सेवानिवृत्ती नंतर
“सेवानिवृत्ती म्हणजे नवीन आयुष्याची नवी सुरुवात” हाच सुविचार त्या दिवशी म्हणजेच ३० जानेवारी २०२० रोजी, बेलापूर कार्यालयाच्या सूचना बोर्डवर मी लिहिला होता. सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्यानंतरचा, ३१ जानेवारी २०२० हा दिवस, आमच्यासाठी कार्यालयातील शेवटचा दिवस !
आम्ही, आज हा दिवस खूप आनंदात उपभोगणार होतो. सर्वांनी ह्या दिवसासाठी वन-पीस ड्रेसकोड परिधान करण्याचे ठरविले होते. वेळेच्या अगोदरच सगळ्या जणी कार्यालयात पोहोचल्या होत्या. एकमेकींना भेटत, कोडकौतुक करत, जणू ‘गप्पांच्या गावात !’ असा माहोल सजला होता.
आयुष्यातील पस्तीस-छत्तीस वर्षे, अगदी अवखळ तारुण्यापासून, नोकरीनिमित्त एकमेकांसोबत घालवली होती. मागे राहून गेलेल्या, त्या दिवसांची, प्रत्येक क्षणांची नि वर्षांची आठवण, डोळ्यासमोर सारे प्रसंग उभे करून देत होती.
योगाभ्यासक सौ.बडे मॅडम, साऊंड स्पीकर व माईक आणण्यास, बिलकुल विसरल्या नव्हत्या. प्रत्येक कार्यक्रमात, ह्या वस्तू आठवणीने आणून, ती स्वतःची जबाबदारी चोख सांभाळून, कार्यक्रमाला एक वेगळीच लज्जत येत असे.
साऊंड स्पीकरला मोबाईल जोडून, मनाला धुंद करणारी, जुन्या चित्रपटातील हिंदी गाणी लावली. सर्वांनी त्या गीतांच्या ठेक्यावर ताल धरला. सर्वांनी मनसोक्त व स्वच्छंदीपणे नाचून घेतले. त्यात माझा व मृणालचा डान्स विशेष रंगला होता. कधी न नाचणारी पण प्रत्येक कार्यक्रमात उत्साहाने भाग घेवून, सुंदर छायाचित्रण करणारी अमृता, आज मात्र तिला तिच्या आवडत्या गाण्यावर नाचताना पाहिले. सगळ्या जणी नाचून खूप थकल्या. लगेचच बाहेरून मागवलेले जेवण, एकत्र बसून सर्वांनी कार्यालयीन भोजनाला, वनभोजनाचे स्वरूप आणले.
आयुष्यातील ती तारुण्यातील काही विशिष्ट वर्षे, म्हणजे एमटीएनएलच्या महासागरातील जणू आम्ही ‘असंख्य जलपऱ्या !’ ह्या जलपऱ्यांनी, एकत्रित घालवलेली ही पस्तीस वर्षे म्हणजे, आमच्यासाठी सेवानिवृत्ती नंतर, जीवन जगण्याचे अमृतमय पेय होय. ह्याच आठवणींना उजाळा द्यावा, असे ठरवत, आज प्रत्येकीने स्वतःचे मनोगत मांडण्यास सुरुवात केली. स्टाफ नंबर प्रमाणे प्रत्येक जण पुढे येऊन, स्वतःचे मनोगत सांगू लागल्या.
बॉम्बे टेलिफोन मध्ये, आम्ही नोकरीला लागलो तेव्हा, सगळ्याच अठरा-वीस वर्षांच्या होतो. अगदी भर तारुण्यात होतो. काहींचे शिक्षण चालू होते. मी सुध्दा त्यावेळी बी कॉमच्या पहिल्या वर्षात शिकत होते. बहुतेक जणींना प्रशिक्षण घेऊन, वॉडबी एक्सचेंज तर सीटीएक्स, म्हणजेच व्ही टी ला रुजू व्हावे लागले होते. व्ही टी परिसरात ही कार्यालये असल्याने, सर्वांना आलेले विलक्षण अनुभव, ऐकताना फार मजा येत होती. त्यावेळी म्हणजेच १९८२-८३ ला नाईट शिफ्टला जाताना तेथील रस्ते सामसूम असत. कारण तो परिसर कार्यालयीन असल्यामुळे, संध्याकाळी सहानंतर त्या परिसरात शुकशुकाट होत असे. त्यामुळे काही विक्षिप्त माणसे अचानक समोर आल्याने, आमची मात्र भीतीने घाबरगुंडी उडत असे. त्यामुळे एकत्र ठरवून, ठराविक वेळेची रेल्वे पकडून, सगळ्या व्ही टी स्टेशनला भेटून, मगच एकत्रित कार्यालयात जात असू.
खूपच चित्रविचित्र अनुभव बऱ्याच जणींच्या मुखातून ऐकावयास मिळाले. लग्न जुळवताना आमच्या नाईट डय़ुटीमुळे, आमच्या बऱ्याच मैत्रिणींची लग्ने जुळत नसत. असाच एक किस्सा स्मिताने सांगितला. पण तिच्या सासूने या गोष्टीला विरोध न करता लग्नास मान्यता दिली होती. खरच ! त्यावेळी एवढ्या जुन्या विचारांच्या समाजात वावरणारी स्मिताची सासू, आधुनिक विचार म्हणजेच पुढील जीवनाचा विचार करून, तिने लग्नाला दिलेला होकार, स्मिताच्या आयुष्याची सुरळीत घडी बसविण्यास, योग्य ठरलेला निर्णय होता.
त्याकाळी एकत्र कुटुंब पद्धत राहणी, विशेष प्रचलीत होती. काही मैत्रिणींच्या लग्नानंतर, त्यांना एकत्र कुटुंबीय घराणी लाभली. मग काय ! सर्व कुटुंबांचे जेवण व धुणी-भांडी आवरून, धावत पळत कार्यालयात वेळेवर पोहचावे लागत असे. कधी कधी तर लेटमार्क सुद्धा मस्टरवर लिहिला जायचा. पण काही कुटुंबात फार समजूतदार सासू-जावा होत्या. त्यामुळे समजुतीने घेऊन, नोकरी करणाऱ्या स्त्रीवर कामांचा भार कमी देत असत. शेवटी काय, प्रत्येकीने कुटुंब आणि नोकरी यांचा समतोल राखत, आज नोकरीची पस्तीस वर्षे पूर्ण केली. असे अनेक सुखद व दुःखद अनुभव ऐकताना, क्षणभर आयुष्याच्या भूतकाळात हरवलो.
तारुण्यातील तो तडजोडीचा संसार थाटताना, माहेरी लपून-छपून जावे लागे. एखादा सी ऑफ घेऊन, पूर्ण दिवस आईच्या सुख-दुःखात घालवायचा नि रोजच्या प्रमाणे घरी पोहचायचे. महिन्याच्या मधेच मिळणारा इन्सेंटिव्ह (जादा कामाची रक्कम) स्वतःला आवडणाऱ्या वस्तूंसाठी व माहेरच्या माणसांसाठी भेटवस्तू खरेदी करण्यास खर्च करायचो. कधी आई-बाबांस हक्काने पैसे द्यायचो. एकूण काय ! आम्ही दोन्ही घरांना उत्तम सांभाळू शकलो, ते फक्त, माझ्या ‘बॉम्बे टेलिफोन’ कंपनीमुळे !
साऱ्या आठवणींनी जड झालेले मन, हलके करण्यासाठी आम्ही नक्कल करण्याचा खेळ सुरू केला. एकमेकींच्या केलेल्या नकला, करून व पाहून सगळ्या पोट दुखेपर्यंत हसत होत्या. मी त्यादिवशी, पांडे सरांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. एक अधिकारी आपल्या स्टाफशी कसे बोलतो, हा अनुभव मला घ्यावयाचा होता. माझ्या अभिनयात, सेवानिवृत्ती पूर्वी श्री.पांडे सरांनी, सर्व स्टाफबरोबर घेतलेली मिटींग, मी सर्वांसमोर सादर केली. ऑफिसच्या दरवाज्यातून पटकन त्यांचे येणे व त्यांच केबिनमध्ये जाऊन बसणे ! एका विशिष्ट आवाजात क्लार्कला किंवा एखाद्या स्टाफला आवाज देणे ! ह्या गोष्टींचा अभिनय करण्याचा प्रयत्न मी केला. त्यानंतर मिटींग मध्ये निवृतीचे फॉर्म हातात धरून, प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक त्यांच्या अविर्भावात सांगणे. असे मी त्यांचे अनुकरण केले होते. ‘सर, क्षमा चाहती हूँ। ऐसा मोका मुझे दुबारा मिलनेवाला नहीं था आपने हमें हमेशा सहायता की , धन्यवाद ! सर अपनेपनसे आपका अनुकरण किया था।’
जाता-जाता प्रेमाची आठवण म्हणून, प्रत्येकीने एकमेकींना देण्यासाठी काहीना काही भेटवस्तू दिली. प्रेमाचा गोडवा सदैव दरवळत राहण्यासाठी चॉकलेटस खाल्ली. सर्वांचा वाढदिवस सजावा म्हणून म्हणा, किंवा आमच्या नोकरीचा शेवटचा दिवस म्हणून म्हणा, केक कापून आनंदाला द्विगुणित केले होते.
कार्यालयातून बाहेर पडण्याआधी, मी ज्या पोझिशन डेस्कवर बसत असे, त्या संगणकाला चालू करून, केलेल्या कामाला वंदन केले. माझ्या सुपरवायझरच्या खुर्चीवर दोन मिनीटे स्तब्ध बसले. लॉकर रूममध्ये जाऊन लॉकरचे कुलूप उघडून त्याच्याकडे डोळे भरून पाहिले. जेवणाच्या खोलीतून फेरफटका मारला. ऑफिसमधील सर्व पोझिशनवरून हळुवार हात फिरवला. सारे डोळ्यात भरून, मनाच्या कप्प्यात दडवून घेतले.
सर्वांना पुन्हा, ‘आठवण तुझी येत राहील’ ही माझी कविता ऐकावीशी वाटली. पुन्हा सर्वांचे डोळे पाणावले. साऱ्या जणींनी एकमेकींना घट्ट मिठीत घेतले.
मला घरी नेण्यासाठी, माझे पती महेंद्र व माझा भाचा दिप्तेश, गाडी घेऊन ऑफीसला आले होते. जड अंतकरणाने सगळ्यांनी निरोप घेतला.
घराच्या दारात येताच, सासर-माहेर व मित्र परिवार, तसेच आमच्या क्लासचे विद्यार्थी, ह्या सर्वांनी केलेले स्वागत, म्हणजे स्त्री सन्मानाची प्रशंसा होती. माझा भाऊ (गणपत) आज्याने सन्माननीय शाल खांद्यावर टाकून हातात फुलांचा गुच्छ दिला, तेव्हा दोघांची मने अभिमानाने फुलली. माझी नणंद कल्पनाने मला ओवाळून, आज जणू सासरच्या उंबरठय़ातून मानाने घरात प्रवेश करून घेतला, ही राहून गेलेली लग्नातील विधी, आज पूर्ण झाली, असे मला जाणवले. सर्वांनी माझे सुंदर स्वागत केले. आयुष्याच्या खऱ्या जिवंत नाटकाचा पहिला अंक स्वाभिमानात व प्रामाणिकतेत आज संपला होता.
उद्याचा सूर्योदय आम्हा सर्वांसाठी आयुष्याचा नवीन दिवस असेल. हाच दिवस सर्वांना नवीन आयुष्याची सुरुवात करून देणारा ठरेल. आयुष्याच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होईल !
उद्यापासून धावपळ नसेल. कामे आवरण्याची घाई नसेल. संथ जीवनाची चाहूल मिळेल. कधीही झोपा, कधीही उठा. सर्व दिनचर्या बदललेली असेल. तरीही प्रत्येकीने मनी ठरवले होते. योगा नियमित करणे. सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारणे. सर्वांनी महिन्यातून एकदा भेटणे. काहीतरी नवीन शिकण्यासाठी वेगवेगळे क्लास लावणे.
मग, मीही विडा उचलला. माझा राहून गेलेला छंद, आता मला पूर्णपणे जोपासता येणार होता. लगेचच मोबाईलवर व्हाट्सअप ग्रुप तयार झाला. प्रत्येकीच्या वाढदिवसानिमित्त, मी माझ्या काव्यातून त्यांच्या प्रतिमेवर आधारित, कविता करून प्रत्येकीला शुभेच्छा देऊ लागले.
अचानक कोरोना नावाचा महाभयंकर आजार जगावर कोसळला. लॉकडाऊनच्या नावाखाली सर्व शहरे थांबली. सगळे व्यवहार थांबले.
पण, माननीय संपादक श्री. देवेंद्र भुजबळ व सहसंपादिका सौ. अलका भुजबळ, यांचे “न्यूज स्टोरी टुडे” पोर्टल मात्र आपले काम करत होते. त्यांच्या पोर्टलवरुन बरेच लेख मला वाचण्यास मिळू लागले. त्या कोरोना काळात, प्रत्येकाचे सकारात्मक मनोबल वाढवण्यासाठी ‘कोरोना ‘विषयावर आधारित, अनेक लेख पोर्टलवर येऊ लागले. मीही एक लेख लिहून ग्रुपवर पाठवला. संध्याकाळी अलकाने मला फोन करून सांगितले, ‘तुझा एक छानसा फोटो मला पाठव. आजचा तुझा लेख, पोर्टलवर देत आहे.’ ते ऐकून मला झालेला आनंद, मी आज तो शब्दात वर्णन करु शकणार नाही. माझ्या लेखनाला स्फूर्ती, ह्या उभयतांच्या सहकार्याने मिळाली. धन्यवाद सर , धन्यवाद अलका.
माझ्या शुभेच्छायुक्त कविता वाचून, माझी प्रत्येक मैत्रिण खूप खुश होत असे. त्यांचे अभिप्राय वाचून मला खूप समाधान मिळत असे. असेच शुभदाने पाठविलेले काही अभिप्राय, मी पुढे देत आहे.
“तुझ्यासारखी सर्वगुणसंपन्न मैत्रीण असणं हे तर आमचं परमभाग्य ! किती सोशिक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, हे तुला सुद्धा कळलं नसेल. वर्षा, तुझ्या सारख्या फार कमी व्यक्ती असतात जगात. कित्ती कौतुक केलं तरी अपुरच ! तूच मैत्रीण म्हणून कळलीस हेच खूप भाग्य. ❤️🙏🏼गैरसमज करून घेऊ नकोस. 🙏🏼💐अंतकरणापासून लिहिलंय मी ❤️❤️🙏🏼 Bkc त असताना आपण बरोबर असायचो काही काळ. पण यत्किंचितही मला ठाऊक नव्हतं तू इतकी सर्वगुणसंपन्न असशील ! 🙏🏼❤️
तुझ्या सारखी तूच एकमेद्वितीय🙏🏼🙏🏼💐
सगळ्यांना साजेसं गोड अमृता सारखे भावणारे शब्दबद्ध वर्णन सहज लिलया करणारे अत्यंत आभारी🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️❤️😀😀
पण खरं मनापासून सांगते प्रत्येकीचा वाढदिवस तुझ्या कवितेने परिपूर्ण करतेस अगदी संपता संपता छान वाटत तुझी कविता आली की😀🙏🏼❤️
Yesss अखेर तू एक परिसासारखी हाडाची कवयित्री आणि लेखिका पण👍🙏🏼💐😀
तुम्हा सर्वांचे अभिप्राय, माझ्या काव्यास वा लेखास ऊर्जा देतात. माझ्यातील उत्साहास द्विगुणित करतात. मला लिहिण्यास हुरुप निर्माण करून देतात. जणूकाही एक अद्भुत शक्ती मिळवून देतात.

– लेखन : सौ. वर्षा भाबल.
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूपच सुंदर मनोगत. सेवा निवृत्ती नंतरच्या नवीन आयुष्याच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🌹
🌹सेवानिवृत्ती नंतर नवीन जीवनाला सुरुवात. खूपच सुंदर अनुभव आपण या लेखात मांडले आहेत. पस्तीस वर्ष एकाच संस्थेत कामं करण इतकं सोपं नव्हते.
जाताना डोळ्यासमोर उभा राहतो तो मागील प्रत्येक क्षण. 🌹
हल्ली कॉर्पोरेट क्षेत्रात तीन चार वर्ष खूप होतात.
🌹धन्यवाद सौ वर्षा भाबल मॅडम 🌹
अतिशय भावपूर्ण लेख. जिथे पस्तीस वर्षे आयुष्याची वाटचाल केली,त्या वाटेचा निरोप घेताना होणारी भावनिक अंदोलने , वर्षा भाबल यांनी सुरेख टिपली आहेत.सेवानिवृत्तीचा हा क्षण खरोखरच विलक्षण भावनिक असतो याचा मलाही अनुभव आहेच..