भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या जीवनात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्रांती घडवून आणली. आज हा समाज स्वाभिमानाचे जे जीवन जगत आहे, त्यात त्यांच्या पत्नी सौ रमाबाईं च्या त्यागी वृत्तीचा समावेश आहे. अशा या त्यागी आणि धाडसी माऊलीचा आज, २७ मे रोजी स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांना कोटीकोटी प्रणाम !!
कोणत्याही पुरुषाच्या आयुष्यात व त्याच्या विकासात स्त्रीचे मोठे योगदान असते असे म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी ते तंतोतंत लागू पडते. खरोखरच बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता वा बाबासाहेबांच्या कार्यात कोणतीही अडचण निर्माण न करता ती इवलीशी पणती बाबासाहेबांसाठी आयुष्यभर जळत राहिली. कोणतीही कुरबूर न करता मुकाटपणे आयुष्यभर चटके सहन करणारी ही पणती म्हणजे माता रमाई होय.
शतकानुशतके अंधाराच्या खाईत अस्पृश्य समाज प्रचंड असे अपमानाचे आयुष्य जगत होता. साधे नैसर्गिक हक्काचे पाणी त्याला मिळत नव्हते. रस्त्यावरुन चालताना त्याच्या पाऊलखुणा रस्त्यावर उमटू नये म्हणून त्याच्या कमरेला झाडू बांधलेला असायचा. त्याच्या तोंडातील थुंकी इकडे तिकडे पडू नये म्हणून तोंडाला मडके बांधलेले असायचे. शिक्षण तर त्याने अजिबातच घेऊ नये, अशा समाजव्यवस्थेच्या गर्तेत तो अडकला होता. चातुर्वर्ण्य व्यवस्था ज्या काळात पोसली जात होती त्या व्यवस्थेच्या काळात उदयास आलेल्या आणि या व्यवस्थेचे चटके बसलेल्या व कोणताही पर्याय नसल्याने ते चटके खुद्द बाबासाहेब आंबेडकर यांनाही सहन करावे लागले.
म्हणतात ना काळाचा महिमा अगाध असतो. याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा निखारा जन्माला आला. त्यांच्या रुपाने एक तेजस्वी तारा उदयास आला. तत्कालीन समाज व्यवस्थाच बदलून टाकण्यासाठी आणि अंधारात चाचपडत जीवन जगणाऱ्या समाजाला स्वाभिमानाने जीवन जगता यावे, त्यांच्या परिस्थितीत आमुलाग्र बदल घडून यावा, शिक्षणाची दारे त्यांच्यासाठी खुली व्हावीत, सार्वजनिक पाणवठ्यावर जावून त्यांना पाणी मिळावे यासाठीच बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अशा या कठीण परिस्थितीत माता रमाबाई बाबासाहेबांच्या जीवनात आल्या आणि त्या मातेने बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून, सांसारिक अडचणी निर्माण न करता तुम्ही केवळ शिका, तुमची या समाजाला गरज आहे आणि त्यांच्या जीवनात तुम्हीच प्रकाश टाकू शकता, तुम्हीच त्यांच्यात आशेचा किरण निर्माण करु शकता असे म्हणणारी माता रमा होय.
आपल्या संसाराचा गाडा चालावा म्हणून रमाबाई सकाळी लवकर उठून, नाचक्की होऊ नये म्हणून पहाटे शेण गोळा करुन त्याच्या गोवऱ्या थापत असत. संसारासाठी काय लागते काय नाही, याची अजिबात चिंता करु नका, घरादाराची काळजी करु नका असे सांगणारी रमाईसारखी माऊली अपवादानेच जन्माला येते. तशी ती बाबासाहेबांच्या आयुष्यात आली आणि तिने बाबासाहेबांचे आयुष्य बदलून टाकले.
बाबासाहेबांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर संपूर्ण समाजच बदलून टाकला. बाबासाहेब परदेशात उच्च शिक्षणासाठी गेले असताना रमाईला त्यांची सारखी आठवण येत असे. पण त्या आठवणी मनातल्या मनात त्या तशाच दाबून टाकत असत. स्वतःला कितीही आठवण आली तरी त्या उघडपणे व्यक्त करीत नसत. त्यांनी बाबासाहेबांना धाडलेल्या एका पत्रातील शेवटचे वाक्य असे होते अहो, इथे सर्वांना तुमची किती आठवण येते, अशा भावना रमाबाई व्यक्त करीत असत.
म्हणजे इतका संयम, इतकं अप्रुप, इतकं अपार प्रेम आणि माया आपल्या संसारासाठी त्यांच्यात होती. त्यांच्यात जी काही शक्ती होती, ती समाजबांधवांसाठी वापरुन बाबासाहेबांना चळवळ उभारणीसाठी बळ दिले ती इवलीशी पणती आयुष्यभर जळत राहिली. बाबासाहेबांना मिळालेल्या प्रोत्साहनाने, तिच्या त्यागी वृत्तीने बाबासाहेबांना आभाळाएवढी वा त्यापेक्षाही अधिक उंची गाठता आली.
काही काळापूर्वी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांचा बाबासाहेबांच्या जीवनावर व त्यांच्या अमूल्य अशा कार्यावर प्रकाशझोत टाकणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दक्षिणेतील आघाडीचे अभिनेता मामूटी यांनी बाबासाहेबांची भूमिका साकारली होती तर प्रसिद्ध मराठी चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी रमाबाई यांची भूमिका साकारली होती. मामुटी आणि सोनाली या दोघांनी अप्रतिम अशा भूमिका साकारून हुबेहुब बाबासाहेब आणि रमाबाईची महती जगासमोर आणली.
गेल्या २६ नोव्हेंबर या संविधान गौरवदिनी भीम फाऊंडेशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी यांनी आपला अनुभव सांगितला. बाबासाहेबांची आणि रमाबाईंची महती आपणास कळली तेव्हा आजही आपणास गहिवरून येत असल्याचे सोनालीने प्रामाणिकपणे कबूल केले. बाबासाहेबांवरील चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी हातात हात घेऊन आम्हाला अभिवादन केले पण ते अभिवादन मामुटी किंवा मला नव्हते, तर ते बाबासाहेब आणि रमाबाई यांना होते याची आम्हाला जाणीव झाली आणि रडायला आले असा तो अनुभव सोनालीने कथन केला. यावरुन रमाबाईंची उंची किती होती ते स्पष्ट होते.
रमाबाई बाबासाहेबांच्या जीवनात आल्या नसत्या तर कदाचित एखाद्या सामान्य माणसासारखे बाबासाहेबांना जीवन जगावे लागले असते. आजच्या काळात संसारात थोड्याशा अडचणी आल्या तर नवर्यापासून काडीमोड घेणाऱ्या कितीतरी महिला आहेत. मात्र रमाबाईंनी कोणत्याच अडचणी निर्माण केल्या नाहीत. त्यामुळेच देशात व परदेशात जाऊन बाबासाहेबांना उच्च शिक्षण घेता आले आणि त्या शिक्षणाच्या जोरावर बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाच्या जीवनात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्रांती घडवून आणली.
आज हा समाज स्वाभिमानाचे जे जीवन जगत आहे, त्यात माता रमाबाईंच्या त्यागी वृत्तीचा समावेश आहे. अशा या त्यागी आणि धाडसी माऊलीला आज २७ मे रोजी स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांना कोटीकोटी प्रणाम !

– लेखन : शेषराव वानखेडे. मुंबई
– संपादक : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
रमामाता यांचे योग्य दर्शन. त्यांना कोटी कोटी प्रणाम.