ओंकारेश्वर ला नर्मदा नदी मध्ये स्नान करुन तिथुनच नर्मदेच जल घेऊन मामलेश्वरच्या पिंडी वर अर्पण केले. आम्हाला दिलेल्या बॉक्स मध्ये जी बाटली होती तिला आजपासून आम्ही झारी म्हणणार होतो.
मैय्याचं जल आमच्या सोबत आहे म्हणजे मैय्या आमच्या सोबत आहे. परिक्रमा संपन्न होई पर्यंत ही झारी मैय्या च्या रुपात आमच्या सोबत राहील. त्या झारी मध्ये जल भरुन घेतलं आणि झारीच पूजन केले. प्रार्थना केली, “हे नर्मदा मैय्या आमची परिक्रमा सफळ होऊ दे, ही परिक्रमा प्रत्येक आत्मा पवित्र करेल. मम् मद हरणार्थ – कलियुगात नराचा मदाचा नाश करणारी ती नर्मदा. षोडशोपचारे पूजन केले त्यानंतर एक मुख्य व्यास दंड होता जो आमच्या सोबत असतो त्याची पूजा करुन त्याला धागा बांधला आमची प्रार्थना त्याला सांगितली.
जे पायी परिक्रमा करतात त्यांच्या कडे नेहमी व्यास दंड असतोच. आम्ही बसने परिक्रमा करत होतो म्हणून आमचा सगळ्यांचा मिळून एक व्यास दंड होता.
आम्ही आज रावेरखेडी ला जात आहोत. बाजीराव पेशवा समाधीचे दर्शन करण्यासाठी. महान पेशवा बाजीराव यांची समाधी रावेरखेडी ईथे आहे. उत्तर भारत च्या एका मोहिमेवर निघाले असता नर्मदेच्या किनारी बाजीराव पेशवे यांना मृत्यू ने कवटाळले. इंदोर पासून रावेरखेडी 100 किमी दूर आहे. 28 एप्रिल 1740 मध्ये श्रीमंत बाजीराव पेशवा (प्रथम) यांचे निधन रावेरखेडी ईथे झाले. बाजीराव पेशवा मराठा साम्राज्याचे महान योद्धा होते. दिल्ली वरुन एक युद्ध जिंकून परतत असताना त्यांना प्रचंड उन्हाळयाने मात्र ह्या वीराला हरवले त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

ज्याने मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यास महत्वपूर्ण भूमिका निभावली. बाजीराव पेशव्यांनी मराठा संघटना उभारली. त्यात गुजरात चे गायकवाड ग्वालियर चे शिंदे (सिंधीया) नागपूर चे भोंसले इंदोर चे होळकर हे समावेश होता. बाजीराव पेशव्यांच्या इमानदार ग्वालियर चे शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत रावेरखेडी ईथे समाधी बांधली. एका किल्याचे स्वरुपात ही समाधी बांधली गेली आहे. त्याच्या खिडकीतून नर्मदा मैय्या चे मनोहर दृष्य दिसते.
अवघ्या वीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी पेशवे पद स्वीकारले. लागोपाठ 42 लढाई लढले आणि एकही लढाई हरले नाही. पंडीत अनयजींने या पराक्रमी वीर पेशवा ची माहिती दिली. आम्ही त्या समाधी वर नतमस्तक होऊन पुढे निघालो सियाराम बाबांचे दर्शन करण्यासाठी. सियाराम बाबांचा आश्रम दक्षिण तीरावर जिल्हा तेलीभट्यान मध्य प्रदेशात आहे. आमची गाडी आश्रमा पर्यंत जाऊ शकत नव्हती. आम्हाला कमीत कमी अर्धा पाऊण किलोमीटर चालत जावे लागले. 👌मला बाबांचे दर्शन करायचे होते म्हणून मी चालायला सुरुवात केली. थोड थोडं अंतर थांबत थांबत मी सियाराम बाबांच्या आश्रमात पोहचले.
अशा संतांच्या तपश्चर्या ही देशाची आणि धर्माची मोठी ताकद आहे. ह्यांच्या भक्तीमुळे असंभव संभव होते. सियाराम बाबांचे वय 109 आहे असं सांगितलं जातं. काही जण 106, 🎂130 पण सांगतात परंतु मिडिया रिपोर्ट च्या आधारे 109 च्या आसपास असु शकते. सियाराम बाबा भगवान हनुमंताचे परम भक्त आहेत. ते निरंतर रामचरित मानस चे पारायण करताना आपणास आढळतात.

असं सांगितलं जातं की सियाराम बाबांचा जन्म मुंबई महाराष्ट्र इथे झाला. त्यांचे शिक्षण सातवी आठवी पर्यंत झाले होते. नंतर कोणा एका संतांच्या संपर्कात आल्यावर त्यांना वैराग्य धारण करावे असे विचार येऊ लागले. त्या नंतर त्यांनी आपले घरादाराचा त्याग केला आणि हिमालयात गेले. नंतर इथे नर्मदा मैय्या च्या सानिध्यात आले. बाबांनी दहा वर्षे उभे राहून तपश्चर्या केली, खंडेश्वर तप केले. हे अत्यंत कठीण तप आहे. उभे राहुन खाणे झोपणे. सियाराम बाबा बारा वर्षे मौन धारण करून राहिले त्या नंतर जेव्हा त्यांनी पहिला शब्द उच्चारला तो शब्द होता, “सियाराम”. त्यामुळे गावातील लोकांनी त्यांना सियाराम हे नाव ठेवले.
बाबा फक्त दहा रुपये आपल्या कडून स्विकारतात. जर जास्त दिले तर परत करतात. बाबांना दोन कोटी सत्तावन लाख रुपये घाटाच्या दुरुस्ती साठी छप्पर बांधणी साठी दिले होते त्यातील दहा रुपये ठेवले आणि बाकी रक्कम परत केली. थंडी असो वा गर्मी बाबा सदा एका लंगोट घालून असतात. ध्यान साधनेच्या बळावर त्यांनी आपले शरीर तसे बनवले आहे जे कोणत्याही ऋतु मध्ये बाबा तसेच असतात. एवढं वय असुनही बाबा आपलं काम आपणच करतात. खंडेश्वर तपाच्या वेळी नर्मदा नदी मध्ये पूर आला पूराचे पाणी बाबांच्या नाभी पर्यंत आले परंतु बाबा जागचे हलले नाहीत. तिथेच उभे राहिले. सियाराम बाबांचे दर्शन घेताना जाणवले बाबा अत्यंत तेजस्वी आहेत.
त्या दिव्य विभूतींचे दर्शन घेऊन आम्ही त्या रात्री बडवानी शिवशंकर हॉटेल मध्ये रात्रीची आरती भोजन आणि विश्राम केला.
आजचा भाग इथे संपवून परत आपण पुन्हा भेटू…..
काल हर दुःख हर दारिद्र्य हर संताप हर क्लेश हर मॉं सबका भला कर
नर्मदे हर जिंदगी भर
क्रमशः

– लेखन : सुलभा दिवाकर
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800