईल, असे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते. त्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पंथसंचलन संपल्यानंतर MyGov या पोर्टलवर ऑनलाईन मत नोंदणी सुरू झाली होती. यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे.
महाराष्ट्राने चित्ररथाच्या सादरीकरणाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने आपली अमिट छाप सोडली आहे.
आतार्पंयत महाराष्ट्राच्या 12 चित्ररथांना पुरस्कार
महाराष्ट्राला लाभलेल्या वैविध्यपुर्ण सांस्कृतिक-सामाजिक, पर्यटन, संत-वारी परंपरा आदि विषयांवर चित्ररथ सादर करण्याची संधी मिळालेली आहे. यात राज्याने 12 वेळा पुरस्कार पटकावले आहे. वर्ष 1993 ते 1995 पर्यंत सलग तीन वेळा प्रथम पुरस्कार पटकावून विक्रम निर्माण केला आहे. आतापर्यंत महाराष्ट्राला 7 वेळा प्रथम पुरस्कार मिळालेले आहेत. तीन वेळा द्वितीय पुरस्कार व दोन वेळा तृतीय पुरस्कार मिळाला आहे.
वर्ष 1981 आणि 2018 मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेका’वर आधारित चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला होता.
महाराष्ट्रात पोळा या सणाला विशेष महत्व आहे ‘बैलपोळा’ मोठया उत्साहात साजरा केला जातो याच विषयावर आधारीत वर्ष 1983 च्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार देण्यात आले होते.
वर्ष 1993 मध्ये ‘लोकमान्य टिळाकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष’ या चित्ररथालाही वर्ष 1974 ला फळाचा राजा ‘हापूस आंबा’ या चित्ररथाला आणि वर्ष 1995 मध्ये ‘बापू स्मृती’ या चित्ररथाला असे सलग तीनदा प्रथम पुरस्कार मिळाला.
वर्ष 2015 मध्ये पंढरीची वारी’ या चित्ररथाला प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले.
महाराष्ट्राने स्वातंत्र्य संग्रामात कश्या प्रकारे भाग घेतला होता यावर आधारीत वर्ष 1986 च्या चित्ररथाला दुसरे पारितोषिक मिळाले होते.
वर्ष 1988 मध्ये ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला’ या चित्ररथाला दुसरे पारितोषिक मिळाले.
वर्ष 2009 मध्ये राज्यातील ‘धनगर’ समाजाची संस्कृती दर्शविणा-या चित्ररथाने दूसरे पारितोषिक मिळाविले.
तर वर्ष 2007 मध्ये ‘जेजुरीचा खंडेराया’ या चित्ररथास तिसरे पुरस्कार मिळाले.
वर्ष 2017 मध्ये लोकमान्य टिळाकांच्या योगदानावर आधारित ‘बाळ गंगाधर टिळक’ या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळालेला होता.
राज्याच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन चित्ररथातून दिसते
महाराष्ट्राने सर्वात प्रथम सन 1971 मध्ये ‘वारली दिंडी’ या विषयावर चित्ररथ सादर केला होता. त्यानंतर दोन वर्षांनी 1973 साली ‘ भारत छोडो आंदोलन ’ ही संकल्पना घेऊन या आंदोलनातील महत्वाच्या प्रसंगांचे चित्ररूप राजपथावर सादर केले होते.
राज्य निर्मितीपासून अवघ्या 14 वर्षात राज्यांमध्ये विविध मोठे उद्योगधंदे स्थापित झाले. 1974 च्या चित्ररथामध्ये याच उदयोगधंदयाचे प्रतिबिंब राजपथावर दिसले.
पुढे 1978 मध्ये ‘विविधतेत समानता’ असा चित्ररथ राजपथावर झळकला.
तर वर्ष 1979 मध्ये ‘बाल विकास ’ या विषयावर चित्ररथाच्या माध्यमातून बालविकासाचे धोरण दर्शविले.
महाराष्ट्रामधील भौगोलिक भागानुरूप विविध सण साजरे केले जातात, असाच विषय धरून 1980 साली ‘महाराष्ट्रातील सण’ असा चित्ररथ साकारण्यात आला.
सन 1982 मध्ये राज्यातील समृद्ध ‘लोककला’ विषयावरील चित्ररथाने राजपथावरील प्रेक्षकांची मने जिंकली.
भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे भारतीय स्वातंत्र चळवळीत विशेष महत्व आहे. लोकमान्य टिळकांवर आधारीत चित्ररथ ४ वेळा राजपथावर वेगवेगळया विषयाला धरून उभारण्यात आले. प्रथम सन 1984 आणि नंतर सन 2017 मध्ये लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना ‘स्वराज माझा जन्म सिद्ध अधिकार आहे ’ या घोषणेवर आधारीत चित्ररथ उभारण्यात आला. या चित्ररथाला दोनही वेळा व्दितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्ष 1988 मध्ये ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला’ तर वर्ष 1993 मध्ये ‘लोकमान्य टिळाकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष’ विषयावर चित्ररथ होता.
वर्ष 1986 मध्ये स्वातंत्र्याची चाळीशी चे वर्ष होते, या निमित्ताने ‘स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान’ असा चित्ररथ राजपथावर सादर करण्यात आला.
सन 1990 मध्ये पुन्हा एकदा ‘लोककला’ या विषयावर चित्ररथ राजपथावर दर्शविण्यात आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शताब्दी वर्षानिमित्ताने वर्ष 1991 मध्ये चित्ररथ उभारण्यात आला.
‘वारली तारपा नृत्य’ असा चित्ररथ सण 1992 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात दिसला.
‘हापूस’ आंबा आंब्यांचा राजा ‘हापूस आंबा’ या संकल्पनेवर सण 1994 मध्ये चित्ररथ साकारण्यात आला.
महात्मा गांधीजीच्या 125 व्या जयंती वर्षामध्ये राज्याने वर्ष 1996 ला ‘बापु स्मृती’ असा चित्ररथ दर्शविण्यात आला.
वर्ष 1997 ला चित्रपट सृष्टीने शंभरी पुर्ण केली होती. याची आठवण म्हणुन ‘चित्रपट सृष्टीची शंभर वर्ष’ अशा संकल्पनेवर चित्ररथ साकारण्यात आला.
वर्ष 1996 मध्ये ‘महिला बालविकास’ अशा महत्वपुर्ण विषयावर चित्ररथ तयार करण्यात आला.
वर्ष 1999 ‘मुंबई देशाची आर्थिक राजधानी’ असा चित्ररथ राजपथावर झळकला.
राज्याची ओळख ठळकपणे दर्शविणारे ‘साखर कारखाने’ यावर आधारित 2001 मध्ये चित्ररथ साकारण्यात आला.
गोकुळ अष्टमीला दही हंडी फोडणारे गोविंदा यांच्यावर ‘गोविंदा आला’ अशी संकल्पना घेऊन 2002 ला चित्ररथ दर्शविणत आला.
सण 2003 मध्ये ‘आदिवासी वारली चित्रकला’ असा आदिवासी जीवनावर आधारित चित्ररथ आकारण्यात आला.
महाराष्ट्राचा स्थापत्य ठेवा असलेल्या अंजता लेणी यावर आधारित सण 2004 ला अजंता लेणींमधील काही लेणींची भीत्तीचित्रे चित्ररथात दर्शविण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘ग्रामस्वच्छता अभियान’ योजनेवर आधारीत चित्ररथ सण 2006 मध्ये साकारण्यात आला.
राज्यात भरणारी महत्वाची जत्रा ‘जेजुरीचा खंडेराया’ या संकल्पनेचा चित्ररथ वर्ष 2007 मध्ये चित्ररथ दर्शविण्यात आला.
पुढे 2009 ला ‘धनगर’ असा विषय घेऊन चित्ररथ उभारण्यात आला.
वर्ष 2010 ला जगाचे लक्ष वेधणारा ‘मुंबईचा डबेवाला’ या संकल्पनेवरील चित्ररथ साकारण्यात आला.
महाराष्ट्राचे नृत्य ‘लावणी’ यावर चित्ररथ 2011 मध्ये दर्शविण्यात आला, या चित्ररथाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
वर्ष 2012 मध्ये वेरूळ लेणीमधील ‘कैलास मंदीर’ या विषयावरील चित्ररथ उभारण्यात आला होता.
सन 2014 मध्ये कोकणातील मच्छीमारी समुहातील असणारा महत्वपुर्ण सण ‘नारळी पौर्णिमा’ या विषयावर चित्ररथ साकाराण्यात आला.
वर्ष 2015 मध्ये राज्याची शतकांची परंपरा ‘पंढरीची वारी’ या वारीच्या विषयावर आधारित चित्ररथाने राजपथावर भक्तीमय वातावरण निर्माण केले.
सण 2019 महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त ‘भारत छोडो’ आंदोलनवर आधारित चित्ररथ साकारण्यात आला.
वर्ष 2021 मध्ये ‘वारकरी संत परंपरेवर’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ होता.
महाराष्ट्राचा भूभाग, प्राचीन तसेच आधूनिक इतिहासाचा महत्वाचा प्रदेश आहे. राज्याच्या निर्मितीपूर्वीही भारतीय स्वातंत्र्य लढयात या भूभागातून येणा-या विचारवंत नेतृत्वाने देशाला दिशा दिलेली होती. राज्य निर्मितीनंतरही आधूनिक महाराष्ट्र, शिक्षित महाराष्ट्र, स्त्री-पुरूष समानता पाळणारा महाराष्ट्र, राज्यातील लोकांचे जीवनमान उंचावेल अशी धोरणे राबविण्याचा राज्याचा मानस सदैव असतो आणि त्याचे प्रतिबिंब चित्ररथात दिसून येते.

– लेखन : अंजु निमसरकर
माहिती अधिकारी. महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800