दिवे लागले दिवे….
सा क व्य व्हॉट्सॲप समूहाने आयोजित केलेल्या दुसऱ्या परदेशस्थ ऑनलाईन मराठी कवी संमेलनात
वर्षा हळबे यांनी सादर केलेल्या कवितेचे “कुटुंब रंगलंय काव्यात” फेम विसुभाऊ बापट यांनी केलेले रसग्रहण , कवितेसह पुढे देत आहोत.
– संपादक
बालकाचा जन्म झाल्याबरोबर ते जर रडले नाही तर सुईण त्याला रडवते, आणि तिथूनच प्रत्येकजण अश्रूंबरोबर जोडला जातो ते त्याच्या अंतापर्यंत. सुख आणि दुःख हेही प्रत्येकाच्या वाट्याला त्याच्या कर्मानुसार आलेले असते. माणसाला दोन्ही गोष्टी जेंव्हा विपुल प्रमाणात मिळतात तेंव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. कांहींना ते अश्रू फुलासारखे वाटतात तर कवयित्री वर्षा हळबे यांना ते दिव्यासारखे भासतात.
कधी पाझरलेल्या अश्रूंनी डोळे डबडबून येतात, तर कधी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला तरी शेवंती वरील दंवबिंदूंसारखे ते टपकतातच .! डोळ्यांच्या परीघातले अश्रूंचे हे दिवे कवयित्री वर्षा हळबे यांना आकाशातील प्रकाशाकडे झेपावतांना दिसतात. आयुष्यातील दुःखद क्षणांप्रमाणे सुखाच्या क्षणी सुद्धा माणसाच्या डोळ्यातील अश्रूंचे दिवे कवयित्री वर्षा जी यांना लागलेले दिसतात.

– रसग्रहण : विसुभाऊ बापट. मुंबई.
आता प्रत्यक्ष कवितेचा आस्वाद घेऊ या…
पापण्यांवरती दिवे चिमुकले
लुकलुकती बघ अश्रूंचे
डबडबती कधी पाझरती
लकेरी ओढत खूप कवडसे
किती आवरले दूर लोटले
भरती घन ते अंगणामध्ये
परसामधल्या शेवंतीवर
लवण जलाचे पडती सडे
अंगणातल्या परीघातले
दिवस आठवतां सोनेरी ते
पुन्हा एकदा लागती दिवे
सुखदुखाच्या सुमनांचे
केली किमया कशी काळाने
दिवस उगवती नित नियमाने
घेत उशाला सहज स्मृतींना
झेपावते मी प्रकाशाकडे.

– रचना : वर्षा हळबे. अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
वर्षा हळबे स्वतः कविता सादर करताना पाहू या….
https://youtu.be/-OPqWA7FfbQ
🌹अप्रतिम 🌹
अशोक साबळे