Home पर्यटन नर्मदा परिक्रमा : १७

नर्मदा परिक्रमा : १७

0

अमरकंटक ते धुव्वाधार

दक्षिण तटावर…
काल अमरकंटक येथे आल्यावर थंडी खूप असल्याने आता आपले रूपांतर जणू लाकडात होते की काय असेच वाटत होते. त्यात आम्ही खूप फिरलो होतो. नर्मदा मय्या ची विविध रूपे पाहत खूप चालणे, चढ उतार झाल्याने दमलो ही होतो पण त्याचा एक वेगळा आनंद ही होता. आज परत आम्हाला जबलपूर कडे जायचे होते. परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार होती. आम्ही भल्या पहाटे उठून सर्व आन्हिके उरकून माई की बगिया येथे गेलो. खूपच प्रसन्न वातावरण होते..

माई की बगीया या स्थानी जाताना काही एक चालावं लागतं. येथे आंब्याची उंच उंच झाडे आहेत. सालाचं घनदाट जंगल आहे. खेळता खेळता मय्येचे चरण जिथे पडले तेथे तिच्या चरणातून उदक बाहेर पडले ते हे स्थान. त्यास चरणोदक कुंड असं म्हणतात.

इथुन मय्या गुप्त स्वरूपात मुख्य उदगम स्थाना पर्यंत वाहते असा समज आहे. त्यामुळे याही स्थानी आपण मय्येस न ओलांडण्याची काळजी घेतो. इथे बाल मय्या आहे. मय्या याठिकाणी लहान असताना खेळण्यासाठी येत होती अशी आख्यायिका आहे.

पुढे शोन नदीचे उगमस्थान आहे. सोनाक्ष नावाचं देवीचं देऊळ आहे. उत्तर तटावरून दक्षिण तटावर तट परिवर्तन करुन झालं की मुख्य मंदिरात रेवाकुंडात जल अर्पण करणे व आरती करणे हे नित्य नेम संपन्न झाले. थंडी खुप पडली होती.
दक्षिण तटावरून उत्तर तटावरील श्री नर्मदा मंदिरास मनोभावे नमस्कार केला.

तिथून पुढे प्रकाश काका यांचे सेवाकेंद्रात गेलो. तिथं आमचा बालभोग झाला. सर्वांचं छान स्वागत केलं. देवकर मावशी आणि काका सेवेचा कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना उत्तम सेवाकार्य करत आहेत. फोटो सेशन झाले. सर्वांना खूप आनंद झाला. सेवाकार्याचे सर्वांनी कौतुक केले. आता विपुल प्रमाणात परिक्रमा वासी येत आहेत. त्यांच्या आवश्यकते नुसार त्यांना चहा बालभोग भोजन व निवास व्यवस्था उपलब्ध करवून दिली जात आहे.
काकांनी सर्वांना सेवाकेंद्रात आवर्जून सेवेसाठी तसेच माहेर पणासाठी येण्याचं पुनः पुन्हा आवाहन केलं. आपल्या कडून सेवाकार्य घडावं हि एक अपूर्व घटना आहे. ही सर्वोच्च अनुभूती आहे.

पुढे आम्ही कबीर चबुतरा पाहिला.. कबीर चबुतरा हे स्थान छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे. नर्मदेच्या काठावर पंधराव्या शतकाच्या अंतिम टप्प्यात वाराणसीचे साधू संत कबीर आल्याचा उल्लेख सापडतो. तेव्हा ते बांधवगड हून जगन्नाथपुरी कडे जात होते. या ठिकाणी त्यांनी निर्जन जंगलात संत समागम करण्याचं ठरविलं होतं. ही वार्ता श्री नर्मदामाईस समजली.
तिने स्वप्नात येऊन कबीरजींना विचारलं, ‘मी तुमच्या सत्संगात येऊ का ?’ अर्थातच कबिरजींना अत्यानंद झाला. त्यांनी अत्यंत श्रद्धेने येण्याचे निमंत्रण दिले. पण मय्याजी आपण कुठल्या रुपात याल हे सांगावं असा प्रश्न विचारला.
तेव्हा नर्मदामाई म्हणाली, ‘या ठिकाणी जो झरा वाहतो आहे त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाची दुधासारखी शुभ्र धारा दिसेल ती मी स्वतः असेल.’ अशा अर्थाने कबीरजी यांच्या भेटीसाठी मैया कबीर चबुतरा येथे आली अशी मान्यता आहे.

दुपारी हनुमान मंदिरात भोजन घेतले. मजल दरमजल करत भेळ, चहा, भोजन घेऊन धुव्वाधार बघण्यासाठी आम्ही दक्षिण तटावर जबलपुर मुक्कामी आलो.
क्रमशः

— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version