जनरल अरुणकुमार वैद्य यांची आज, २७ जानेवारी २०२३ रोजी ९७ वी जयंती आहे. त्या निमित्ताने केलेले त्यांचे हे स्मरण.
जनरल अरुणकुमार वैद्य यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
पाकिस्तानातील कराची येथील शिक्षणाधिकारी
नारायण जगन्नाथ वैद्य हे अरुणकुमार वैद्य यांचे पणजोबा. एनजेव्हीं हायस्कूल ह्या नांवाचे त्यांनी सुरू केलेले हायस्कूल आजही कराची येथे आहे.
अरुणकुमार वैद्य यांचा जन्म २७ जानेवारी १९२६ रोजी मुंबई येथे झाला. वैद्य हे घराणे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील आहे. त्यांचे वडील जिल्हाधिकारी होते. त्यांची बदली अलिबाग येथे झाल्याने अरुणकुमार यांचे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. त्यांच्या स्मरणार्थ या शाळेला त्यांचेच नाव देण्यात आले आहे.
पुढे पुणे येथे ४ वर्षे माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. शालेय जीवनापासून त्यांना मिलिटरीत जाण्याची ओढ होती. ३० जानेवारी १९४५ रोजी ते रॉयल डेक्कनहॉर्स रेजिमेंटमध्ये दाखल झाले.
अरुणकुमार यांचा विवाह अलिबागच्या धारकर घराण्यातील भानुमती यांच्याशी ५ डिसेंबर १९४८ रोजी झाला. ३८ वर्षांच्या संसारात ह्या दांपत्याला नीता, पारिजात व तारिणी अशा तीन मुली झाल्या.
जनरल अरुणकुमार यांना २ महावीर चक्रे, एक परम विशिष्ट सेवापदक, एक अति विशिष्ठ सेवापदक अशी बहुमानाची पदके मिळाली होती. १९८३ ते ३१ जानेवारी १९८६ पर्यंत ते जनरल या हुद्यावर चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते.
१९७१ च्या बांगला देश मुक्ती लढाईत त्यांच्या नेतृत्वाखालील सैनिकांनी पाकिस्तानचे बासष्ट रणगाडे निकामी केले. १९६९ साली नागालँड येथील सशस्त्र नागांची बंडाळी मोडण्यात ते यशस्वी झाले.
१ ऑगस्ट १९८३ रोजी भारताचे सरसेनानी म्हणून त्यांनी सूत्रे स्विकारली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवून ऑपरेशन ब्लू स्टार यशस्वी केले.
जनरल म्हणून आपल्या सैनिकांकरिता घरे, व इतर सुविधा त्यांनी आत्मीयतेने केल्या. ३१ जानेवारी १९८६ रोजी ते निवृत्त झाले. पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये त्यांनी ‘आरोही’ बंगला बांधला आणि आपल्या पत्नी मुलींसह ते पुण्यात राहण्यास आले.
अरुणकुमार यांना पोस्टाची तिकिटे जमवण्याचा छंद होता. त्यांनी सुमारे दहा हजार तिकिटांचा संग्रह केला होता. निवृतीनंतर ते वाचन, संगीत ऐकणे आणि घोड्यावरून रपेट मारणे यात आपला वेळ घालवत असत.
आपल्या कुटुंबीयांसह आनंदाने जीवन जगत असतांना १० ऑगस्ट १९८६ रोजी सकाळी दोन शीख तरुणांनी त्यांची मारुती गाडीत निर्घृण हत्या केली आणि एक शूर सेनानी काळाच्या पडद्याआड गेला.

– लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
General Vaidya यांच्या वरील लेख खूप छान. नवीन पिढीने त्यांच्या पासून प्रेरणा घेतली पाहिजे
व्यक्तिमत्त्व थोर आहे…छान माहितीपूर्ण लेख
खूप छान माहितीपूर्ण लेख