तो सुवर्ण क्षण माझ्यासाठी खरंच विशेष, म्हणजे अगदी डायरीत नोंद करून ठेवण्यासारखा होता. मी माझी दोन पुस्तके ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मावजो यांना प्रत्यक्ष भेटून सादर केली.
एक पुस्तक म्हणजे मी माझ्या वडिलांच्या जीवनावर लिहिलेले, “दामू, साने गुरुजींचा धडपडणारा मुलगा” आणि दुसरे म्हणजे मी संपादित केलेले “शलाका“, पारितोषिक प्राप्त लघुकथांचा संग्रह.
योगायोग असा की दामोदारजी साने गुरुजींचे चहाते आणि माझे वडील साने गुरुजींचे शिष्य तसेच माझ्या वडिलांचे नांवही दामोदर. ही ग्रेट भेट शक्य झाली माझी मैत्रिण मीरा पेंडसे मुळे. दामोदर मावजो मीराचे मेव्हणे – मोठ्या बहिणीचे पती. ठाणे येथे झालेल्या मॅजेस्टिक गप्पांमध्ये पहिल्याच दिवशी त्यांची मुलाखत होती, त्यासाठी ते गोव्याहून मुंबईत आले होते.
आपल्याला कल्पना असेलच की, दामोदर मावजो यांना
२०२२ सालचा कोंकणी भाषेसाठी दिला गेलेला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. लघुकथा लेखक, कादंबरीकार, समीक्षक, नाटककार, एव्हढंच नाही तर कोंकणी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी झालेल्या चळवळीतील एक खंदा कार्यकर्ता आणि प्रणेता म्हणून दामोदर मावजो यांचा परिचय करून देता येईल. त्यांच्या सुविद्य पत्नी शैलाताई सुद्धा बरोबर होत्या. त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून या थोर साहित्यिकाबद्दल खूप माहिती मिळाली. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत, अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. अनेक चळवळींतून त्यांचा सक्रिय सहभाग आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मायभूमीशी असलेलं नातं अतूट आहे. कुटुंबात त्यांना आदराने “भाई” असे संबोधतात.
१९६७ मध्ये गोव्याचा केंद्र शासित दर्जा बदलून, नव्याने सुरु झालेल्या गोव्याचे राजकीय स्थान निश्चित करण्यासाठी झालेल्या ऐतिहासिक जनमत चाचणी च्या वेळी झालेल्या चळवळीत दामोदर मावजोंचा सक्रिय सहभाग होता. आपली आगळी वेगळी ओळख जपून ठेवण्यासाठी गोवा हे स्वतंत्र राज्य असावे अशी मागणी होती. शेजारच्या राज्यामध्ये विलीनीकरणास गोवेकरांनी स्पष्ट नकार द्यावा असे त्यांचे मत होते.
१९८५ – ८७ मध्ये कोकणी भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा यासाठी चळवळ झाली. त्यावेळी गोवेकरांच्या प्रमुख मागण्या होत्या “गोव्याच्या कोकणी प्रजेचा आवाज”
(१) कोंकणीला अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा.
(२) गोवा हे स्वतंत्र राज्य असावे.
(३) भारताच्या राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात कोंकणी भाषेचा समावेश असावा.
२०१९ मध्ये “अक्षर दामोदर” हा दोन दिवसांचा परिसंवादाचा कार्यक्रम उच्च शिक्षण संचालक गोवा आणि आणि शासकीय महाविद्यालय केम्पे यांच्या संयुक्त विद्यमाने भाईच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त आयोजित केला होता. कविवर्य अशोक वाजपेयी ह्यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे लोकप्रिय लेखक व गीतकार गुलजार आणि प्रोफेसर हरीश त्रिवेदी होते.
२०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर, २०१५ मध्ये वकील गोविंद पानसरे आणि प्राध्यापक मल्लेशप्पा कलबुर्गी ह्यांच्या निर्घृण हत्येनंतर पत्रकार आणि त्यानंतर झुंझार, धडाडीची कार्यकर्ती गौरी लंकेशची हत्या २०१७ मध्ये झाली. तिच्या मारेकऱ्याला पकडण्यात कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले. मारेकऱ्याकडे मिळालेल्या डायरीतील हिट लिस्टमध्ये दामोदर ह्यांचं नांव असल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी दामोदर मावजो ह्यांच्या जीवाला धोका असल्याचं केंद्र सरकारच्या गृह खात्याला कळवले. केंद्र सरकारच्या आदेशावरून गोवा सरकारने त्यांना २०१८ पासून २४ तास पोलीस संरक्षण दिले आहे.
भाई रोज सकाळी उठल्यावर स्वतः चहा करतात, रात्रभर पहारा करणाऱ्या पोलिसांना आपल्या आधी चहा देतात. सकाळी फिरायला जातांना ते इतके भरभर चालतात, की त्यांच्या गतीने चालण्यापेक्षा बऱ्याच वेळा पोलिसांना दुचाकीने जाणे भाग पडते.
दामोदर मावजो यांना Middle east Arab countries ला study tour साठी Indian Council for Cultural Relations ने प्रायोजित केले.
भारत सरकारने चीनला पाठवलेल्या दहा भारतीय साहित्यिक प्रतिनिधींमध्ये दामोदर मावजो ह्यांचा समावेश होता.
२०१४ मध्ये Frankfurt Book Fair मध्ये भाई मावजो, भारत सरकारचे साहित्यिक प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले.
भाईंच्या “कार्मेलीन“ या कोंकणी भाषेतील कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला असून साहित्य अकादमीने या कादंबरीचा मराठी अनुवाद १९९० मध्ये प्रकाशित केला आहे. या मराठी अनुवादाची दुसरी आवृत्ती २०१६ मध्ये प्रकाशित झाली आहे.
निसर्गरम्य गोव्याच्या भूमीतील लखलखता ‘हिरा’ असलेल्या दामोदर मावजो यांची ही ग्रेट भेट कायमची स्मरणात राहिल, अशीच झाली हे माझं भाग्यच होय.

– लेखन : आशा कुलकर्णी, विलेपार्ले – मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मनापासून धन्यवाद, आशाताई…! 😊🙏🏻