खूप दिवसापासून टीव्ही आणि त्यावरील कार्यक्रमांचा बाल, युवा मनांवर होणारा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट दुष्परिणाम ह्या विषयावर लिहायचं ठरवत होते. पण काल एक ठराविक मालिका पाहिली आणि अक्षरशः स्वतःवर ताबा ठेवणे अशक्य झाले.
आजकालच्या जाहिराती काय, कार्यक्रम काय जास्त करून तरुणांना वाहवत जा ह्या प्रकारचा संदेश देत आहेत, असे नाही वाटत तुम्हाला ?
मधे एका कंपनीच्या जाहिरातीत तर चक्क रात्री तू इतक्या लवकर घरी जाते आहेस ? हे अशा प्रकारे सांगितले गेले की जणू मुलीने किंवा मुलाने रात्री नऊ वाजता घरी जाणे म्हणजे चुकीचे आहे ! आता जी मुलं मुली अशा जाहिरातींना प्रमाण मानून जगतात त्यांच्या करता नऊला घरी जाणारे जणू चक्क मागासलेले अशा अर्थाचे संवाद त्या जाहिरातीत आहेत. त्यामुळे ही मुले काय विचार करणार ते आपण समजू शकतो.
तसेच काही जाहिरातीत तरुण मुलगा आणि मुलगी ह्यांच्या चॉकलेट खाताना एकदुसऱ्याच्या अगदी जवळ येऊन चॉकलेट खाणे वगैरे आपल्या संस्कृतीत नाही. तरीही असले फालतू प्रकार दाखवले जातात. आणि ते वारंवार रिपीट होत असल्यामुळे मुलांच्या मनात परोक्ष जागा करत चालले आहेत.
आजकाल फार दाखवल्या जातात त्या अजून काही जाहिरातींमध्ये प्रामुख्याने आहेत त्या वेगवेगळ्या गेम्सच्या ॲपच्या जाहिराती. आपल्या नवीन पिढीला /युवक युवतींना ह्या असल्या ॲप्स मधे खेळायला लावून त्यांचा मोलाचा वेळ, वय घालवण्या पलीकडे काय साध्य करतात हे ॲप डाऊनलोड करून ? तरीही त्याचे प्रचारक मोठमोठाले नट आहेत कारण त्यांना पैसा मिळतो आहे.
एक सहज हिशेब म्हणून सांगते. समजा एक मुलगा किंवा मुलगी रोज एक तास त्या ॲप वर गेम खेळते, आपल्याला वाटते एकच तास खेळते आहे. पण वास्तवात महिन्या अंती ३० तास.. वर्षांती ३६० तास डायरेक्ट त्यात वाया जातात. एका तासाचे अगदी कमीतकमी मोल ३००/- रुपये धरले तर त्या हिशेबाने १०८००० /- हे त्याने कमावलेच नाही, असा त्याचा अर्थ होतो. त्याशिवाय नेटचे पैसे, बॅटरी चार्जिंग ला लागणारे पैसे.. असे अनेक इनडायरेक्ट खर्च तर आहेच. शिवाय मनावर काय दुष्परिणाम होतात, त्याची तर गणतीच करता येत नाह !
तसेच आता काही सिरियल सर्रास लिव्ह इन रिलेशनशिप, विवाह बाह्य संबंध प्रमोट करतात असे पण दिसते आहे. आपण प्रगती करायची आहे पण कशात ? हा एक मोठा प्रश्न आहे. आपण शैक्षणिक, वैज्ञानिक प्रगती करत असलो तर उत्तमच. पण अशाप्रकारची सामाजिक प्रगती (?) करणे आपल्या समाजाकरता एक मोठी धोक्याची घंटाच आहे आणि दुर्दैव म्हणजे ह्या मालिकांमध्ये काम करणारी मंडळी लोकप्रिय कलाकार आहेत. त्या सगळ्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आणि बऱ्या पैकी आंधळा (इथे आंधळा म्हणजे डोळे असून जागृत नसलेला आहे) आहे जे त्या लोकांना अशा मालिकेत काम केले म्हणून हडसवून काढत नाहीये.
तुम्ही जरा विचार करा, तुमच्या घरी एक तरुण मुलगी आहे आणि ती लिव्ह इन मधे राहायची परवानगी मागते. तुम्ही दिली पण. पण तिची “श्रद्धा” नाही होणार ह्याची काय गॅरंटी ? चला मानले की तिची श्रद्धा नाही होणार. पण होणारे अपत्य ? ती कोणाची जबाबदारी असणार ? चला त्यातून पण काही करार केले आणि जबाबदारी पण ठरवली.पण ज्यांना घराची जबाबदारी घ्यायची नाही म्हणून लिव्ह इन मधे राहायचे आहे ते पुढे हे करार निभवतील ह्याची काय गॅरंटी ?
दुसरे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या अशा मॉर्डन लाईफ स्टाईल कुणाला हव्या आहेत तर त्या हव्या आहेत आपल्या अधिकतर सुशिक्षित तरुणांना. म्हणजे ह्यात ९५% लोक उच्च शिक्षित आणि बुद्धिमान आहेत. अर्थात सुपीक डोक्याचे ! आणि एका पद्धतशीर आयोजनाखाली ह्या पिढीने नवीन पिढीला जन्म घालू नये ह्याची ही आतापासूनची तयारी आहे, असे नाही वाटत तुम्हाला ? कारण बुद्धिमान प्रजा जन्माला आली तर राष्ट्र प्रगती करेल. पण जर थोडी मवाळ प्रजा जन्माला आली तर उद्या राष्ट्रावर कंट्रोल करणे सोयीचे होईल. कुणाला ते तुमच्या आमच्या सारखे सगळेच समजत आहेत !
मित्रांनो, जरा विचार करा आणि आपल्या मुलांना घर, संसार आणि मुख्य म्हणजे सामाजिक जबाबदारी बद्दल समज द्या. उगाच एखाद्या अशा मालिकेला टी आर पी देऊ नका जी वाळवी सारखी आपला समाज कोरायला निघाली आहे, ही माझी कळकळची विनंती आहे.

– लेखन : सौ. अनला बापट. राजकोट
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अगदी १००% पटले! ही जागृती समाजात होण्याची नितांत गरज आहे! 👍👍