काला पत्थर
“काला पत्थर” हा चित्रपट प्रदर्शित झाला ती तारीख होती ९ ऑगस्ट १९७९. जवळपास ४३ वर्षे झाली, तरी हा चित्रपट आजही मनात घर करून आहे.
खरं म्हटलं तर हा भारतातील पहिला मोठ्या दुर्घटने वर आधारित चित्रपट. झारखंडमधील चासनाला खाण दुर्घटनेवर आधारित हा सिनेमा होता ज्यामध्ये १९७५ साली ३७२ खाण कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी हा सर्वात मोठं बजेट असलेला चित्रपट होता आणि खाण पुराच्या दृश्यांच्या चित्रीकरणासाठी हॉलीवूडच्या तंत्रज्ञांना खास आणण्यात आले होते. चित्रपट सर्व प्रकारे भव्य बनला होता.
माझ्या मते ह्या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची भूमिका ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम भूमिकांपैकी एक आहे. शशी कपूरने चित्रपटात म्हटल्याप्रमाणे, तो कोळशाच्या खाणीत उद्रेक होण्यासाठी सज्ज असलेला ज्वालामुखी आहे. अमिताभने, सर्व काही आत ठेवून दुखावलेला आणि ओझ्याने दबलेले असे एक पात्र साकारलं आहे. “माझं दुःख हे माझं नशीब आहे आणि मी ते टाळू शकत नाही”, असे तो एक हळुवार दृश्यात राखीला सांगतो.
दिग्दर्शक यश चोप्रा आणि लेखक सलीम-जावेद यांनी एक अनोखी व्यक्तिरेखा निर्माण केली आहे आणि अमिताभने त्याला अप्रतिम शैली आणि सर्वांगसुंदर अभिनयाने अति उच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे. जेव्हा शरत सक्सेना त्याला चाकू दाखवतो, तेव्हा, तो आपल्या उघड्या हाताने तो चाकू धरतो आणि त्याच्या हातातून काढून घेण्याचे धाडस करतो. शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ यांची अशीच अफलातून जुगलबंदी अनुभवायला मिळते. एकमेकांकडे रोखून बघताना दोघांच्या ही डोळ्यात नुसता अंगार असतो. जरा आठवा, धूम मचे धूम’ गाण्याच्या वेळी प्रत्येकजण गात, नाचत आहे, परंतु अमिताभ संकोचून हसत आणि दूरून भाग घेत असलेला दाखवला आहे.
खरं तर अमिताभ ला ह्या चित्रपटा साठी फिल्मफेअर चे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन मिळाले होते पण हा पुरस्कार अमोल पालेकर यांना गोल माल साठी देण्यात आला, हा आणखी एक घोर अन्याय. काला पत्थरला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह 8 पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. हा मल्टी स्टार चित्रपट असल्याने सर्वांच्याच भूमिका उत्तम जमल्या होत्या. शत्रुघ्न सिन्हा यांनी मंगलच्या भूमिकेत अशी काही उत्कृष्ट कामगिरी केली की जणू काही त्यांच्याच साठी ही टेलरमेड भूमिका बनवली गेली होती. त्याचे वन लाइनर्स अप्रतिम आहेत, “तीसरे बादशाह हम हैं’ हा आयकॉनिक डायलॉग अजरामर आहे. शशी कपूरने हलका रोमँटिक मूड आणि गांभीर्याचा समतोल साधला आहे, प्रेम चोप्राचा सामना करताना त्याला जेव्हा राग येतो तेव्हा तो खूप उत्कट पणे समोर येतो.
राखीने डॉक्टरची भूमिका प्रभावीपणे सादर केली आहे, अमिताभला त्याचे ओझे मोकळे करून पुन्हा जगण्यास प्रेरित करण्यासाठी तिचा आटोकाट प्रयत्न, हा चित्रपटाचा आत्मा आहे.
संजीव कुमारने निराश डॉक्टरचे पात्र उत्तम सादर केले आहे. भूमिका छोटी होती पण कायम लक्षात राहील अशी होती.
ह्या चित्रपटाचे संगीत हा त्याच्यावर चा सोनेरी कळस आहे. गीतकार साहिर लुधियानवी आणि संगीतकार राजेश रोशन यांनी एकाहुन एक सरस गाणी ह्यात दिली आहेत, मग ते ‘एक रास्ता है जिंदगी’ असो की ‘बाहो मे ‘तेरी’, किंवा ‘मेरी दूरोसे आयी बारात’ असो एका पेक्षा एक सुमधुर चाली आपल्याला वेड लावून गेल्या होत्या. किंबहुना आज ही तितकेच वेड लावतात.
नीतू सिंग नाचत असताना अमिताभ आणि राखी या अंधाऱ्या पावसाळी रात्री शांतपणे चालताना ‘जगया जगया’ चे चित्रीकरण तर अविस्मरणीय आणि जादुई आहे. जरी अनेकांना वाटत असेल की आता भारतीय चित्रपट अधिक तांत्रिकदृष्ट्या पॉलिश आहेत आणि आज त्यांची निर्मिती मूल्ये अधिक आहेत, तरीही मला वाटत नाही की काला पत्थर सारखे चित्रपट पुन्हा पुन्हा बनवले जाऊ शकतात.
काला पत्थर, भूतकाळातील क्लासिक चित्रपटांमध्ये एक विशिष्ट स्थान कायम स्वरूपी पटकावून आहे.
– लेखन : दीपक ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800